मित्रकिडा

By अोंकार करंबेळकर | Published: December 20, 2017 03:14 PM2017-12-20T15:14:19+5:302017-12-21T08:52:07+5:30

पिकांवरील कीड ही समस्या एकीकडे, दुसरीकडे चुकीच्या औषधांची किंवा बनावट औषधांची फवारणी केल्यानं शेतकऱ्यांचा होणारा घात. रासायनिक फवारणीमुळे पिकांचा उतरता कस या साऱ्यावर उत्तर काय? राहुल मराठेनं ठरवलं, घातक किडे असतात तसे कामाचे दोस्तकिडेही असतात त्यांचाच का उपयोग करून घेऊ नये? त्यातून सुरू झालं मित्रकिड्यांचं एक कल्पक काम.

Friend | मित्रकिडा

मित्रकिडा

Next

गेल्या काही दिवसांपासून कापसावरील बोंडअळी रोगाची चर्चा राज्यात सुरू आहे, खोडकिडे किंवा उसावरील माव्यानं आणि द्राक्ष-डाळिंबावरील रोगामुळे शेतकरी त्रस्त झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. या वर्षभरात संपूर्ण राज्याला नव्हे अख्ख्या देशाला आणखी एक हादरवणारी घटना घडली ती म्हणजे यवतमाळच्या शेतकऱ्यांना फवारणीच्या रसायनांमुळे झालेली विषबाधा. काही शेतकऱ्यांना यामुळे प्राण गमवावे लागले.

अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या बातम्या आपल्या कानावर आदळत असतात. दरवर्षी एखादे पीक रोगामुळे पूर्णत: नष्ट होते, चुकीच्या औषधांची किंवा बनावट औषधांची फवारणी आणि शेतकऱ्यांचे नुकसान हे तर नेहमीचंच आहे. पण पुण्याचा एक संशोधक या बातम्यांमुळे नुसते अस्वस्थ होऊन थांबले नाहीत. राहुल मराठे त्याचं नाव. प्राणिशास्त्र आणि कीटकशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पीएच.डी. पदवीसुद्धा त्यांनी मिळवली. शिक्षणानंतर राहुलने काही वर्षे शेतीसाठी वापरल्या जाणाºया रसायनांच्या कंपनीमध्ये कामही केलं. पण तेव्हाच एक गोष्ट त्याच्या लक्षात येऊ लागली होती. ती म्हणजे शेतीवरील किड्यांवर जितकी जास्त तीव्रतेची औषधे वापरू तितकी त्या किड्यांची प्रतिकारक्षमता वाढत चालली आहे. प्रत्येक वर्षी रसायनांची तीव्रता वाढत जावी लागत आहे. एखाद्या शेतीच्या क्षेत्रावर कीटक नियंत्रणाचे रसायन फवारलं तर तेथील कीटक मरतात; पण त्यामुळे तयार झालेली पोकळी इतर प्रदेशातील कीटकांना लगेच समजते. मग हे बाहेरगावचे कीटक वेगानं त्या पोकळीच्या प्रदेशात येतात, येतच राहतात आणि तिथला प्रश्न जसाच्या तसाच राहातो.
हे शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्यासाठीही घातक ठरणारं होतं आणि सर्वात मोठा धोका वाटू लागला तो ही औषधे फवारलेली धान्य आणि फळं खाणाऱ्या सामान्य जनतेसाठी. रसायनं टाळून काही करता येतं का याचा विचार राहुलने सुरू केला. या विचारात त्याच्या मदतीला आला तो डार्विनबाबा. जिवो जीवनस्य जीवनम् हा अन्नसाखळीचा मंत्र येथे वापरता येतो हे त्याला जाणवलं.
सगळेच किडे शेतकऱ्यांचे शत्रू नसतात. काही किड्यांचा वापर मित्रासारखा करता येतो आणि इथेच त्याच्या मित्रकिडा संकल्पनेचा जन्म झाला. जे किडे किंवा अळ्या शेतकºयांच्या पिकांवर पोसून शेतकऱ्यांना हैराण करतात त्याच किड्यांना मारणारे काही किडेही निसर्गात असतात. याच किड्यांचा रोगनियंत्रणासाठी वापर करायचा राहुलनं ठरवलं. वर्षानुवर्षे रसायनं वापरून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नवे उपाय वापरून पाहायचे होते; पण त्यांची रसायनांची जुनी सवय मोडून पडणं अवघड होतं आणि विश्वासार्हतेचा प्रश्नही होताच. पण या मित्रकिड्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी राहुलला शेतकऱ्यांच्या शोधकवृत्तीनेच मदत केली. त्यानं पाहिलं की शेतकरी सतत चौकशी करत असतात, कोणी शेतात काही नवं केलंय का, शेजारच्या शेतकऱ्याने शेतात काही प्रयोग केलाय का याकडे त्यांचं सतत लक्ष असतं. ते प्रश्न विचारत असतात. राहुलने अशा शेतकऱ्यांची भेट घेतली. सध्याच्या रसायनांमुळे होणारी हानी त्याने त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यासाठी पर्याय असलेल्या किड्यांची माहितीही त्याने दिली. ‘पण मी हे मित्रकिडे शेतात सोडले तर माझ्याऐवजी ते शेजाºयालाच कशावरून मदत करणार नाहीत?’ अशा अनेक प्रश्नांचे निरसनही त्याला करावे लागले.

