शाब्बास! लेकीसाठी आईने नोकरी सोडली, TV पाहिला नाही; 'या' प्रश्नांची उत्तर देत मुलगी झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 02:17 PM2023-06-21T14:17:03+5:302023-06-21T14:22:39+5:30

IAS Jagrati Awasthi : UPSC 2020 दुसरी टॉपर जागृती अवस्थीच्या आईने आपल्या मुलीला अधिकारी बनवण्यासाठी नोकरी सोडली होती.

UPSC परीक्षा ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या स्पर्धा परीक्षेतील टॉपर्सही आपल्यातीलच आहेत. प्रत्येक टॉपरची स्वतःची कहाणी असते, कोणी खूप संघर्ष करून, कोणी त्याग करून, कोणी कुटुंबाच्या मदतीने तर कोणी नोकरीची तयारी करून इथपर्यंत पोहोचले आहेत.

UPSC 2020 दुसरी टॉपर जागृती अवस्थीच्या आईने आपल्या मुलीला अधिकारी बनवण्यासाठी नोकरी सोडली होती. तसेच तिच्या कुटुंबाने मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन असलेला टीव्हीही बंद केला होता. जागृतीने टॉप करून सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे.

जागृती अवस्थी ही मध्य प्रदेशची रहिवासी आहे. तिच्या सक्सेस स्टोरीतून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. जागृतीने मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MANIT), भोपाळ येथून इंजिनिअरिंग पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये काम करायला सुरुवात केली.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने नोकरी सोडली. तिचे वडील डॉ. एस. सी. अवस्थी हे प्राध्यापक आहेत आणि आई मधुलता अवस्थी शाळेत शिक्षिका होत्या. धाकटा भाऊ सुयांश अवस्थी शिक्षण घेत आहे. मुलीच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून आईने नोकरी सोडली होती.

जागृती अवस्थीने तिची तयारी दिल्ली येथील आयएएस कोचिंग (आयएएस कोचिंग इन दिल्ली) पासून सुरू केली. तिला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. पण तिने हार न मानता पुन्हा तयारी करायला सुरुवात केली.

कोरोना लॉकडाऊनमुळे ती दिल्लीहून भोपाळला आली. त्यानंतर घरीच बसून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. यावेळी तिच्या घरी टीव्हीही चालू नव्हता. IAS अधिकारी होण्यासाठी जागृती अवस्थीने खूप मेहनत घेतली. ती रोज 12-14 तास अभ्यास करायची. मॉक टेस्ट आणि रिव्हिजन केली,

जेव्हा UPSC निकाल 2020 जाहीर झाला, तेव्हा ती Ctrl+F सह शीर्ष 50 यादीत तिचं नाव शोधत होती. गुणवत्ता यादीत तिचं नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पाहून तिला प्रचंड आनंद झाला. UPSC मुलाखतीत जागृती अवस्थीला अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.

गायत्री मंत्राचा लेखक आणि कालिदास यांच्या कार्याशी संबंधित प्रश्नांना तिने काही सेकंदात उत्तरं दिली. मुलाखत 30 मिनिटे चालली. मध्य प्रदेश पर्यटन आणि बॉलीवूडशी संबंधित प्रश्नही होते.

मध्य प्रदेशातील पर्यटन वाढवण्याच्या प्रश्नावर जागृतीने बॉलिवूडला चित्रपटाच्या शूटिंगसाठी आमंत्रित केले पाहिजे, असं सांगितलं होतं. जागृतीच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.