NO जरुरी होता है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 08:33 AM2017-11-02T08:33:44+5:302017-11-02T08:33:53+5:30

एखादी गोष्ट नाही मिळाली, संधी नाकारली गेली, एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीनंच आपल्याला नकार दिला, नाकारलं तर किती दिवस आपण आयुष्य त्या नकारात कोंडून घालणार? बाहेर पडा त्यातून एक नकार नीट पचवला तर हजार होकार वाट पाहत उभे राहतील. पण त्यासाठी नकाराकडे पहायची नजर कमवावी लागेल...

NO is required | NO जरुरी होता है

NO जरुरी होता है

- प्राची पाठक

कोणी आपल्याला नाकारलं, नाही म्हणालं तर आपण दुखावले जातोच. आपलं काही चुकलं का, समोरच्यानं आपल्याला का नाकारलं असेल, कोण नेमकं कसं वागलं, का वागलं याची उत्तरं मिळाली तर बरं होईल, असं वाटत असतं. उत्तरं मिळून आपण गप्प बसणार असू, असंही नसतं. आपण आपली बाजू मांडू लागतो. कोणाला तीसुद्धा ऐकण्यात रस, वेळ नसेल ही शक्यता असते. पण आपल्याला वाटत असतं की जर आपल्याला निदान कारण कळलं तर मी माझी भूमिका नीट स्पष्ट केली असती. आपण किंचित आशा बाळगून असतो की माझी बाजू कळली तर नकार मिळाला नसता. पण हीपण एक शक्यताच असते. कुणाला अशी बाजू मांडायची संधी मिळूनदेखील नकारच स्वीकारावा लागतो. कोणाला आपल्याला नकार का मिळालाय, याचे उत्तर आयुष्यभरदेखील मिळत नाही.

खरं तर अशी सगळी स्पष्टीकरणं आयुष्य आपल्याला सहजच आणि हवी तशी देत नाही. त्यामुळे त्या त्या घटनेचं आपलं आपलं व्हर्जन घेऊन आपण तो नकार पचवत राहतो. इतरांना सांगायला गेलं तर त्याचे काय अर्थ लावले जातील, ते माहीत नसल्यानं अनेकजण नकाराशी सामना करताना एकटे पडलेले असतात. क्वचित कुणाला सांगितलं तर पुढे मागे तेही नातं तुटू शकेल, तोच मुद्दा आपल्यासाठी परत वापरला जाईल, चार ठिकाणी तीच गोष्ट उगाच होईल अशी भीती असते. आपण विनाकारण कुरकुर तर करत नाही ना? कदाचित आपलीच योग्यता नाही होकार मिळायची, समोरचा कोण समजतो स्वत:ला, त्याचा बदलाच घेईनच अशाही सगळ्या विचारांच्या फेरी आतल्याआत घडतात. इतक्या टोकाला त्या जाऊ शकतात की ज्याचा होकार मिळण्यासाठी आपण इतके कासावीस झालेलो असतो एके क्षणी, तोच कसा वाईट आहे, त्याचं कसंकसं आणि काय काय चुकतं तेच आपण मोठं करून कायम मनात आणि समोर येईल त्याला सुनावत राहतो.

नकार पचवणं हे केवळ मानसिक नसतं. एखाद्याला शारीरिक इजा केली तर कसा त्रास होईल, तशा स्वरूपाच्या त्रासातून मन आणि शरीर आपल्याला घेऊन जातं. आपल्याविषयी प्रश्नचिन्ह उभं करतं. स्ट्रेस येतो, खजील वाटतं. आपण कोणीतरी कमी आहोत, असा न्यूनगंड ते आपल्याला देऊन जातं. झोप उडते, तेच ते विचार मनात येतात. एकट्यानं आपण त्या विचारांशी, अस्थिरतेशी झुंजत बसतो. हळूहळू जवळपास असलेल्या लोकांनाही टाळू लागतो. नकार सतत मनात मोठा होत राहतो.

आता प्रश्न यातून कसं बाहेर पडायचं?
पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या नकारातच, त्याच टप्प्यात अडकलो आहोत, हे आपल्याशीच पक्कं केलं तर एक सोपी गोष्ट करता येते.

आपण इथं कितीवेळ अडकून पडायचे, याचं एक लिमिट स्वत:ला आखून द्यायचं. म्हणजे काय तर मी अमुक वेळ टीव्ही बघेन, अमुक वेळ फोन बघेन, अशी शिस्त लावायचा थोडाफार प्रयत्न आपण करतच असतो. कधी ताबा जातो; पण एरवी आपण हा विचार तरी करतो की यावर पूर्ण वेळ खर्च करणं योग्य नाही. तसंच वेळेचं एक लिमिट या भळभळणाºया जखमेला आखून देता येतं का, ते बघायचं. थोडक्यात, दु:ख खोटंखोटं विसरायचं नाही. ‘छे, छे मला काहीच फरक पडत नाही’, असंही म्हणायचं नाही. ‘हो, मी दुखावलो गेलोय/गेलेय आणि त्यावर नीट विचार करायला मी वेळ घेईन’, हे बजावायचं स्वत:ला.

अर्थात सगळीच उत्तरे लगोलग मिळणार नाहीत. कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे हे एक नाकारलं जाणं आहे का, असं आत्मपरीक्षण करता येतं. या नाकारल्या जाण्याला आपल्याला चांगलं काही करून/घडवून भिडायचं असेल, तर उत्तरं शोधायला, मागच्याच पानावर परत आणि सारखंसारखं अडून राहायला आजचा वेळ का घालवतो आहोत आपण याचा विचार करून त्याचं टाइम लिमिटच आखता येतं. म्हणजे चक्क आपण वेळ ठरवतो, चार दिवस, आठ दिवस घेतो. आणि मनात हे सॉर्ट आउट करतोच, हे असं ठरवून टाकायचं. तो वेळ उलटला की मात्र तेच ते परत होणार नाही याची काळजी घ्यायची. जमलं नाही तरी जमेल असा स्वत:लाच आधार द्यायचा. इतरांनी भलेही आपल्याला नाकारलं असेल, आपल्याला आपणच स्वीकारणं आणि समजून घेणं तर आपल्या हातात असते ना? ते कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. आपला टेकू आपल्यातच शोधता येतो.

अवघड वाटतं हे, पण अशक्य नसतं. सरावानं जमतं. अंगवळणीही पडतं..

(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेत, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)
 

Web Title: NO is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.