औरंगाबाद ते युरोपपर्यंतचा प्रवास : आपण स्वीकारतो शहरांना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 03:00 PM2017-10-04T15:00:04+5:302017-10-05T08:54:22+5:30

गंगापूर. औरंगाबाद जिल्हा. ना धड खेडं, ना धड शहर. इंग्रजी माध्यमात शिकलो, तर वातावरण ना इंग्रजी ना मराठी. नुस्ती खिचडी. तिथून पुण्यात आलो.

Travel from Aurangabad to Europe: Do you accept cities? | औरंगाबाद ते युरोपपर्यंतचा प्रवास : आपण स्वीकारतो शहरांना?

औरंगाबाद ते युरोपपर्यंतचा प्रवास : आपण स्वीकारतो शहरांना?

Next

- सुदर्शन श्यामसुंदर बूब

गंगापूर. औरंगाबाद जिल्हा. ना धड खेडं, ना धड शहर. इंग्रजी माध्यमात शिकलो, तर वातावरण ना इंग्रजी ना मराठी.
नुस्ती खिचडी. तिथून पुण्यात आलो. तिथं रुजलो. पुण्यानं मला स्वीकारलं. मग बंगलोर, दिल्लीतही राहिलो आणि आता युरोपात निघालोय.. या प्रवासात एकच कळलं, सगळी शहरं मायेची असतात, आपण त्यांना मनापासून स्वीकारलं तर ते आपल्याला स्वीकारतात, आपलं गाव वाटावं, इतकी आपली होतात.. प्रश्न एवढाच आपण त्या शहराचे होतो का..


आपण स्वीकारतो शहरांना? गंगापूर ते युरोप या प्रवासात आपल्या वाटलेल्या प्रत्येक शहराची मायेची गोष्ट.


