परभणी : अतिक्रमण न हटवताच रस्त्यांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:49 AM2019-03-30T00:49:14+5:302019-03-30T00:49:48+5:30

शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याचे पहावयास मिळत आहे.

Parbhani: Road breaks without demolishing encroachment | परभणी : अतिक्रमण न हटवताच रस्त्यांची तोडफोड

परभणी : अतिक्रमण न हटवताच रस्त्यांची तोडफोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याचे पहावयास मिळत आहे.
शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. मध्यवर्ती भागातील आणि शहराबाहेरील वसाहतींमध्येही मागील काही दिवसांपासून हे काम सुरू झाले आहे. प्रत्यक्षात जलवाहिनी टाकताना कामाचा आराखडा तयार करणे अपेक्षित होते. जलवाहिनी टाकण्याच्या कामात किती अतिक्रमणे आहेत, ती कोणी व कशी काढायची, याचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र त्यास फाटा देण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काही वर्षांपूर्वी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. दीड ते दोन फूट जाडीचे हे रस्ते असून जलवाहिनी टाकण्यासाठी चक्क हे रस्ते फोडण्यात येत आहेत. नालीच्या बाजुने जलवाहिनीचे काम झाल्यास रस्त्याचे कमीत कमी नुकसान होऊ शकते. बाजारपेठ भाग आणि जुन्या गल्ल्यांमध्ये बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांनी घराच्या पायरा रस्त्यावर उतरविल्या आहेत. तर बाजारपेठेत व्यावसायिकांचे शेड रस्त्यावर आले आहे. जलवाहिनी टाकताना ही अतिक्रमण काढणे आवश्यक आहे; परंतु, कोणतीही कारवाई न करता किंवा कोणाला नाराज न करता मनमानेल त्या पद्धतीने जलवाहिनी वळविली जात आहे. परिणामी मजबूत रस्त्यांचे खोदकाम करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.
जलवाहिनी अंथरण्याच्या या कामावर मनपा आयुक्त, शहर अभियंत्यांचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अनेक भागात अतिक्रमणे जशाच तशी ठेवून अतिक्रमणांना वळसा घालून जलवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणेल त्या प्रमाणे जलवाहिनी टाकली जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. बाजारपेठ भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत; परंतु, ही अतिक्रमणे हटविण्याची तसदी मनपाचे अधिकारी घेत नाहीत.
शहरातील पाण्याचा प्रश्न महत्त्वपूर्णच आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामाला प्राधान्य देण्याचे गरजेचे असून हे काम दर्जेदार व कायमस्वरुपी व्हावे, यात शंका नाही. मात्र या कामासाठी अनेक भागात गरज नसताना रस्ते फोडणे अयोग्य आहे. रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे हटवून खोदकाम केले असते तर रस्त्यांचे होणारे नुकसान टळू शकते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन काम उरकून घेतले जात आहे.
रस्त्यांची दुरवस्था
४जलवाहिनी व केबल टाकण्याच्या कामावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिंतूररोडवर खोदकामातून निघालेली माती रस्त्याच्या कडेला टाकली आहे. तसेच हे यासंदर्भातील खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत. त्यामुळे प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर माती साचली असून वाहनधारकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरत आहे. शिवाजी पार्क भागातही खोदकामातील मोठे दगड, माती रस्त्याच्या कडेला तसेच ठेवल्याने वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे. परिणामी नागरिक त्रस्त आहेत.
लाखो रुपयांच्या रस्त्याची तोडफोड
४शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे; परंतु, मध्यवर्ती भागात काही वर्षांपूर्वीच दीड ते दोन फूट जाडीचे मजबूत रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली होती; परंतु, सध्या कुठल्याही नियमांचे पालन न करता रस्त्यांची तोडफोड केली जात आहे.
४कमीत कमी तोडफोड करुन जलवाहिनी टाकणे शक्य असताना काही जणांच्या मर्जीखातर रस्त्यांची तोडफोड केली जात असून या भागातील रस्ते खोदकामामुळे पुन्हा एकदा धोकादायक होत आहेत.नानलपेठ कॉर्नर ते नांदखेडा रोड हा संपूर्ण रस्ता एका बाजूने फोडून ठेवला आहे. तसेच रंगनाथ महाराज नगर, कच्छी बाजार, शिवाजी चौक, भिकूलाल पेट्रोलपंप आदी भागामध्ये सिमेंट रस्ते फोडण्यात आले आहेत.
४काही भागात तर हा रस्ता मधोमध खोदून ठेवला आहे. तसेच जिंतूर रोडवरही गणपती चौकापासून ते जांब नाक्यापर्यंत खोदकाम झाले आहे. या कामाच्या दरम्यानही मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यांवर खोदकाम करुन ठेवले आहे; परंतु, ते व्यवस्थित बुजविले नसल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ताही धोकादायक बनला आहे.

Web Title: Parbhani: Road breaks without demolishing encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.