PHOTOS: खड्ड्या-खड्ड्यांचा तुडवीत रस्ता, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 03:10 PM2022-10-15T15:10:47+5:302022-10-15T15:39:26+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस समर्थक भक्कमपणे लढताना दिसत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस समर्थक भक्कमपणे लढताना दिसत आहे.

काश्मीर ते कन्याकुमार या प्रवासात पायी निघालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज ३८ वा दिवस आहे. सध्या ही यात्रा सध्या कर्नाटकात सुरू आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यात्रेतील राहुल गांधी यांचे फोटोसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याअगोदर त्यांचे पावसातील भाषण व्हायरल झाले होते, आता पाण्याच्या टाकीवर भारताचा झेंडा घेतलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. राहुल गांधींना तरुण वर्गाचं प्रेम मिळत असल्याचं व्हायरल फोटोंवरुन दिसून येतं.

कधी पावसात भाषण, कधी टाकीवर चढून तिरंगा हाती घेतल्याचे फोटो तर कधी खड्या-खड्यांमधून मार्ग काढताना राहुल गांधी दिसत आहे. त्यांच्या या वारीत अनेक तरुण-तरुणी त्यांना भेटण्यासाठी पुढे येत आहेत.

आपल्या भेटीसाठी आलेल्या सर्वांना ते भेटण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत सेल्फी घेतात, फोटोशूटही करताना दिसून येतात. काही अपंग बांधवही त्यांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाले.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

सात सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या पन्नास हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत आहे.

देशात चैतण्यमय वातावरण आहे. आजपर्यंत ३५६० किलोमीटरची पदयात्रा जगाच्या पाठीवर कोणीही काढलेली नाही. महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून यात्रा सुरु होणार असून नांदेड ,हिंगोली,वाशीम,अकोला,बुलढाणा असा ३८१ किलोमीटरचा प्रवास आहे.

२०१४ पासून देशात ज्या पद्धतीची राजवट सुरु आहे, त्यामुळे लोकशाही, स्वायत्त संस्था धोक्यात आलेल्या आहेत. याशिवाय राज्यघटना,मुलभूत तत्व,आपल्या मतांचा अधिकार हे पुढच्या काळात राहील ना राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

विकासाची कामे ठप्प झालेली आहेत. बिघडलेली अर्थव्यवस्था,महागाई,प्रचंड बेरोजगारी या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे सोडून अन्य गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच, या सर्व गोष्टींच्या विरुद्ध देशाला एकजूट करण्यासाठी ही यात्रा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

दरम्यान, राहुल गांधी यांचाही जोश या यात्रेमुळे वाढला असून त्यांच्या भाषणांना, सभांना आणि पदयात्रेतील रॅलीलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये या यात्रेमुळे ऊर्जा निर्माण झाली आहे.