म्हटलं, आपण करू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:34 PM2017-07-19T16:34:29+5:302017-07-19T17:11:41+5:30

कृषी शाखेत पदवी घेतली.ठरवलं, आपण शेतीच करायची.पण पाणी कुठं होतं?पाणी नाही, दुष्काळ.

He said, you do .. | म्हटलं, आपण करू..

म्हटलं, आपण करू..

googlenewsNext

 
- प्रतीक उंबरकर 

कृषी शाखेत पदवी घेतली.
ठरवलं, आपण शेतीच करायची.
पण पाणी कुठं होतं?
पाणी नाही, दुष्काळ.
म्हणून शेतीचे प्रश्न बिकट.
मग ठरवलं, आधी पाणीप्रश्नावर काम करू..
एकेक करत समजून घ्यायला सुरुवात केली.
आणि समस्यांचे वेगवेगळे पोत समजून घेत
थेट मेळघाटातल्या धारणीपर्यंत पोहचलो..


मी मूळचा अकोल्यातल्या बेलखेड गावचा. घरच्यांच्या आग्रहामुळे कृषी शाखेत प्रवेश घेतला. पहिले दोन सेमिस्टर अभ्यास अजिबातच आवडायचा नाही. आपण इकडे का आलोय असं मला सतत वाटायचं. त्यामुळे मग आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे माझं लक्ष जायला लागलं. विद्यापीठाने त्याच काळात काही नियम बदलले, त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालो. मित्रांसोबत कॉलेजमध्ये प्लाण्ट सेव्हर्स नावाचा ग्रुप सुरू केला. वृक्षारोपण, बीजारोपण, रक्तदान शिबिर, नद्या साफ करणं यासारखी वेगवेगळी कामं या ग्रुपमार्फत व्हायला लागली. सुमारे १०० जणांच्या या गटाला जळगाव-जामोदमध्ये सगळे ओळखू लागले. कुठल्याही सोशल ग्रुपला मनुष्यबळाची गरज लागली की आम्हाला बोलवलं जायचं. कॉलेज संपता संपता माझं गावाशी असं एक नातं बनत गेलं.

निर्माणच्या शिबिरात आल्यावर शिक्षणाचा आणि माझ्या गावातील लोकांच्या गरजेचा मेळ घालता येईल का, असा विचार मी करायला लागलो. मात्र तेव्हाच वडीलधारे विचारायला लागले, ‘ग्रॅज्युएशन झालं आता पुढे काय करणार?’ 

