लेहमध्ये भेटेल त्याला ‘जुले’ म्हणायचं हे घरबसल्या का कळेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:19 PM2018-09-28T17:19:41+5:302018-09-28T17:22:43+5:30

‘काय करू वेळच नसतो’ या वाक्याने आपली विकेट घेण्याआधी प्रवासाचा नाद लावून घ्यायला हवा. मनाच्या खिडक्या, दरवाजे खुले ठेवायचा तो सगळ्यात सुरेख तरीका आहे.

what travel gives you, shares aditi moghe | लेहमध्ये भेटेल त्याला ‘जुले’ म्हणायचं हे घरबसल्या का कळेल?

लेहमध्ये भेटेल त्याला ‘जुले’ म्हणायचं हे घरबसल्या का कळेल?

Next
ठळक मुद्दे‘आहे हे असं आहे’ म्हणत हे जग प्रवास दाखवतात.

- आदिती मोघे

Comfort zone is a beautiful place, but nothing ever grows there.

असं एक वाक्य कधीतरी मी वाचलं होतं.
घर म्हणजे आपल्या ओळखीची माणसं, प्रांत, भाषा समजूया. घरी वावरताना सोपं जातं, ते रोजचं वाटतं, त्यासाठी काही धडपड नाही करावी लागत आणि मग वर्ष बदलत जातात, आपण एका साच्याचे होऊन जातो. त्याच्यात काही वाईट आहे असं नाही. पण जसे आपण 10 वर्षाचे असताना होतो, तसेच 20व्या वर्षी असू, तसेच 50व्या आणि त्याच त्याच साच्यात बसून आपण सत्तरी गाठली तर मग एका प्रकारे आपण जगणं कधीच सोडून दिलं आहे आणि ऑटो पायलट मोडवर जगतो आहोत असं होईल. त्यापेक्षा जगण्याची मजा घ्यायचे खूपच भारी तरीके आहेतच.
प्रवास आपल्या सवयींना सातत्याने आव्हान देत राहतात.
सतत संभाषण आपण सुरू करायचं आहे हे प्रवासच शिकवतात. प्रवास आपल्याला स्वतर्‍ची कंपनी एन्जॉय करायला शिकवतात. मोबाइलला नेटवर्क नाही, जंगलात, खेडय़ापाडय़ात वीज नाही अशा ठिकाणी वेळ कसा घालवायचा अशा स्टेजला जर तुम्ही असाल तर नक्की प्रवासाला बाहेर पडायला हवं.
तुमचं काहीतरी बिनसलं असेल, तुमच्यातलं काहीतरी हरवलं असेल, फक्त आपल्याच बाबतीत काहीतरी खूप अन्यायकारक कायमच होत असतं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रवासाला बाहेर पडायला हवं.
मीच आहे, मला जमलं, मला सगळं आलं, असं झालं असेल तरीही जायला हवं आणि काय अर्थ आहे आयुष्याचा तसंही, आपण नोबडी असतो शेवटी याची खात्री वाटायला लागल्यावरही!
आपली मतं, आपला कडवटपणा, आपल्याला असलेली खात्री, विश्वास, प्रेम यातली कुठलीच गोष्ट एका दिवसात उभी राहिलेली नसते. त्यामुळे प्रवाससुद्धा काही इन्स्टण्ट रिलिफची गोळी नव्हे. पण डोळे उघडे ठेवून बाहेर पडलो जर तर प्रवास आपल्याला बैचन करवतात, आपल्या सुखाच्या, दुर्‍खाच्या कल्पना भुईसपाट करतात, आपण किती चांगलो आहोत याबद्दल सुखद जाणीवसुद्धा करून देतात. आणि कधी कधी आपल्या कोतेपणाबद्दल जाबही विचारतात. 