गंगापूर. माझं गाव. जि.औरंगाबाद. माझं गाव म्हणजे त्याला तालुका म्हणावं तर तालुक्यासारखी सोय नाही अन् खेड्याएवढं मागासलेलं नाही, आमच्या वेळेला शहरात एकही इंग्लिश मीडिअमची शाळा नव्हती म्हणून चौथीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमात झालं. त्यानंतर आमच्या मामांनी सात किलोमीटर लांब असलेल्या एका इंग्लिश मीडिअमच्या शाळेत माझं नाव घातलं. मग दहावीपर्यंतच शिक्षण तिथंच झालं. या शाळेची परिस्थितीही माझ्या तालुक्यासारखीच होती. ना शहरी ना ग्रामीण. इंग्लिश मीडिअम म्हणावं तर तसं वातावरण नाही अन् मराठी म्हणावं तर परीक्षा इंग्लिशमध्ये व्हायची. असं खिचडी वातावरण. पुढे अकरावीला याच शाळेत प्रवेश ठेवला; पण आयआयटीच्या क्लाससाठी औरंगाबाद गाठलं. औरंगाबाद शहर हे माझ्या गावापासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरात घरच्यांची कायम चक्कर असायची.
पण यानिमित्तानं मी पहिल्यांदा घर सोडलं. पहिली वेळ असल्यामुळे मनात उत्साहासोबत थोडीशी भीतीही होतीच. पण सोबत मोठी बहीण असल्यामुळे या शहराशी जुळवून घ्यायला मला फार वेळ लागला नाही.
बारावी पास झालो आणि पुण्याच्या एका नामवंत कॉलेजमध्ये इंजिनिरिंगला अ‍ॅडमिशन मिळाली. इथं माझ्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला कारण की, पुण्यात माझ्या सोबतीला कोणीही नव्हतं. पुण्यात ना कुणी ओळखीचं होतं, ना कुणी नातेवाईक. पुणं औरंगाबादपेक्षा सर्वच गोष्टीत अग्रेसर असलेलं. भलंमोठं शहर. माणसांची गर्दी. शहरी दर्शनीय श्रीमंतपणा.
या वातावरणाशी जुळवून घ्यायला जरा वेळच लागला. त्यातच आमच्या कॉलेजमधली ७० टक्के मुलं उच्च-मध्यमवर्गीय. २०-२५ टक्के सामान्य आर्थिक स्तरातली होती आणि उरलेली ५ टक्के अगदीच सामान्य, गरीब घरातली होती. मी २०-२५ टक्के या रेंजमध्ये होतो.
आता गंमत अशी की, या रेंजमधल्या मुलांची स्थिती कायम आई खाऊ घालेना अन् बाप भीक मागू देईना अशीच. कारण या मुलांना ना गरीब असल्याची सहानुभूती मिळायची, ना उच्च-मध्यमवर्गीयांसारखा ‘क्लास’वाला ब्रॅण्डचा आव आणता यायचा. ही ‘हायक्लास’वाली मुलं म्हणजे ब्रॅण्डच्या दुकानांचे चालते फिरते स्टोअर आणि त्या जोडीला कॉन्व्हेण्ट शिक्षित असल्याने फर्ड, हायफाय इंग्लिश, व्हेरी फास्ट फ्लूएण्ट इंग्रजी बोलायचे.
या अशा वातावरणात आपला थोडासा आत्मविश्वास सोबत घेऊन आम्ही वावरायचो. आमची परिस्थिती सुरुवातीला वर्गातल्या ढ मुलांसारखी झाली होती, जी मुलं प्रश्न उत्तराच्या तासाला शिक्षकाची नजर चुकवत वर्गातल्या एका कोपºयात बसून असतात.
काही दिवसांनी प्रत्येकाशी चांगलीच ओळख झाली. आणि भाषा, क्लास या साºयानं नकळत उभारलेल्या भिंती दूर झाल्या. इंजिनिअरिंगच्या वर्षाच्या सरते शेवटी माझ्याकडे दोन गोष्टी आल्या होत्या. एक तर पुणेरी उपहासात्मक शुद्ध मराठी भाषा बोलण्याची हातोटी आणि जिवाला जीव देणारे मित्र. इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू असतानाच आम्ही आमच्याही नकळतच पुण्याचे झालो. आणि पुणं आमचं झालं. या चार वर्षात पुण्यात खूप काही शिकलो त्यात पुणेरी अभिमानाचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा!
पण पुण्यात हा स्थलांतराचा प्रवास थांबला नाही. पुढे नोकरीनिमित्त आधी बंगलोर मग दिल्लीत जाण्याचा योग्य आला. दिल्ली भारताची राजधानी. उर्वरित भारतापेक्षा सगळ्याच बाबतीत पुढे...
खरं सांगतो, सुरु वातीला तेथील वातावरणामुळे प्रचंड मनस्ताप झाला. किंबहुना बºयाच वेळेला ते सगळं सोडून परतावं वाटलंही. पण माझ्या लक्षात आलं की, मी या शहराला स्वीकारण्यापेक्षा, त्याची इतर शहरांशी, पुण्याशी तुलना करत सुटलोय. आणि हेच माझ्या अडचणींचं मुख्य कारण आहे. त्या दिवशी ठरवलं की, या शहराचा स्वीकार करायचा आणि तो केलासुद्धा. सुरु वात केली ती तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून तिथल्या भाषेपर्यंत. आणि जादूच झाली, या शहरानंपण मग माझा स्वीकार केला एकदम खुल्या दिलाने..
दिल्लीत रूळत होतोच. पण आता पुन्हा मी प्रवासाच्या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज होतोय.
आता पुढील शिक्षणासाठी मी एका युरोपियन देशात चाललोय. आणि पुढचं शहर माझं होण्याची वाट पाहतोय..
जामगाव-गंगापूर-औरंगाबाद-पुणे-बंगलोर-दिल्ली-युरोप असा प्रवास करत चाललोय..
या प्रवासात मला एक गोष्ट कळली की, कुठलंही शहर वाईट किंवा चांगलं नसतं. प्रत्येकाचं आपलं एक वेगळेपण असतं. ते वेगळेपण ते जपतही असतं. आपण जर त्या शहराला समजून घेण्याचा, ते शहर स्वीकारण्याचा मनापासून प्रयत्न केला तर ते शहर आपलं होतं, ते आपल्याला स्वीकारतं. आणि मग ते आपल्याला आवडायला लागतं, अगदी आपल्या गावासारखं, घरासारखं..
परकेपणा उरतोच कुठं मग..


(गंगापूर, जि. औरंगाबाद)


अनाउन्समेण्ट

छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात
मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसºया राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या सा-या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.


१. लिहून पाठवणार असाल तर
पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.
सोबत तुमचा फोटो आणि पत्ता, फोन नंबरही
जरूर लिहा.. पत्ता - शेवटच्या पानावर, तळाशी.

२. ई-मेल- oxygen@lokmat.com 

Web Title: Travel from Aurangabad to Europe: Do you accept cities?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास