पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:15 PM2024-05-01T17:15:09+5:302024-05-01T17:24:47+5:30

Pakistan Inflation Update : पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे.

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. वाढत्या महागाईविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत. पाकिस्तानात रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

खाद्यपदार्थांचा भाव सर्वसामान्यांना घाम फोडणारा आहे. तेथील नामांकित शहर असलेल्या कराचीत दुकान चालवणाऱ्या एका स्थानिकाने स्थानिक वृत्तसंस्थेला सांगताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

ते म्हणाले की, सातत्याने खाद्यपदार्थांच्या किमती वाढत आहेत. आम्ही आमच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा देखील देऊ शकत नाही. पण देशातील नेते मंडळी मौजमजा करत आहेत. चुकीच्या लोकांना मतदान केल्याची भावना जनतेत आहे. सत्ताधारी आमच्या गरजांकडे लक्ष न देता केवळ मजा करत आहेत.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कराचीत एक किलो पीठ घेण्यासाठी तब्बल ८०० रूपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी एक किलो पीठ २३० रूपयांत मिळत होते.

हे जरी पाकिस्तानी चलनानुसार असले तरी भारतीय चलनानुसार आजही एक किलो मैद्याची किंमत २३८ रूपये आहे. भारताचा एक रूपया म्हणजे पाकिस्तानचे ३.४५ रूपये आहेत.

पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार, आताच्या घडीला पाकिस्तानात खूप महागाई आहे. ३८ टक्के महागाई दर वाढला असल्याने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली असून, हा महागाई दर दक्षिण आशियात सर्वाधिक आहे. २०१६ नंतर प्रथमच अन्नधान्याच्या महागाई दराने (४८%) उच्चांक गाठला.

पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी भागात टोमॅटो १८८%, कांदा ८४%, भाज्या ५५%, मसाले ४९%, गूळ ४४%, साखर ३७%, बटाटा ३६% ने वाढला आहे.

एका वर्षात पीठ ३२% आणि मांस २२% कमी झाले. तर गॅसच्या किमती ३१९%, वीज ७३%, फर्निचर २२% आणि पुस्तकांच्या किमती ३४% पेक्षा जास्त वाढल्या आहेत.

पाकिस्तानात सातत्याने वाढणाऱ्या महागाईचे प्रमुख कारण म्हणजे अर्थव्यवस्थेची धिम्या गतीने सुरू असलेली वाटचाल. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने पाकिस्तानला कर्ज देताना काही अटी ठेवल्या होत्या, यामध्ये सबसिडी हटवण्याचा देखील मुद्दा होता.

यामुळे पाकिस्तानात अन्नधान्यांपासून मूलभूत गरजांपर्यंत सर्व काही महाग होत आहे. चलनही एका वर्षात कमकुवत झाल्याने आयात महाग झाली आहे.