धुक्यामुळे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; त्यानंतर जे घडलं ते पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:46 AM2023-12-27T11:46:24+5:302023-12-27T11:51:30+5:30

आग्रा इथं दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. लखनौ एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात तिघांचा जीव गेला. तर आग्रा-दिल्ली नॅशनल हायवेवरही अपघात झाल्याचं समोर आले. धुक्यांमुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एक कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचाही समावेश आहे.

या वाहन अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. परंतु लोकांनी कोंबड्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचं पाहिले त्यानंतर कोंबड्याची लूट करण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोंबड्याची वाहतूक करणारी पिकअप व्हॅनचा अपघात झाला. या अपघातात वाहन पलटले. त्यामुळे अनेक कोंबड्या ठार झाल्या. कोंबड्यांचा टेम्पो पलटल्याचा पाहून तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली. त्यानंतर लोकांनी टेम्पोतील कोंबड्याची लूट केली.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात पिकअप वाहनातून दीड लाख किंमतीचा कोंबड्याची वाहतूक केली जात होती. या कोंबड्यांना पॉल्ट्री फार्मवर घेऊन जाताना हा अपघात झाला. त्यानंतर कोंबड्या पळवण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडल्याचे दिसून आले.

आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेचा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यात कोंबड्या घेऊन पळतानाचे लोक कॅमेऱ्यात कैद झाले.

या अपघातानंतर पलटल्या वाहनांना क्रेनच्या सहाय्याने पुन्हा उभे करण्यात येत होते. त्यात कोंबड्यांचा टेम्पो रस्त्याकिनारी उभा केला गेला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक या टेम्पोवर तुटून पडले. ज्याच्या हातात जितक्या कोंबड्या येतील ते घेऊन ते घटनास्थळाहून पसार होत होते.

इतकेच नाही तर लुटीवेळी अजब नजारा पाहायला मिळाला. काही लोकांनी कोंबड्या भरण्यासाठी पोती आणली होती. त्यात कोंबड्या खचाखच भरून ते घेऊन जात होते. या प्रकाराने हे दृश्य बघणारेही हैराण झाले.

आग्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यांमुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या वाहनांमध्ये बस, कार, टेम्पो यांचा समावेश होता. त्यातील एक कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो होता.

भारतात उत्तरेकडे सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके पसरते, या धुक्यामुळे अनेकदा समोरचे काहीच दिसत नाही. केवळ पहाटेच नव्हे तर काही ठिकाणी दिवसभर धुके पसरलेले असते.

थंडीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यात शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी लवकर शाळा असल्याने भीषण थंडी आणि त्यात धुके याचा सामना करत मुलांना जावं लागतंय. त्यातून पालकांनी प्रशासनाकडे दिलासा देण्याची मागणी केली आहे.