आपण व्याख्यांमध्ये, आपण कोण आहोत हे घासूनपुसून लखलखीत अधोरेखित करण्यात रमलो आहोत, प्रवास आपल्याला यात वेळ घालवायची काहीच गरज नाही हे लक्षात आणून देतात. 
आपण जिथे जन्मतो, ज्या संस्कृतीत मोठे होतो त्यानुसार आपल्या आनंदी आणि सुखी आयुष्याच्या व्याख्या बनलेल्या असतात. पण जगात केवढे देश आहेत, जमाती आहेत, संस्कृती आहेत, कल्पना आहेत. आणि त्या सगळ्यांच्या आपल्याला आपल्या व्याख्या आहेत. 
‘आहे हे असं आहे’ म्हणत हे जग प्रवास दाखवतात. त्यातलं काही अंगाला लावून घ्यायला हवं असं नाही. पण ते बघायला नक्की हवं.
‘मी सतत बरोबर असते/असतो’ हा हट्ट सोडायला लावतात प्रवास. सगळेच आपल्या आपल्या परीने आणि आपल्या आपल्या कारणांसाठी बरोबर असू शकतात हे समजून घेण्याच्या जागेर्पयत आपल्याला पोहोचवू शकतात प्रवास.
हे घरी बसून येऊ शकत नाही का? येऊ शकत असेलही. पण लेहमध्ये भेटू त्या सगळ्यांना ‘जुले’ म्हणायचं, आणि बुद्ध लामांना ‘छगसाल’ हे घरबसल्या का कळेल?
थायलंडमध्ये लोक फक्त मुलं जन्माला घालायचं आहे असं ठरलं तरच लग्न करतात, नाहीतर नाही हे कसं कळेल? 
ऑस्ट्रेलियामध्ये मुलींची दर शेकडा संख्या मुलांपेक्षा जास्त आहे हे कळायचं अदरवाईज काहीच कारण नाही आणि स्वित्झर्लंडमध्ये एकेकाळी कोंबडीवरसुद्धा कोर्टाचा खटला भरलेला आहे ही गमतीशीर माहिती आपल्यार्पयत कशी पोहचेल? 
खरं तर प्रवास हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही, आपले पूर्वज सरसकट (अपवादवगळता) काय आहे जगात ते शोधायच्या भानगडीत पडले नाहीत, आणि तरीही जग फिरून एखाद्याला येईल तेवढं शहाणपण त्यांनी घरबसल्या कमावलं असं म्हणूया; पण बाकी जगात बाहेर पडणं, स्वतर्‍ला शोधणं, स्वतर्‍ला हरवणं, आपली मोडतोड होऊ देणं या गोष्टी खूप जुन्या आहेत. अनेक देशातले लोक अर्ध वर्ष काम करतात, उरलेलं अर्धं वर्ष प्रवास करतात.
राजकारण, कला, भाषा, भूगोल, खेळ, खाद्यसंस्कृती आणि इतिहास या गोष्टीबद्दल घ्यावी तितकी माहिती कमीच आहे. प्रवास हे सगळं एकत्र साधायचा क्रॅश कोर्स आहे असं म्हणूया.
एअर बीएनबी असो, क्वीन या हिंदी सिनेमात दाखवलेलं होस्टेलचं जग असो, किंवा काऊचसर्फिग सारखं जगभरातल्या बजेट ट्रॅव्हलर्सना कनेक्ट करणारं माध्यम असो, हे सगळं अनुभवायची सुरुवात कॉलेजपासूनच करायला हवी.
‘काय करू वेळच नसतो’ या वाक्याने आपली विकेट घेण्याआधी प्रवासाचा नाद लावून घ्यायला हवा. मनाच्या खिडक्या ,दरवाजे खुले ठेवायचा तो सगळ्यात सुरेख तरीका आहे.

(आदिती पटकथा लेखक आहेच मात्र फिरस्तीचं तिला जबरदस्त वेड आहे. हा लेख थेट लेहमध्ये भटकंती करताना तिनं लिहिला.)

Web Title: what travel gives you, shares aditi moghe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.