स्टेटसच्या अमली सिम्बॉलचे बळी

By Admin | Published: November 17, 2016 05:18 PM2016-11-17T17:18:47+5:302016-11-17T17:18:47+5:30

विशिष्ट शायनिंग ग्रुपमध्ये जाण्यासाठी, दोस्तांना आपले गट्स दाखवण्यासाठी, आपलं डेअरिंग सिद्ध करण्यासाठी अनेक तरुण ड्रग्जच्या दिशेनं जातात. आणि त्या वाटेवरून परतणं मात्र अशक्य असतं.

The victim of status symbol | स्टेटसच्या अमली सिम्बॉलचे बळी

स्टेटसच्या अमली सिम्बॉलचे बळी

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे 

मित्रांना वेळीच ‘नाही’ म्हटलं आणि ‘बोललं घरच्यांशी’ तर व्यसनाच्या वाटेवर पाय घसरणार नाही.. पहिलीपासूनच शाळेत हुशार म्हणून फेमस असलेला अक्षय. दहावीलाही टॉपर. चांगल्या गुणांमुळे त्याला मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पण अभ्यासातच कायमचा गढून गेलेला अक्षय हळूहळू एकलकोंडा होऊ लागला. कुणी त्याच्याजवळ येईना. त्याला कुणी फारसे मित्रही नव्हते. कॉलेजमध्ये मुलं, काही स्टायलिश ग्रुप त्याला पुस्तकातला किडा, आईचं बाळ कधी मोठा होणार असे टोमणे मारू लागले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अक्षय आपला नियमित अभ्यास करत होता. अकरावीचं वर्ष सरलं. अक्षय चांगल्या गुणांनी पास होत बारावीत गेला. तेथेही तोच चिडविणारा ग्रुप होता. अखेर आपणच वेगळे का? आपल्यालाही कॉलेजमधल्या त्या स्टायलिश ग्रुपमध्ये सहभागी करून घ्यावं अशी इच्छा त्याच्या मनात घर करू लागली. ग्रुपच्या स्टेटसला शोभावं आणि त्यांनी आपल्यातही गट्स आहेत हे मान्य करावं म्हणून त्यानं त्या मुलांसमोर छाती फुगवून पहिली सिगारेट ओढली. त्यावेळी मित्रांकडून झालेल्या कौतुकाच्या वषार्वात तो हरवून बसला. पण ती सुरुवात होती. आपल्यात धमक आहे, गट्स आहेत असं म्हणत आणि दोस्तांच्या आग्रहाला बळी पडत तो सिगारेटच्या पुढे कधी गेला कळलंही नाही. कळत नकळत तो नशेच्या अमली पदार्थाच्या विळख्यात अडकला. चेनस्मोकर झाला. अस्वस्थ कायमच. दिवसाला १० ते १५ सिगरेट ओढू लागला. सिगरेटची जागा ड्रग्जनं घेतली. घरच्यांकडे पैशांची मागणी वाढती. घरच्यांनी पैशाला नकार देताच भांडणं सुरू झाली. अभ्यास पडला मागेच आणि अक्षय ड्रग्जच्या जाळ्यात स्वत:च हरवला. घरच्यांना काही कळायला मार्गही नव्हता. एक दिवस अखेर अक्षयची प्रकृती ढासळल्यानं त्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं. तेव्हा त्याचं निदान करताना डॉक्टरांनी सांगितलं की, हा ड्रग्ज घेतो. या धक्क्यानं कुटुंबीयही हादरले. अखेर मृत्यूशी झुंज देत अक्षय कसाबसा सावरला. सध्या तो मुंबईत एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेतो आहे. व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. अक्षय हे एक उदाहरण. पण आज मुंबईत अनेक तरुण आयुष्याचा ‘वन वे’ मानल्या जाणाऱ्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं धक्कादायक काळं वास्तव समोर येत आहे. यात स्थानिकांसह मुंबईत शिकायला येणारं आणि मायानगरीत स्ट्रगल करायला येणारं देशभरातलं तारुण्यही आहे. मुंबईत अनेक छोट्या-मोठ्या शैक्षणिक संस्था, नामांकित महाविद्यालयं, आयआयटीसारख्या मोठ्या कॅम्पससह साधारण ३०० हून अधिक महाविद्यालयं आहेत. त्यात आठ लाखांहून अधिक विद्यार्थी विविध महाविद्यालयांत शिक्षण घेतात. कुटुंबापासून दूर असलेले आणि मुख्यत्वेकरून मुंबईतील हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. आणि