रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:58 AM2018-02-24T01:58:25+5:302018-02-24T01:58:25+5:30

एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले.

If the ambulance is given to waiters, | रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

Next

पुणे : एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाले अन् रुग्णाचा जीव वाचला... पण त्या वेळी डॉक्टरांचे एक वाक्य सर्वांनाच हुरहुर लावून गेले... ‘थोडा उशीर झाला असता, तर ते वाचले नसते.’ रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितलेला हा अनुभव... त्या दिवशी वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली असती तर... प्रत्येक वेळी वाट मोकळी असेलच, असे नाही... शहर व परिसरात अनेकदा वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळते. रुग्णांच्या नातेवाइकांप्रमाणेच आम्हालाही वाहतूककोंडीची धास्ती असल्याचे रुग्णवाहिकाचालकांनी सांगितले.
‘रुग्णवाहिकांसाठी वाट मोकळी करून द्या’ असे आवाहन विविध यंत्रणांकडून सातत्याने केले जाते. पण तब्बल ३० लाखांहून अधिक वाहने असलेल्या शहरामध्ये रुग्णवाहिकांसाठी ही वाट तितकीशी सोपी नाही. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून रुग्णवाहिकांसाठी ही वाट किती बिकट असते, हे समोर आणले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही रुग्णावाहिकांकडे अनेक वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते. सायरन वाजवत येणाºया रुग्णवाहिकांना वाट देण्यातही कुचराई केली जाते. त्यामुळे चालकांना अनेकदा हॉर्न वाजविण्याची वेळ येते. रस्त्यावरील सिग्नल बंद असो वा सुरू, चालकांना हा अनुभव नेहमीच येतो. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत रस्ते ओसंडून वाहत असतात. या काळात रुग्णवाहिका चालकांचा वाट काढताना कस लागतो.
वाहतूककोंडीतून वाट काढताना कराव्या लागणाºया कसरतीविषयी शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या रुग्णवाहिका चालकांशी संवाद साधला असता बहुतेकांनी बेशिस्त वाहनचालकांना दोष दिला. रस्त्यावर रुग्णवाहिका दिसल्यानंतर तिथे पोलीस असल्यास ते वाट मोकळी करण्यासाठी मदत करतात. मात्र, अनेकदा मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसतील तर काही वाहनचालक साधे सामाजिक भानही ठेवत नाही.
रुग्णवाहिका दिसत असूनही वाट दिली जात नाही. काही वाहनचालक स्वत:हून पुढाकार घेत गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मदत करतात. पण हा चांगुलपणा, सामाजिक जाणीव खूप कमी वेळा पाहायला मिळते. वाहनचालक, नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.


रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना वाट मोकळी करून देणे अपेक्षित असते. पण अनेक वाहनचालकांना त्याचे भान नसते. वाट देण्याच्या नादात वाहनांचा वेग वाढवला जातो. उजव्या, डाव्या बाजूला वाहने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल व्हायला हवा. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्याचाही फटका रुग्णवाहिकांना बसतो.
- गोपाळ जांभे, सचिव,
पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनमी गेली ७ वर्षे रूग्णवाहिका चालक म्हणून पिंपरी-चिंचवड येथे कार्य करत आहे. पुर्वीची आणि आताची परिस्थिती बघता रूग्णवाहिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून पाहिजे तशी मदत न मिळाल्याने रूग्णवाहिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सायरन चा आवाज येत असून देखील नागरिक बाजूला होणार नाही. आहे तिथेच उभे राहणार. आणि काही नागरिक असेही आहेत की, जे रूग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा देतील. लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - मनोज दाभाडे, चालकमी हडपसर येथील परिसरामध्ये रूग्णवाहिका सेवा पुरवण्याचे काम करतो. साधारणत: सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जास्त प्रमाणात गाड्यांची रहदारी असल्याने रूग्णवाहिकेला जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा वेळी एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो. आम्हाला रिक्षा चालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच एखाद्यावेळी बीआरटी बस जर बंद पडलेली असेल तर मार्गावर खूप अडचणी येतात.
- माधव तेकवडे, चालक ईश्वर रूग्णवाहिका

Web Title: If the ambulance is given to waiters,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.