मी उत्तर द्यायचो, मी गावात शेती करणार!
या उत्तरावर लोक म्हणायचे, शेतात पाणीच नाही तर कशी करणार शेती? त्यापेक्षा नोकरी कर, गावात थांबून काहीच फायदा नाही. लोक असं बोलतात. त्यात गावातील तरु ण शेतीला घाबरतो. हे सारं मला अस्वस्थ करत होतं. आणि माझा याच विषयात काम करण्याचा निर्णय अधिक ठाम झाला. गावातल्या काही लोकांसोबत चर्चा केली. गावातले शेतीचे प्रश्न, पाणी, शेतमालाच्या बाजारपेठेचे प्रश्न, शेतमाल प्रक्रियेचे प्रश्न याविषयी बोलून, माहिती घेऊन समजून घेतलं. त्यातून शेतमालाची प्रक्रि या आणि कमी खर्चाची शेती या विषयांवर काम करण्याचं मग मी ठरवलं.
पण त्याच वर्षी (२०१५) दुष्काळानं माझ्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. माझ्या गावात ८० ते ९० फुटांवर विहिरीला पाणी आहे. तरीही शेतकऱ्यांची मोटर हिवाळ्यात दोन ते तीन तासांमध्ये पाणी सोडणं बंद करायची. ज्या शेतकऱ्याचं बोअरवेल आधी स्प्रिंकलरचं १५ नोझल पाणी सोडायचं, तेच आता ८ नोझलचं पाणी फेकतं. गावात नळाला पिण्याचं पाणी ज्या बोअरवेलपासून यायचं ती बोअरवेलसुद्धा उन्हाळ्यात दूषित पाणी सोडायला लागली. या उन्हाळ्यात गावात टँकरनं पाणी यायला सुरुवात झाली. दोन दिवस मी स्वत: टँकरवर बसून लोकांना पाणी वाटायचं काम केलं. पाणी वाटताना लोकांची भांडणे बघितली. शेजारी एकमेकांसोबत चांगली राहणारी मंडळीसुद्धा पाण्यासाठी भांडत होती. हे बघता मला पाण्याची समस्याच मोठी वाटायला लागली.
त्यानिमित्ताने पाणी या विषयावर मी अधिक वाचत गेलो. त्यासंदर्भात काम करणाऱ्या लोकांना भेटलो. मग मला कळालं, पाण्याशिवाय शेती नाहीच! पाणी ही अशी गोष्ट आहे जी प्रॉडक्शनपासून कन्झम्पशनपर्यंत लागते. जसं की भात उगवण्यापासून ते अगदी खाऊन हात धुवेपर्यंत. त्यानंतर अनेक जणांसोबत मी चर्चा केली. शेतीच्या प्रश्नाआधीसुद्धा पाणीप्रश्नावर काम करायला पाहिजे अस मला ठाम वाटलं. त्यातून पाणीप्रश्नाकडे मी आकर्षित झालो. शेती तर करायचीच आहे, पण त्याआधी पाण्याचं व्यवस्थापन कसं करतात याचं तंत्र शिकून घ्यायला हवं असं ठरवलं. आणि पाणलोट क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या समाज प्रगती सहयोग (एसपीएस) या संस्थेत रु जू झालो. या प्रकारचं काम करायचं ठरवताना थोडी भीती वाटत होती. पण मग लक्षात आलं की माझ्या मनातली अनेक असुरक्षितता या समाजानं लादलेल्या आहेत. सोशल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांच्याच असुरक्षितता माझ्या डोक्यात घर करून बसल्या आहेत, ज्या माझ्या नाहीतच. आणि मग निर्णय घेणं सोपं गेलं.
मेळघाटमधल्या धारणी येथे सध्या मी काम करतोय. स्थलांतर हा मेळघाटमधला मोठा प्रश्न आहे. दिवाळी ते होळीच्या दरम्यान धारणीच्या आजूबाजूच्या चार-पाच गावांमिळून इतके लोक स्थलांतर करतात की एका ट्रकला लोकांना शहरात नेण्यासाठी २२ ट्रिपा माराव्या लागतात. यावरून स्थलांतराचं प्रमाण किती आहे हे आपल्या लक्षात येतं. रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी मदत करणं हे माझ्या सध्याच्या कामाचं स्वरूप आहे. गावातील कामांचा आराखडा तयार करण्यात मदत करणं, गावातच जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देणं, रोजगार हमीचे पैसे मिळण्यातील अडचणी पंचायत समितीपर्यंत पोहोचवणं, गावातली कामं का बंद आहेत हे बघणं अशी कामं आता आम्ही करतो.
हे काम करत असताना गावातील नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन कसं करता येईल हादेखील प्रयत्न आहे. दर मंगळवारी या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आमची गटविकास अधिकारी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. गावात जी कामं होतात (दगडी बांध, माती बंधारा, शेततळे इ.) त्याची गुणवत्ता कशी सुधारता येईल, जेणेकरून फक्त काम करून रोजगार मिळण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न सुटण्यासही मदत होईल हा आमचा प्रयत्न आहे. सरकारी व्यवस्थेला रोजगार हमी कायद्याच्या कामात मदत करण्याचं आमचं काम आहे. प्रत्येक कामाला काही उणिवा असतातच, पण सध्या धारणीमध्ये रोजगार हमी योजनेचं काम खूप छान सुरू आहे. आणि त्याचं श्रेय त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच जाते.
येत्या आॅगस्टमध्ये एसपीएसमध्ये काम करून मला एक वर्ष पूर्ण होतंय. आत्ता आपल्या समाजात गरिबी, आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, मातीची ढासळती सुपीकता, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण (ध्वनी, वायू, जल, मृदा), वाढत्या आजारांची समस्या, व्यसनं, भ्रष्टाचार, बेरोजगारी, तरु णांचं चुकीच्या मार्गांवर भटकणं हे सर्व सामाजिक प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. 
म्हणून कदाचित ‘सामाजिक कामाची गरज काय?’ या प्रश्नाचं वेगळं उत्तर शोधावं लागत नाही. काम करतानाच अनेक गोष्टी कळत, समजत जातात..


‘निर्माण’मध्ये सहभागी व्हायचंय?

‘निर्माण’च्या या प्रवासात आजवर आपण अनेक मित्रांना भेटलो. त्यांनी ‘कर के देखो’ हा मंत्र वापरून आपल्या जगण्याचं ध्येय शोधण्याचा प्रयत्न सुरूकेला. 
तुम्हाला पडत असतील असेच काही प्रश्न. शिक्षण - नोकरी - निवृत्ती याहूनही वेगळं जगण्यात असं काही असतं का? काय केलं म्हणजे आपण आयुष्यात सेटल झालो? पैसे कमवण्यापलीकडे आपल्या आयुष्याचं काही ध्येय असू शकतं का? आपल्या कौशल्यांचा व क्षमतांचा उपयोग करून आपण समाजातले प्रश्न कसे सोडवू शकू..?
- असे अनेक प्रश्न तुम्हालाही छळतात का? 

मग निर्माण तुमची वाट पाहत आहे..
महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी सुरू केलेली शिक्षणप्रक्रि या म्हणजे निर्माण!
निर्माणची आठवी बॅच येत्या जानेवारीमध्ये सर्च, गडचिरोली येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर ही वेबसाइट पहा..
http://nirman.mkcl.org
या वेबसाइटवर जा. प्रवेश अर्ज डाउनलोड करा आणि भरून त्वरित निर्माणला पाठवा. पूर्ण भरलेला फॉर्म निर्माणला nirmaanites@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवाव. किंवा पोस्टाने सर्च, गडचिरोली-४४२६०५ या पत्त्यावर पाठवावा. व्हॉट्सअ‍ॅप करू नये. 
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 
१५ आॅगस्ट २०१७ ही आहे !!

अधिक माहितीसाठी- www.nirman.mkcl.org
ही वेबसाइट पाहा.

Web Title: He said, you do ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.