त्यातल्या काहींना ड्रग्जच्या व्यसनांनी घेरलंय हे अनेकदा त्यांच्या पालकांना पोलिसांकडूनच कळतं. कळत-नकळत ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले तरुण-तरुणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती झाल्यानंतर अनेकदा पोलीसच पालकांना हे वास्तव कळवतात. हे सारं थांबवण्यासाठी आणि तरुणांना अमली पदार्थांच्या नशिल्या दुनियेत जाण्यापासून रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षानं शाळा-कॉलेजांसह हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या तरुणाईत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. गेली काही वर्षे शाळा-कॉलेज परिसरात अनेक तरुण विद्यार्थी ड्रग्ज तस्करांच्या तावडीत सापडत आहेत. पालकासंह राहणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजसेवी संस्थांच्या, पोलिसांच्या मदतीनं रोखणं शक्य होतं; परंतु बाहेरून शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? उच्च शिक्षणासाठी असलेली सीईटी परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी मुंबईतील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात. कुटुंबापासून दुर असलेले हे विद्यार्थी शैक्षणिक संस्थांसह मुंबईत असलेल्या विविध हॉस्टेलमध्ये एकत्रित खोल्या घेऊन राहतात. मुळात आपल्याच मित्रांसोबत आपला स्टेटस वाढविण्यासाठी ही मंडळी व्यसनं शाईन मारत करतात. विशिष्ट तथाकथित प्रतिष्ठित ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी नशेचा आधार घेतला जातो. खरंतर एक नशेखोर विद्यार्थी स्वत:ची भूक भागविण्यासाठी दुसऱ्याला यामध्ये ओढतो. आणि दुसरा तिसऱ्याला. या साखळीचाच ड्रग्ज तस्कर फायदा उचलताना दिसतात. विशेषत: हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं अनेकदा वेगळे काहीतरी करण्याची धडपड, साहस, फॅशन आणि मनातली भीती घालविण्यासाठी घेतलेला आधार, अभ्यासाचा तणाव आणि मित्रांचा आग्रह या कारणास्तव ड्रग्जकडे ओढली जात आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्या स्वत:चं वेगळे पेज नेटवर्किंग साइटवर तयार करून रेव्ह पार्ट्यांचं आयोजन करतात. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते. पार्टीचं आयोजन करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून रेव्ह पार्टी असा थेट उल्लेख न करता वेगवेगळ्या प्रकारचे कोड वर्ड, शब्द वापरण्यात येतात. या पार्टीसाठी जाणाऱ्या इच्छुकांना ई मेलद्वारे आणि आगाऊ रक्कम घेऊन प्रवेश देण्यात येतो, असं पोलीस तपासात आढळलं आहे. गेल्या दहा महिन्यात मुंबईत १२ हजार २४४ गुन्हे दाखल करत अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या १२ हजार ९११ जणांवर या पथकानं कारवाई केली आहे. त्यामुळे आयुष्याचा ‘वन वे’ म्हणून मानल्या जाणाऱ्या अमली पदार्थांचं सेवन टाळावं, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. कारण एकदा का ड्रग्जच्या आहारी गेलात तर त्यातून बाहेर पडणं अनेकदा अशक्य असतं. मुळात यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्य पुरतं कोलमडतं. त्यामुळे या मार्गानं पुढे न जाता वेळीच ‘यू टर्न’ घेणं शहाणपणाचं असतं. सध्या मुंबई पोलीस यासंदर्भात काम करताना दिसतात. पण सुज्ञ तरुण मुलांनी मित्रांच्या अशा भलत्या आग्रहाला बळी न पडता, व्यसनांनाच नकार द्यायला शिकलं पाहिजे.

