...म्हणून रुपानींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; मोदी-शहांच्या गुजरातमध्ये नेमकं चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 09:06 PM2021-09-11T21:06:07+5:302021-09-11T21:09:04+5:30

गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली; विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री रुपानी यांचा राजीनामा

गुजरात विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याआधी विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्यामागचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपसाठी परिस्थिती ऑल इज वेल नसल्याचं समोर आलं आहे.

रुपानी यांचा राजीनामा गुजरात सरकार योग्यपणे काम करत नसल्याची कबुली आहे का? आणि सरकार उत्तम काम करत होतं, मग त्यांचा राजीनामा का घेतला गेला? असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलणं भाजपसाठी नवीन नाही. भाजपनं नुकतेच उत्तराखंड आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले आहेत.

निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय काही वेळा मास्टरस्ट्रोक ठरतो. मात्र काही वेळा तो बुमरँगदेखील होऊ शकतो. सरकारबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी अनेकदा मुख्यमंत्री बदलाची खेळी खेळली जाते. मात्र ही खेळी उलटूदेखील शकते.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची हाती सूत्रं हाती घेतल्यानंतर भाजपनं गुजरातेत निवडणुकीआधी दोनदा मुख्यमंत्री बदलले. मोदी पंतप्रधान झाल्यावर आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री झाल्या. मात्र २०१६ मध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रुपानी मुख्यमंत्री झाले. भाजपनं त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसनं भाजपला त्यांच्या होम ग्राऊंडवर जबरदस्त टक्कर दिली.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला कडवी लढत दिली. १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपला १०० जागादेखील जिंकता आल्या नव्हत्या. त्यावेळी पाटीदारांचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल आता काँग्रेसमध्ये आहेत.

गुजरात भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यात भाजपचं वर्चस्व वाढण्यामागे पाटीदार समाजाचा मोठा हात आहे. मात्र आता याच मतांवर काँग्रेसनं लक्ष केंद्रीत केलं आहे. एप्रिल-मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना अहमदाबादमधील स्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपची दमछाक होऊ शकते. याची कल्पना भाजप नेतृत्त्वाला आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये भाजपच्या व्होटबँक असलेल्या पाटीदार आणि ओबीसींमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला. पाटीदार समाजाच्या आनंदीबेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा दिल्यानं ओबीसींचा असंतोष वाढला. त्यामुळे २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीला वर्ष असताना बिगर पाटीदार आणि बिगर ओबीसी नेत्याला प्रदेश भाजपची जबाबदारी दिली गेली.

पाटीदार, ओबीसी समुदायातील नेत्यांना मुख्यमंत्रिपदी संधी दिल्यास दोघांपैकी एक समाज नाराज होणार याची जाणीव भाजप नेतृत्त्वाला होती. त्यामुळे विजय रुपानींकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं देण्यात आली. रुपानी बनिया समाजाचे आहेत. पक्षातील गटबाजीचं राजकारण कमी करण्यासाठी रुपानींकडे राज्याची धुरा दिली गेली.

आता विधानसभा निवडणुकीला काही महिने असताना रुपानी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे पुढील निवडणूक भाजपसाठी नक्कीच सोपी असणार नाही. गुजरातमध्ये १९९५ पासून भाजप सत्तेत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं गुजरातमध्ये भाजपला जबरदस्त टक्कर दिली होती. आता २६ वर्षांचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.