Astro Tips: तुळशीच्या पानात आहे सर्व समस्या दूर करण्याची ताकद; झोपण्यापूर्वी करा दिलेला उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:52 AM2024-02-21T10:52:15+5:302024-02-21T10:54:15+5:30

Astro Tips: ज्यांचे व्यक्तिगत नातेसंबंध चांगले असतात ते लोक व्यावसायिक आयुष्यातही यशस्वी होतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. आपले आई वडील आपल्या चुका पोटात घेतात, भाऊ-बहिणीशी झालेली भांडणं काही काळात विसरली जातात, पण मुख्य नातं असतं ते नवरा बायकोचं! या नात्यात वितुष्ट आले तर त्या ताणतणावामुळे व्यक्तीचा विकास थांबतो आणि एकूणच जीवन विस्कळीत होते. म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले सोपे उपाय करून तुमचे नाते दृढ करा.

सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे. या वनस्पतीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते. यासोबत तुळशीला पाणी दिले जाते. असे मानले जाते की या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर नेहमी राहते. जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना तुळशी आवडते. त्यामुळे त्यांच्या नैवेद्यात तुळशी दलाचा समावेश केला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि नातेसंबंध सुधारतात. जाणून घेऊया तुळशीच्या या चमत्कारिक उपायांबद्दल.

तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवत असेल तर ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या उपायांचे पालन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीची पाच पाने उशीखाली ठेवा. तुळशीत नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद आहे. या उपायाने घरात सुख-शांती राहते आणि वैवाहिक नातेसंबंध सुधारून मनही शांत होते.

व्यावसायिक, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांनीदेखील वरील उपाय केला असता त्यांना त्यांच्या क्षेत्रात येत असलेल्या अडचणीतून मार्ग मिळण्यास मदत होते. नोकरी-व्यवसायात यश मिळते. मात्र हा उपाय नियमित करायला हवा. तरच त्या उपायाचा लाभ होऊन जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होईल असे ज्योतिष शास्त्र सांगते.

घरात अशांततेचे वातावरण असेल तर देवघरात ठेवलेल्या गंगोदकात अर्थात गंगेच्या पाण्यात किंवा देवाच्या पूजेच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडून घ्या. असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात शांती नांदते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

तुमच्या घरातून आजारपण जात नसेल किंवा महत्त्वाच्या कामात काही अडथळे येत असतील तर तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करा. तसेच गायत्री मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील असा विश्वास आहे.