हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:10 AM2017-07-28T06:10:54+5:302017-07-28T06:10:59+5:30

हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत

unsafe place, Hinjewadi, Wakad, Pakhalaa | हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

Next

पिंपरी : हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांची लुबाडणूक करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंजवडी पोलिसांनी या मार्गावर लूटमार करणारी एक टोळी जेरबंद केली. त्यानंतर लुबाडणुकीचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.
हिंजवडी व वाकड परिसरातून जाणा-या महामार्गावर लूटमार करणाºयांची टोळी या भागात पुन्हा सक्रिय आहे. पोलिसांनी मागील महिन्यात एक टोळी जेरबंद केली. त्यामध्ये अहमदनगर येथील चोरट्यांचा समावेश होता. त्या चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतरही अशाच प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे लूटमारीची वेगळीच टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. पोलीस मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत नाहीत.
जखमी अवस्थेत सोडले रस्त्यावर
मुंबईला जाण्यासाठी खासगी वाहनात बसलेल्या विशाल गोपीचंद आहुजा (वय ३४, रा. पिंपळे सौदागर) या प्रवाशाला मारहाण करून लुटल्याचा प्रकार मुंबई-बंगळूर महामार्गावर वाकड ते किवळेदरम्यान घडला. त्यांच्याकडून रोकड, दागिने असा ३० हजार सातशे रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. जखमी अवस्थेत सोडून लुटारू पसार झाले.

चोरट्यांची पाळत
मुंबईच्या दिशेने आयटीनगरीतून जाणा-या महामार्गाच्या परिसरात रात्री उशिरा काही वाहने दाखल होतात. ही वाहने खरे तर मुंबईला जात नाहीत. सावज हेरण्याच्या उद्देशाने चोरटे अशी वाहने घेऊन वाकड आणि हिंजवडीत येऊन थांबतात. रात्री उशिरा एसटी महामंडळाची बस अथवा अन्य कोणतेच खात्रीशीर वाहन मिळत नाही. रात्री जसजसा उशीर होईल, तशी कोणत्याही वाहनाने जाण्याची प्रवाशांची मानसिकता तयार होते.
मिळेल त्या वाहनाने जाण्याची त्यांची मन:स्थिती बनते. त्याच वेळी दबा धरून थांबलेल्या चोरट्यांच्या टोळीतील काहीजण संबंधित प्रवाशांची विचारपूस करण्याची तसदी घेतात. कोठे जायचे आहे, असे विचारतात. प्रवाशाला ज्या मार्गे जायचे आहे, त्याच मार्गाने जाणार असल्याचे भासवतात. त्यांचेच साथीदार त्या मोटारीत मागील आसनावर बसलेले असतात.

धाक दाखवून लूटमार
प्रवासी मोटारीत बसल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर मागील आसनावर बसलेल्यांपैकी एक, दोन जण संबंधित प्रवाशाला चाकू अथवा पिस्तुलाचा धाक दाखवतात. त्याच्याकडे जे काही असेल ते काढून घेतात. दागिने, रोकड, मोबाइल असा मुद्देमाल हिसकावून घेतात. त्यास मारहाण करून रस्त्यात मध्येच सोडून देतात. अशा घटना वाकड-हिंजवडी ते लोणावळ्यादरम्यान मुंबई-बंगळुरू महामार्गावर घडू लागल्या आहेत.
पिस्तुलाचा धाक
हिंजवडीतील कंपनीतील काम संपवून खासगी वाहनाने मुंबईकडे जात असताना, हिंजवडीपासून काही अंतर पुढे जाताच फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून लुबाडण्यात आले़ हिंजवडी फेज २ येथील एका कंपनीतील काम संपवून पंकज कदम (वय २७, रा. मालाड, मुंबई) मुंबईला निघाले होते.

खासगी बसने मुंबईकडे प्रवास करीत असणाºया सराफाचे सुमारे सव्वादोन किलो सोने चोरीला गेल्याची घटना जुलैच्या पहिल्या आठवड्यात घडली आहे. रुपेश शांतीलाल धाकड (वय ३७, रा. घाटकोपर, मुंबई) असे व्यापाºयाचे नाव आहे. चोरट्यांनी पिशवी फाडून त्यातील दोन हजार १८७ ग्रॅम वजनाचे सुमारे ६० लाख ८९ हजार २२३ रुपये किमतीचे दागिने पळविले.

कधी मोटार घेऊन प्रवासी वाहतूक करीत असल्याचे भासविले जाते, तर कधी रात्री रस्त्यावर थांबून वाहनचालकांना हात दाखवून प्रवासी असल्याचे दाखविणारे भामटे या भागात आहेत. मुंबईला जायचे असे सांगून मोटारीत बसायचे. असे प्रकार करणाºया चोरट्यांनी आलिशान मोटारींसह ट्रकही पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: unsafe place, Hinjewadi, Wakad, Pakhalaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.