बदला कधी, कुठे, कसा घ्यायचा जवान ठरवतील; त्यांना पूर्ण स्वातंत्र्यः नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:05 PM2019-02-15T17:05:24+5:302019-02-15T17:21:45+5:30

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिली आहे.

Pulwama Attack : pm narendra modi attacks pakistan for pulwama attack army given free hand | बदला कधी, कुठे, कसा घ्यायचा जवान ठरवतील; त्यांना पूर्ण स्वातंत्र्यः नरेंद्र मोदी

बदला कधी, कुठे, कसा घ्यायचा जवान ठरवतील; त्यांना पूर्ण स्वातंत्र्यः नरेंद्र मोदी

googlenewsNext
ठळक मुद्देजवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलंय - पंतप्रधान मोदीपाकिस्तान जगभरात भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय - पंतप्रधान मोदी

झांसी - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिली आहे. झांसी येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चांगलंच ठणकावले आहे. भारतीय लष्कराला प्रत्युत्तरादाखल कारवाईसाठी वेळ आणि स्थळ ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.  जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामाच्या हल्लेखोरांना किंमत चुकवावीच लागणार, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलेय. 

''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला खडसावले. 

पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ''दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल''. 

''जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. 130 कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.'', असेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आपला देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका, असं आवाहनही यावेळेस पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले.

पुढे पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, आज संपूर्ण देश दुःखी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट आहे की, मोठ-मोठ्या देशांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करताना अंतर राखले आहे. पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. त्याची वाईट अवस्था करण्यात आली आहे.  

'नवीन रीति आणि नीतिचा भारत'
पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, हा भारत नवीन रीति आणि नीतिचा आहे, हे कदाचित आपला शेजारील देश विसरत आहे. दहशतवादी संघटनांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी हिंसक मानसिकता दाखवली आहे, त्याचा संपूर्ण हिशेब चुकता केला जाईल. 



 



आत्मघाती हल्लेखोर हा काश्मिरी युवक

सुरक्षा दलांच्या वाहनांच्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भीषण हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हा आत्मघाती हल्ला त्याच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका युवकाने केला, असा दावा जैशने केला. जैशचा प्रवक्ता मुहम्मद हसनने जीएनएस या स्थानिक वृत्तसंस्थेकडे पाठवलेल्या निवेदनात हा दावा केला. या आत्मघाती हल्ल्यासाठी वापरलेल्या स्फोटकांनी भरलेले वाहन पुलवामा जिल्ह्यातील गुंडीबाग येथील आदिल अहमद उर्फ वक्कास हा युवक चालवत होता, असेही त्याने या निवेदनात म्हटले होते. 


भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्ला
दरम्यान, पुलवामायेथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.



 

Web Title: Pulwama Attack : pm narendra modi attacks pakistan for pulwama attack army given free hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.