दुरावलेले ६० बिबट्यांचे बछडे विसावले आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:46 AM2019-03-16T01:46:22+5:302019-03-16T01:46:38+5:30

बिबट्या निवारा केंद्रातील रेस्क्यूू पथकाची कामगिरी; २००९ ते २०१९ काळात वन्यप्राण्यांना दिले जीवदान

The 60 leopards are separated from the calves | दुरावलेले ६० बिबट्यांचे बछडे विसावले आईच्या कुशीत

दुरावलेले ६० बिबट्यांचे बछडे विसावले आईच्या कुशीत

Next

- अशोक खरात

खोडद : जुन्नर तालुका हा बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा अधिवास मोठा आहे. यामुळे तालुक्यात बिबट्या आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ऊसतोडणीदरम्यान अनेक बछडे आईपासून दुरावतात. या दुरावलेल्या बछड्यांना पुन्हा त्यांची आई परत मिळवून देण्यासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे रेस्क्यू पथक मदत करत आहे. आतापर्यंत या पथकाच्या कामगिरीमुळे जवळपास ६० हून अधिक बछड्यांना त्यांची आई मिळाली आहे. तर अनेक बिबट्यांना तातडीने उपचार देऊन पुन्हा निसर्गाचा अधिवास मिळवून दिला आहे.

माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील डॉ. अजय देशमुख यांनी आजपर्यंत अनेक जखमी वन्यजीवांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. माकड, वानर, कोल्हा, तरस, सांबर यांसारख्या अनेक प्राण्यांचे जीव वाचविले आहेत. याशिवाय अनेक पक्ष्यांचेदेखील जीव वाचविले आहेत. यात प्रामुख्याने बिबट्याचा समावेश उल्लेखनीय आहे. आजपर्यंत या डॉक्टरांनी सुमारे ४२५ बिबट्यांना आणि उपचार करून निसर्गात मुक्त केले आहे तर आईपासून दुरावलेल्या ६० बछड्यांना पुन्हा आईच्या हवाली केले आहे. डॉ. देशमुख माणिकडोह येथे रुजू झाले तेव्हा बिबट म्हणजे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. बिबट व्यवस्थापन शिकायचे, त्यांची देखभाल व औषधोपचार करायचे, त्यांच्या सवयी, कोणते औषध द्यायचे व कोणते नाही हे जाणून घायचे, तसेच सर्वांत आव्हानात्मक काम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत बिबट्याला बेशुद्ध करायचे म्हणजे, बिबट्या बघून त्याचे वजन किती किलो असेल याचा अंदाज लावून त्याला बेशुद्ध करण्याचे औषध भरणे व मारणे ही सर्वांत मोठी अवघड व जिकिरीची बाब होती. आपत्कालीन परिस्थितीत अडकलेले बिबटे म्हणजे विहिरीत अडकलेले, घरात अडकलेले, फाश्यात अडकलेले बिबटे अशा सुमारे १५० पेक्षा अधिक बिबट्यांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

बिबट्या हा प्राणी अत्यंत चतुर, हुशार, संवेदनशील व चाणाक्ष आणि तितकाच भित्रा म्हणूनदेखील ओळखला जातो. तरीही तो आपल्यासोबत राहतोय. मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती मोठ्या प्रमाणात केली. विविध ठिकाणी ७५ लोकांची गावपातळीवर टीम तयार केली असून, या टीमला वेळोवेळी प्रशिक्षण दिले व सुसज्ज केले आहे. शाळा, कॉलेज, गावकरी, सरपंच अशा वेगवेगळ्या स्तरावर बिबट- मानव संघर्ष कमी करून सहजीवन घडविण्याचा प्रयत्न डॉ. देशमुख करत आहेत.
नाशिकवरून ६ महिन्यांची बिबट्याची मादी माणिकडोह येथे आणली गेली होती. या मादीचा अपघात होऊन चारही पायांची ताकद गेली होती. अर्धांगवायूसारखा हा प्रकार होता. तिचा एक्स- रे केल्यानंतर लक्षात आले, की तिच्या पायाचे कोणतेही हाड तुटलेले नव्हते. डॉ. देशमुख आणि त्यांच्या टीमने तिला फिजिओथेरपी व मसाज थेरपी करून त्या मादीला एका महिन्यात पायांवर उभी केली. विशेष म्हणजे ती मादी आता पूर्वीसारखी पळूदेखील लागली आहे.

शेतात ऊसतोडणीच्या वेळी बिबट्याची सापडलेली पिल्ले एखाद्या प्राणिसंग्रहालय किंवा रेस्क्यू सेंटरला दिली जायची. त्यात मला एक कल्पना सुचली, जर ही पिल्लं ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी पुन्हा ठेवली तर...? आणि अगदी तसेच केले व आम्ही त्यात यशस्वीदेखील झालो. त्या पिल्लांची आई तिकडे आली व ती पिल्लं घेऊन गेली. तेव्हापासून आम्ही नेहमीच असे करू लागलो. असे झाले नसते तर आज त्या पिल्लांचं जग हे पिंजरा म्हणूनच बंदिस्त राहिले असते.
- डॉ. अजय देशमुख,
बिबट्या निवारा केंद्र

Web Title: The 60 leopards are separated from the calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.