शेतकऱ्यांना रसायनं फवारायची झाली तर यंत्राची, ते फवारणाऱ्या लोकांची आणि पैशांची मोठी गरज असते. त्यात काम करणाऱ्या लोकांची मर्जी सांभाळून गोड बोलून कधी हातापाया पडून फवारणीचं काम करून घ्यावं लागतं. बहुतांशवेळा केवळ कामासाठी लोक नाहीत म्हणून फवारणी करता येत नाही. लोक मदतीला आले तरीही अनेक अडथळे समोर असतातच. कोकणातल्या गावांमध्ये यंत्राचा वॉशरसारखा साधा सुटा भाग जरी नसला तर काम खोळंबतं. ५० ते १०० किमी दूर जाऊन शहरातलं दुकान शोधून फवारणीचं यंत्र किंवा पंप दुरुस्त करावा लागतो. अशावेळेस मोठ्या प्रयत्नाने कामासाठी आलेले लोक बसून राहतात. या सगळ्या प्रश्नांवर राहुलचे किडे हे एकमेव उत्तर होतं. राहुलने त्यांना या नैसर्गिक कीडनियंत्रणाचे महत्त्व सांगितले. तुम्हाला यासाठी कोणताही पंप किंवा रसायनं लागणार नाहीत, त्यासाठी फवारणी लागणार नाही की मनुष्यबळ असं त्यांना शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. यंत्र, पंप, वीज किंवा इंधन लागणार नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांना ते थोडंथोडं पटू लागलं व शेतकरी या नव्या वाटेनं जायला तयार झाले.

त्यानंतर राहुलने शेतकऱ्यांना मित्रकिड्यांची अंडी आणि अळ्या पाठवायला सुरुवात केली. हेसुद्धा अगदी सोपं तंत्र होतं. मित्रकिड्यांच्या अंड्यांची स्टिकर्स काही अंतरांनी पिकांवर किंवा फळझाडांवर चिकटवत जायचं की झालं काम. मित्रकिडे पुढचं काम करायला तयार होता. काही मित्रकिडे पिकांना त्रास देणाऱ्या किड्यांच्या अंड्यांमध्येच अंडी घालतात तर काही मित्रकिडे त्या किड्यांच्या अळ्याच तयार होऊ देत नाहीत. काही मित्रकिडे थेट दुसऱ्या किड्याच्या शरीरात शिरून संपवून टाकतात. हा नामी उपाय शेतकऱ्यांना आवडला. एक-दोन दिवसांच्या अंतरातच मित्रकिडे रोगाचा फन्ना उडवतात. आज-काल नैसर्गिक खतांचा वापर करून शेती करण्याची पद्धती सुरू झाली आहे त्यासाठी कंपोस्ट किंवा शेणखतासारख्या खतांचा वापर केला जातो. पण शेणखतातून शेणकिडे आल्यावर शेतकरी घाबरू लागले. राहुलने या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला. शेणकिड्यांना घाबरून नैसर्गिक पद्धतीची शेती थांबवण्याऐवजी त्यांनाही संपविण्यासाठी मित्रकिड्यांचा वापर त्याने करायला सांगितला. द्राक्षांवरील मिलिबग, टोमॅटोवरील अळ्या, फळझाडांवरील खोडकिडे असे शेतकºयाचे शत्रू त्याच्या मित्रकिड्यांनी संपवून दाखवले. शेतकरी साधारणत: एका पिकासाठी अनेकवेळा फवारण्या करतात या सगळ्या फवारण्यांचा खर्च मित्रकिडे वाचवू लागले. किड्यांची, अळ्या संपल्याच त्याहून परागीभवन वाढल्यामुळे पिकंही चांगलं येत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला.

आज राहुलने दिलेले मित्रकिडे टेरेस गार्डनपासून १०० एकर शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करत आहेत. विषमुक्त अन्नासाठी ही निसर्गानेच केलेली मदत शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवी, असं राहुलचं आग्रही मत आहे.
 

Web Title: Friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.