अबब! राजमा-तांदूळ ५०० रुपये, बटाटा-कांदा २२० रुपये, 'ही' यादी पाहून चक्कर येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:58 PM2022-07-15T13:58:38+5:302022-07-15T14:01:07+5:30

श्रीलंकेच्या राजकीय संकटाचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील सरकारची आर्थिक धोरणे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक निर्णयांचा परिणाम असा झाला की, देशातील अन्नधान्य आणि रेशनच्या सामान्य वस्तूच्या वाढत्या दराने महागाईचा आगडोंब उसळला आहे.

लोकांना खाणे-पिणे कठीण झाले, परिणामी सरकारचा विरोध वाढला आणि आता अस्थिरतेचे वातावरण आहे. इथे उपलब्ध असलेल्या तांदूळ, खोबरेल तेल आणि राजमा यांसारख्या अनेक गोष्टींची किंमत जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल.

रेशनच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेची २ कोटीहून अधिक लोकसंख्या सध्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. जगात तांदूळ निर्यातदार असलेला श्रीलंका देश सध्या त्याचीच आयात करत असून त्याची किंमत ४५० ते ७०० रुपये आहे.

बटाटा-कांद्यासारख्या आणि सामान्य भाजीचा भाव २२० रुपये किलो झाला आहे, तर लसूणही केवळ २५० ग्रॅम १७० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष फैलावला आहे. त्याचे पडसाद श्रीलंकेत पाहायला मिळत आहेत.

नारळ आणि खोबरेल तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या श्रीलंकेत आजकाल नारळाची किंमत ८५ ते १०० रुपये प्रति नगावर पोहोचली आहे. तर खोबरेल तेलाला ६०० ते १००० रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे.

श्रीलंकेत अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. येथे राजमा ९२५ रुपये किलो, पॉपकॉर्न ७६० रुपये किलो आणि मसूर ५०० ते ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे.

काबुली हरभराही महाग झाला आहे. त्याची किंमत ८०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. त्याचबरोबर हिरवा वाटाणा ३५५ रुपये, हिरवे मूग ८५० रुपये, लाल राजमा ७०० आणि काळ्या हरभऱ्याला ६३० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे.

संकटकाळात वाटाणा, हरभरा या डाळींचे भाव वाढले आहेत. वाटाणा डाळ ५०० रुपये किलोने मिळत आहे, त्यामुळे चणा डाळीचा भावही ५०० रुपये किलोच्या वर आहे.

मुगाची डाळ आता श्रीलंकेत सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातून बाहेर गेली आहे. इथे १२४० रुपये किलो दराने विकली जात आहे. दुसरीकडे तूर डाळ ८९० रुपये किलोवर पोहोचली आहे, तर भुईमुगाचा दर ७६० रुपये आणि उडीद डाळ ८५० रुपये किलोवर पोहोचली आहे.

या रेशनच्या किमती श्रीलंकेच्या घाऊक बाजारातील किमतीवर आधारित आहेत. तर किरकोळ दुकानात त्यांची किंमत १० ते २०% आणखी अधिक आहे. त्यामुळे श्रीलंकेत सर्वसामान्य माणसाचं जगण मुश्किल झाले आहे.