‘मला नांदवा हो’ तृतीयपंथी पत्नीची आर्त हाक, पतीने केले दुसरे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:12 AM2018-06-15T03:12:03+5:302018-06-15T03:12:03+5:30

‘ते’ दोघे मित्र... त्याला ‘तो’ आवडला... वास्तविक, ‘तो’ वयाने मोठा... एकाने ‘स्त्री’ व्हावे, असे ठरले... तो त्याच्यासाठी ‘स्त्री’ झाला... दोघांनी रीतसर लग्न केले... संसार सुरळीत सुरू झाला... मात्र, ८ वर्षांचा सहवास सोडून पती अचानक गायब झाला... समोर आला तो दुसरे लग्न करूनच... आता तो ‘ति’ची जबाबदारी घ्यायला तयार नाही...

Pune News | ‘मला नांदवा हो’ तृतीयपंथी पत्नीची आर्त हाक, पतीने केले दुसरे लग्न

‘मला नांदवा हो’ तृतीयपंथी पत्नीची आर्त हाक, पतीने केले दुसरे लग्न

Next

- लक्ष्मण मोरे
पुणे : ‘ते’ दोघे मित्र... त्याला ‘तो’ आवडला... वास्तविक, ‘तो’ वयाने मोठा... एकाने ‘स्त्री’ व्हावे, असे ठरले... तो त्याच्यासाठी ‘स्त्री’ झाला... दोघांनी रीतसर लग्न केले... संसार सुरळीत सुरू झाला... मात्र, ८ वर्षांचा सहवास सोडून पती अचानक गायब झाला... समोर आला तो दुसरे लग्न करूनच... आता तो ‘ति’ची जबाबदारी घ्यायला तयार नाही... तिने मिनतवाऱ्या केल्या... त्याचा उपयोग मात्र झाला नाही... तिने बारामती पोलिसांचे उंबरे झिजविले... मात्र, तिथे अवहेलना आणि असंवेदनशीलता पदरात पडली... शेवटी ‘आमच्यासारख्यांनी जायचे कुठे आणि न्याय मागायचा तरी कुणाकडे?’ असा आर्त सवाल साक्षी खत्री करीत आहे.
साक्षी हिचे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. वडील व्यवसायानिमित्त बारामतीत आले. तिच्या आई-वडिलांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे लग्न झाले. साक्षी ही पूर्वी मुलगा होता. बारामतीमध्ये राहत असताना मित्र परिवार छान जमला. त्यातीलच एका तरुणाशी त्याची २०११मध्ये ओळख झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री जमली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे फिरणे, जेवायला जाणे, एकत्र राहणे सुरू झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, साक्षीच्या कुटुंबीयांना या संबंधांबद्दल माहिती मिळाली. आई-वडिलांनी हे संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, ती प्रेमात असल्याने तिने प्रियकरालाच साथ देण्याचे ठरविले.
लग्न करायचे असल्यामुळे त्यांनी २०१४मध्ये लिंगपरिवर्तन करून घ्यायचे ठरविले. पुण्यातील एका डॉक्टरकडे गेल्यानंतर समुपदेशन वगैरे सोपस्कार पूर्ण झाले. त्यानंतर १ जुलै २०१६ रोजी लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आणि ‘तो’ ‘ती’ झाला. त्यानंतर लगेचच २१ जुलै २०१६ रोजी दोघांनी लग्न केले. साक्षीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले. समाजात बेअब्रू झाली म्हणून बारामती सोडून पुण्याला जाणे पसंत केले. तब्बल २ वर्षे साक्षी तिच्या पतीसह बारामतीमध्ये एक फ्लॅट घेऊन राहत होती. दोघांचाही संसार छान चालला होता. ती ब्यूटी पार्लर चालवून संसाराला हातभार लावत होती. त्याने एक दिवस तिला भेटून १८ एप्रिल रोजी त्याचे लग्न झाल्याचे सांगितले. स्वजायीय मुलीशी राजस्थानमध्ये लग्न केल्याची माहिती देताच साक्षीला धक्का बसला. त्या वेळी तिने ‘मी कोणाच्या आधारे जगू?’ अशी विचारणा केली. तेव्हा तो तिला घेऊन पंढरपूरला गेला.
तिथे वैदिक पद्धतीने लग्न लावून लग्नाची नोटरी पद्धतीने नोंदणी केली. त्यानंतर तो पुन्हा भेटायला येईना. त्याचा फोन लागेना. काही संपर्क होईना. त्यामुळे ती पोलिसांकडे त्याची हरवल्याची (मिसिंग) तक्रार देण्यास गेली. मात्र, साक्षीला ‘काही तरी कामधंदा करा. तुमच्यामागे १०० पुरुष लागतील,’ असे पोलीस अधिकारी मानसिंग खोचे यांनी सुनावले. पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा पहिला अनुभव तिने तेथे घेतला. याबाबत तसेच पतीने आपल्याला नांदवावे या संदर्भात तिने पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
मुळातच समाजाने आणि कुटुंबाने नाकारलेल्या तृतीयपंथी साक्षीने प्रवाहाविरुद्ध जाऊन त्याच्याशी लग्न केले. कुटुंब सोडून सलग सात वर्षे त्याच्यासोबत घालवली. त्याने तिचा ‘उपभोग’ घेतला. वैदिक पद्धतीने लग्न लावूनही तो तिला फसवून सोडून गेला. एकीकडे समाज स्वीकारत नाही, दुसरीकडे आई-वडील स्वीकारत नाहीत तर तिसरीकडे न्याय देणारी पोलीस यंत्रणा तिची कैफियत ऐकून घ्यायला आणि तक्रार दाखल करायला तयार नाही. त्यामुळे ‘आमच्यासारख्यांनी जायचे तरी कुठे?’ असा प्रश्न व्यवस्थेलाच तिने विचारला आहे. दरम्यान, तिला बारामती सोडण्यासाठी पतीच्या दोन मित्रांनी धमकीही दिली आहे. पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे तिच्यावर पुण्यामध्ये आश्रय घ्यायची वेळ आली आहे. गेंड्याची कातडी असलेल्या पोलिसांना याबाबत सामाजिक संघटनांनी जाब विचारण्याची आवश्यकता आहे.

