विरोध होतो, पण मग त्यावर उपाय कोण शोधणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:00 AM2018-10-04T07:00:00+5:302018-10-04T07:00:00+5:30
‘ऑक्सिजन’च्या लेखाला आलेली ‘समजूतदार’ पालकांची आणि तरुणांची पत्रं.
‘अमृता, प्रणय आणि तुम्ही’ हा डॉ. हमीद दाभोलकर यांचा लेख ऑक्सिजनमध्ये (दि. 27 सप्टेंबर 2018) प्रसिद्ध झाला. त्या लेखात असं म्हटलं होतं की, तरुण मुलांनी आपल्याच पालकांना विचारावं की, आम्ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न केलं तर तुम्ही काय कराल? अमृताच्या वडिलांसारखं वागाल का? त्यावर आलेल्या प्रतिक्रियांचं हे संकलन
माझं 2012 ला लग्न झालं. खरं तर आम्ही लग्न केलं म्हणणे योग्य ठरेल. मी हिंदू आणि ते मुस्लीम. खोटं वाटेल पण आम्हाला वाटलेला तितका विरोध घरून झाला नाही. माझ्या घरी आई-आप्पा थोडे नाराज झाले. ते त्यांच्या जागी योग्य होते. आमचीपण मानसिकता तयार होती. थोडे रु सवे-फुगवे होणार हे गृहीत धरलं होतं. सगळं व्यवस्थित असूनही आम्ही वर्षभर घरी नव्हतो गेलो. वातावरण निवळायला तेवढा वेळ देणं गरजेचं होतं.
घरच्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे आम्ही टिकून राहिलो खरं तर. आमच्या घरी तर प्रत्येक सणाला या जावयाला आग्रहाचं आमंत्नण असतं आणि तेही कोणतेही आढेवेढे न घेता तिलक लावून सहभागी होतात. ईशानच्या जन्मानंतर तर आनंदी आनंद आहे. आमच्या कोणत्याच कार्यात आमची जात आडवी नाही आली. मुलगा चांगला असेल, मुलीच्या मताचा, मनाचा विचार करणारा असेल, प्रोत्साहन देणारा, समजूतदार असेल तर त्या जोडप्याला कोणी त्यांची जात विचारत नाही. खरं तर आई-वडिलांनी मुलांना समजून घ्यायला हवं. मुलांनी आपला निर्णय योग्य असेल तर तो योग्य प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशावेळेस समजूतदारपणा, पेशन्स खूप लागतात. पण जमतं, हे मी सांगते. आम्ही आमचा निर्णय सार्थ करून दाखवला. कारण ज्या धूमधडाक्यात ईद साजरी केली जाते त्याच जोशात आमच्या घरी दिवाळी पाडवा साजरा होतो.
- कल्पना किर्वे
पुणे
****
मी 1987 साली आंतरधर्मीय विवाह केला. खूप खूप विरोध होता. भाऊ तर रामपुरी घेऊन आला होता; परंतु दैवयोगाने माझी आंबेजोगाईहून औरंगाबादला ट्रान्सफर झाल्यामुळे तो क्षण टळला. पुढे लग्न झालं त्यानंतर मात्न माझ्या वडिलांनी सर्व नातेवाइकांना दमच भरला की आता जर कुणी तिच्या केसाला धक्का जरी लावला तरी खबरदार! कारण ती मॅच्युअर आहे तिने तिच्या जीवनाचा निर्णय जर घेऊनच टाकला तर तिच्याशी संबंध तुटले.
पण 13 वर्षानंतर माझं आईबाबांकडे जाणं-येणं सुरू झालं. त्यानंतर दोन भावांनीही क्षमा केली. आजघडीला मी पाच बहीण-भावांमध्ये खूप लाडकी, प्रेमळ बहीण आहे. आता आईबाबा, सासू-सासरे सगळे परलोक सिधार गये है लेकीन आज हम हमारी फॅमिली के साथ बहोत खूश है! हमारा 1 लाडका, 1 लडकी यूके में एज्युकेशन लेकर आये है। सेटल होने के लिये थोडा सबर, थोडा वक्त जाना बहोत बहोत जरूरी है। आजच्या काळात मुलं खूप खूप समजदार, हुशार आहेत, त्यांना त्यांचं कशात चांगलं-वाईट आहे हे कळतं. पालकांना जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही.
- आस्मा
***
माझ्या मते आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहास विरोध करणार्या आई-वडिलांचे आणि नातेवाइकांचे समुपदेशन व्हायला हवे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंतरजातीय समुपदेशन केंद्रे शासनानं उघडली पाहिजे, जशी तंटामुक्त केंद्रे आहेत. त्याशिवाय जातीयता नष्ट होणार नाही. ऑनर किलिंग थांबेल.
केंद्र सरकारने असे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय समुपदेशन केंद्र स्थापन करून त्यात पोलीस, वकील आणि सामाजिक कार्यकर्ता, त्याच गावातील काही चांगले नागरिक यांचा समावेश करावा. म्हणजे असे विवाह करणार्या मुला-मुलींना आणि पालकांना आधार मिळेल!
-प्रतिभा मेश्राम
यवतमाळ
***
आम्ही 35 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. आमच्या मुलीनेदेखील प्रेमविवाह केला. एवढंच नाही तर मी व माझ्या पत्नीने अनेक विवाहांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कधीकधी वाटतं की मॅरेज ब्यूरो गल्लोगल्ली आहेत; पण आम्ही लव्ह मॅरेज ब्यूरो चालवत आहोत.
- दिनेश देसाई,
जळगाव