एकटेपणा येतो, त्याचं करायचं काय? कॉफी आणि उघडं दार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 10:22 AM2017-12-07T10:22:24+5:302017-12-07T14:41:24+5:30

फॉरवर्डची ढकलगाडी आपण नेहमी ढकलतो. तसाच एक मेसेज आपण अलीकडेच बराच फिरवला. तो सांगत होता, कधी एकटं वाटलं, अगदी बोलावंसं वाटलं, तर माझ्या घरी या, माझं दार उघडंच आहे. पण असं जाऊ का आपण कुणाकडे? म्हणू कुणाला, बस माझ्याजवळ मला एकटं वाटतंय? अशी असतात का खरंच दारं कुणाची उघडी? आणि मनाची दारं? ती उघडतील पटकन कुणासमोर?

What is loneliness? | एकटेपणा येतो, त्याचं करायचं काय? कॉफी आणि उघडं दार

एकटेपणा येतो, त्याचं करायचं काय? कॉफी आणि उघडं दार

Next

- प्राची पाठक
फोनमध्ये काहीही आले की वाचून, किंवा न वाचताच फॉरवर्ड करायची सवय आपल्याला इतकी पटकन कशी लागली असेल?
एरवी आपण म्हणतो, सवयी बदलता येत नाहीत, सवय लागायला खूप वेळ लागतो, आळस आड येतो, वगैरे. पण ही फॉरवर्ड करायची सवय कशी सहज लागली आपल्याला. लोकांना नकोसे होतील इतके फुकाचेच गुड मॉर्निंग आणि गुड नाइट मेसेजेस आपण पाठवत राहतो. कोणी निरर्थक फॉरवर्ड्स पाठवू नका म्हटलं तर अनेकांना राग येतो. दुसºयांना वैताग येईपर्यंत आपण फॉरवर्ड ढकलतच असतो. ही सवय अशी कशी काय चटकन लागली आपल्याला?
विचार केलाय कधी?
सवय हा एक वेगळाच विषय आहे.
पण अलीकडेच एक मेसेज तुफान फॉरवर्ड होत होता. खूप फिरला तो मेसेज.
त्यात काय म्हटलं होतं..
‘तुम्हाला एकटं वाटत असेल, जीव द्यावासा वाटत असेल, तर एक कप कॉफी प्यायला माझ्याकडे या. माझं दार खुलं आहे.’
साधारण अशा अर्थाचं ते फॉरवर्ड होतं. ते शेअर करून/फॉरवर्ड करून खचलेल्या, आत्महत्या करायला प्रवृत्त होणाºया, एकटं वाटणाºया कोणालाही आपण किती छान दिलासा दिला, असे आभासी समाधान अनेकांनी या कृतीतून मिळवले. आपण एरवी फार काही करू शकत नाही कोणासाठी, निदान फॉरवर्ड तर करावं, म्हणून देखील काहींनी ते फिरतं ठेवलं.
सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं, ‘एक कप कॉफी प्यायला दार उघडं आहे.’
कोणी कोणी तर इतर करतात म्हणून स्वत:ने देखील ते फॉरवर्ड केलं. कोणाला वाटलं यातून जागृती होणार तर काय वाईट?
अर्थातच काही प्रमाणात जागृती झालीच. पण जागृत होऊन प्रत्यक्ष कुठं जायचं असेल कोणाला तर नक्की कोणत्या मित्राकडे, मैत्रिणीकडे जावं ते त्यात नव्हतं, कोण कुठे राहतं ते त्यात नव्हतं. केवळ माझ्याकडे या, असं जेव्हा सर्वजण सांगतात तेव्हा त्यात स्पेसिफिक मदत अशी काहीच नसते. ही कृती केवळ फॉरवर्ड करणाºयाला समाधान, मी काहीतरी केलं, एखादा संदेश वाहून नेला, अधिकाधिक लोकांना वाचता येईल असं बघितलं, इतकीच मर्यादित राहते. हा मेसेज फॉरवर्ड करणाºया व्यक्तीला सुद्धा कधी फार एकटं वाटलं तर नेमकं कोणाकडं जावं कॉफी प्यायला, याबद्दल कसं ठरवता येईल? तो नक्की गोंधळून जाणार. कोणाकडे केव्हाही कसं जाता येईल, या प्रश्नाचं त्यात उत्तर नव्हतं. जाणं इतकं सहज असेल का? आपल्या घराजवळ कोण असेल, किती प्रवास करून कोणाकडं जावं लागेल त्यापेक्षा आपण आहोत तसेच ठीक होऊन जाऊ का? असा विचार प्रत्यक्ष कृती करताना आधी समोर आला असता.
आपण अगदी तापानं फणफणत असू तर घराजवळच्या, नेहमीच्या डॉक्टरकडे जायचं असतं तरीदेखील आज बघू, उद्या जाऊ असं करत काही वेळ का होईना ते दुखणं अंगावर काढतो. इथे तर ओळख ना पाळख सगळ्या व्यक्ती नुसत्या फॉरवर्ड करत सुटल्या आहेत, माझं दार खुलं आहे. पण ते दार कुठं आहे, हे कसं कळणार?
अचानक कोणाच्याही घरी असं कसं आणीबाणीत जाता येईल, या प्रश्नांची उत्तरं खरंच एखाद्याला (अशी मदत लागलीच तर) विशेष मिळत नाहीत. पुन्हा, त्यातील सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षिला जातो. दाराशी येणाºया कुरिअरवाल्याकडेही अनेकजण संशयानं बघतात. एकटी-दुकटी माणसं घरात असतात. अशावेळी कोण उठून कोणासाठी दार उघडं ठेवणार? किती वेळ ठेवणार?
पण तरीही एकटं वाटलं तर बोला कोणाशीतरी, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सोबत राहा, इतपत संदेश हे मेसेज पोहचवतात. अर्थात तेही कुणी वाचून फॉरवर्डकेले असतील, त्यातला मतितार्थ समजून घेतला असेल तर? अनेक फॉरवडर््स न वाचताच शेअर होत असतात, ते वेगळेच. एकटेपणा, त्याविषयी बोलणं, तसं माणूस हक्काचं असणं हे सारं नीट समजून मात्र घ्यायला हवं.