माझे व माझ्या मित्राचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आमच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मी लिंगपरिवर्तन करून घेतले. आमचा संसार दोन वर्षे सुरळीत सुरू होता. माझ्या पतीचे बारामतीमधील मारवाडी पेठेत स्विट्सचे दुकान आहे. मात्र, माझ्या पतीने कुटुंबीयांच्या दबावाखाली दुसरे लग्न करून माझी फसवणूक केली आहे. माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. मला नैराश्य आलेले आहे. पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले, तर निरीक्षक मानसिंग खोचे माझ्याशी फार वाईट पद्धतीने बोलले. मला तेथून परत पाठवून दिले. मी न्याय कोणाकडे मागू? माझ्या आई-वडिलांनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. मला कोणाचाच आसरा आणि आधार नाही. पतीने मला नांदवावे, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.
- साक्षी खत्री, पीडित तृतीयपंथी पत्नी

तक्रारदार माझ्याकडे आल्या होत्या, त्या वेळी त्यांचा पती मिळून येत नव्हता. त्यांनी ‘मला पतीची भेट घालून द्या किंवा बोलणे करून द्या,’ अशी विनंती केली होती. पती सापडला तर नक्की भेट घडवू, असे सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी तक्रार करण्यासाठी आले नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांनी तक्रार दिली असती, तर ती तत्काळ नोंदवून घेण्यात आली असती. पोलीस सर्व प्रकारची मदत करतील, असे आश्वासनही त्यांना मी दिले होते. त्यांच्या माझ्याबद्दलच्या तक्रारीमध्ये अजिबात तथ्य नाही.
- मानसिंग खोचे, पोलीस निरीक्षक

Web Title: Pune News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.