भारताला अडकवण्यासाठी ड्रॅगनची चाल; निज्जरच्या हत्येला नवं वळण, चीनचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 02:11 PM2023-10-09T14:11:49+5:302023-10-09T14:23:27+5:30

कॅनडा आणि भारतातील वाढत्या तणावाला आणखी एक वळण मिळाले आहे. एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बराच वाद रंगला.

आता एका स्वतंत्र ब्लॉगर जेनिफर जेंगने याबाबत नवा दावा केला आहे. खलिस्तानी समर्थकाच्या हत्येमागे चीनचा हात असल्याचे म्हटलं आहे. जेंगने चीनची कम्युनिस्ट पार्टीच्या(सीसीपी) एजेंटचा यामागे हात असल्याचा आरोप केला आहे.

जेनिफर जेंग याने म्हटलं आहे की, चीनचा हेतू भारत आणि पश्चिमी देशांमध्ये कलह निर्माण करण्याचा होता. जेनिफर जेंग हे मूळचे चीनी नागरीक असून माहिती अधिकार कार्यकर्ता, पत्रकार आहेत. ज्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

सोशल मीडिया एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत निज्जरच्या हत्येबाबत हा दावा केला आहे. कॅनडात निज्जरची हत्या झाल्याचा खुलासा सीसीपीच्या गोटातून देण्यात आली. ही हत्या सीसीपीच्या एजेंटकडूनच करण्यात आली होती. ब्लॉगर जेंग यांनी चीनी लेखक, युट्यूबर लाओ डेंग यांचा उल्लेख करत त्यांच्या हवाल्याने बातमी दिली, डेंग हे कॅनडात राहत आहेत.

यावर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची ब्रिटीश कोलंबिया इथं गुरुनानक शिख गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून चेहरा लपवला होता.

लाओ यांनी सांगितले की, यावर्षी जून महिन्यात चीनकडून एक उच्च अधिकाऱ्यांनी इग्निशन प्लॅनचा भाग म्हणून सिएटल पाठवले होते. त्याठिकाणी एक गुप्त बैठक झाली. भारत आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध खराब व्हावे असा चीनचा हेतू होता.

चीनने त्यांच्या एजेंट्सना कॅनडात शीख नेते हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्याचे काम सोपावले होते. बैठकीनंतर सीसीपी एजेंटने अत्यंत हुशारीने हत्येची योजना अंमलात आणली असा दावा चीनचे लेखक लाओ डेंग यांनी केला आहे.

इतकेच नाही तर ब्लॉगरने म्हटलंय की, १८ जूनला साइलेंट बंदूक लेंसने निज्जरला ट्रॅक करण्यात आले. जेव्हा काम पूर्ण झाले तेव्हा पुरावे मिटवण्यासाठी निज्जरच्या कारमधील डॅश कॅमेरा नष्ट करण्यात आला. त्यानंतर एजेंट तिथून पळून गेले.

निज्जरच्या हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रेही जाळून टाकण्यात आली. दुसऱ्याच दिवशी कॅनडा सोडून हे सगळे पळाले. निज्जरच्या मारेकऱ्यांनी जाणुनबुजून भारतीय इंग्रजी शिकली होती. अद्याप जेनिफर जेंगच्या आरोपांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

कॅनडाने भारतावर निज्जर हत्येचा आरोप केल्यानंतर भारतानेही आक्रमक भूमिका घेतली. कॅनडाने आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलवावे असं त्यांनी स्पष्ट केले. भारताने आधीच कॅनडातील आपली व्हिसा सेवा बंद केली आहे