-  prachi333@hotmail.com


कधी वाटतं एकटं? भरल्या घरात, दोस्तांच्या मैफलीतही?

एकटं वाटणं. ही एक भावना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या मनात येत असते.
कधी थेट एकटे नसाल. पण भरल्या घरात एकटे असाल. मित्र यादीत, फोनच्या लिस्टमध्ये शेकडो नावे सेव्ह आहेत आणि तरीही गरजेला कोणी नाही असं होतंच. ‘मला पेन दे रे जरा’ हे जितकं सहज मागितलं जातं तसं ‘बस माझ्यासोबत थोडं, मला एकटं वाटतं आहे’, असं इतकं सहज बोललं जात नाही. आपल्या एकटेपणात दुसºयाची मदत घेण्यात संकोच असतो. अर्थात दुसरा आपल्यासाठी रिकामाच बसलेला नसतो. सतत मदत घेतली तर आपल्याला त्याची सवय होईल का, दुसरा आपल्याला काय म्हणेल, कंटाळेल का, असे प्रश्न सतावत असतात. आजूबाजूला माणसं खूप; पण बोलायला कोणी नाही, हे वाटणं अजूनच एकटं पाडतं.

‘मला कोणी समजूनच घेत नाहीत’, ‘माझ्याबाबत नेहमी गैरसमजच केले जातात’, असे दोन, तीन, चार प्रसंगात घडले तर आपण आतल्या आत कोलमडून पडतो. जरा धीर एकवटून कोणाची सोबत शोधायला, चार शब्द बोलायला जातो, तर आपल्याला समजून घेतलं जात नाही, ही भावना घेऊन परततो. पुन्हा असं करणं नकोसं होऊन जातं अगदी. कोणाची मदत नको, आपण एकटंच बरं हेही मनावर बिंबवतो. या सगळ्यातून आपण अजूनच एकटे पडतो. हे एकटेपण आधी समजून घ्यावं लागतं आणि मग त्यावर लहान लहान उपाय शोधावे लागतात. पुढील भागात ते समजून घेऊच. तोवर, कधी आणि आठवड्यातून, महिन्यातून कितीवेळा आपल्या मनात ‘आपण एकटे आहोत, एकटे पडलोय’ असा विचार येऊन जातो, ते स्वत:लाच विचारूयात. हे तर जमेल ना? पण हा विचार सध्या मनातच ठेवू, फॉरवर्ड न करता!

 

Web Title: What is loneliness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.