Maharashtra Political Crisis: ३० वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला ढासळला! ठाकरेंना धक्का; नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 10:09 AM2022-07-29T10:09:39+5:302022-07-29T10:15:33+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या अभेद्य बालेकिल्ल्यात पडलेली उभी फूट उद्धव ठाकरेंसाठी टेन्शन वाढवणारी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

राज्यभरातून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

यातच आता पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सक्रीय होत शिंदे गटाविरोधात दंड थोपटले आहेत. ज्या ज्या भागातून बंडखोरी झाली आहे, त्या त्या ठिकाणी शिंदे गटातील नेत्याला पर्यायी तगडा नेता शोधण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेचे आमदार, खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होत आहेत. ३० वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये उभी फूट पडली आहे. परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार शिंदेंच्या गटामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण थेट गेले. काही जण पडद्याआडून गेले. काही जण अजूनही जाण्याच्या मार्गावर आहेत. तर काही जणांचे अडले आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये फूट पडली नव्हती. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या अभेद्य बालेकिल्ल्यात फूट पडली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात जनतेतून निवडून आलेले खासदार संजय जाधव, परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील हे सध्या तरी गेल्या ३० वर्षांचा इतिहास पाहून शिवसेनेसोबतच आहेत.

दरम्यान, दुसरीकडे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

शिवसेनेसोबत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. याचीच झलक उद्धव ठाकरेंनी तीन मतदारसंघात दाखवलीय आणि यानंतर शिवसैनिकांचा वाढलेला उत्साह हा बंडखोरांचं टेन्शन वाढवणारा असल्याचे म्हटले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या सात आठ वर्षात भाजपने दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिले. दोन वर्षातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला टक्कर देत विजयाचा झेंडा फडकवू शकणारे अथवा फडकविण्यास हातभार लावू शकणारे नेते आता भाजपला हवे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.