एकटी मुलं आणि पालकांचं दुर्लक्ष

धावत्या जीवनशैलीत माणसांच्या आयुष्यात बराच बदल झाला आहे. पण त्यात आपल्या घराचा पाया भुसभुशीत होऊ नये हे पालकांसह तरुणांनीही तपासले पाहिजे. परंतु त्याच वेळी आई-वडील आणि मुलं यांच्यातील संवाद दुर्मीळ होत चालला आहे. आपली मुलं काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत याचीही पालकांना कल्पना नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. आणि आपली मुलं अबोल, एकेकटी, एकलकोंडी होतात आणि व्यसनांकडे वळतात हे त्यांना कळतही नाही. तरुण मुलगा अबोल, एकलकोंडा, उदास असेल तर किमान त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडं तरी न्यायला हवं. - सागर मुंदडा मानसोपचारतज्ज्ञ

 

ही कसली एन्जॉयमेण्ट?

पाश्चात्त्य जीवनशैलीचा वाढता प्रभाव आणि एन्जॉयमेण्टच्या चुकीच्या कल्पना हे तरुणाईच्या ड्रग्जच्या विळख्यात सापडण्यामागचं प्रमुख कारण आहे.

- जयंत नाईकनवरे अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपआयुक्त

 

इन्फोलाइनशी संपर्क

अमली पदार्थांचे तस्कर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा चोवीस तास वॉच असतो. यासाठी पोलिसांनी जून महिन्यापासून ९८१९१११२२२ ही इन्फोलाइन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली. अवघ्या काही दिवसांत यावर १०० हून अधिक कॉल आणि मेसेज आले. गरज पडेल त्यांनी या हेल्पलाइनची मदत घ्यावी.

 

२० वर्षांची शिक्षा...

एखादा तरुण अमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्यास त्याला एनडीपीएस अ‍ॅक्ट २७ नुसार सहा महिन्यांची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड होऊ शकतो. अथवा तो स्वत: सेवन करून त्याची विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर ड्रग्जच्या प्रमाणानुसार कारवाई केली जाते. यामध्ये कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. दहा हजारांपासून दोन लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो.

- अ‍ॅड. देवेंद्र पाटील

स्टेटस सिम्बॉलचा बॉम्ब

मुंबईत एकेकाळी स्टेटस सिम्बॉल असलेली महागडी विदेशी दारू, सिगरेट यांच्या क्रेझची जागा हळूहळू अमली पदार्थांनी घेत चरस, हेरॉईन, गांजा, कोकेन आणि हुक्का यांच्या धुरांड्या हवेत विरघळू लागल्या. काही काळानं स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या एमडीसारख्या केमिकलयुक्त ड्रग्जनं डोकं वर काढलं. एमडी पाठोपाठ एन बॉम्बचीही भर यात पडली. उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरण्ट आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेटस सिम्बॉल म्हणून मानल्या जात असलेल्या ड्रग्जची लागण तरुणांना होऊ लागली. दिवसेंदिवस अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीचा वाढता वेग व त्यात गुरफटत जाणारी तरुणाई यावर नियंत्रण आणणं हे पोलिसांसमोर एक आव्हान बनत आहे.

 नोटांच्या बंदीमुळे तस्करांची बोंब..

अंमली पदार्थांचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीनेच केला जातो. यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा वापर होतो. या नोटाच चलनातून रद्द केल्यामुळे तस्करीचा वेग कमी झाल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे प्रमाणही कमी होताना दिसणार असल्याचे पथकाचे म्हणणे आहे.

(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहे.)
manishamhatre05@gmail.com
 

Web Title: The victim of status symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.