Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती...

By महेश गलांडे | Published: August 25, 2018 12:15 PM2018-08-25T12:15:14+5:302018-08-25T12:15:38+5:30

Keral floods: केरळवासीय आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करत आहेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होत आहेत. मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढत आहेत अन् ओनमच्या स्वागताला पायघड्या घालत आहेत.

Keral floods: situation is stable as people hit by floods in kerala | Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती...

Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती...

googlenewsNext

मुंबई : इयत्ता दहावीला असताना मराठीच्या मॅडमने तोंडी परीक्षेसाठी समोर बोलावलं की आम्ही फुल्ल कॉन्फीडन्समध्ये निघायचो. कविता म्हणा असं मॅडमने म्हणताच आम्ही सुरू करायचो, 'ओळखलतं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरतील पाणी....' कवी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता आमच्यासारख्या अभ्यासात मध्यमवर्गीय असलेल्यांनाही तोंडपाठ होती. तर, वर्गातील हुश्शार पोरंही हीच कविता म्हणायचे. अर्थात, कविता सहज सोपी आणि सुंदर शब्दात गुंफलेली होती. मात्र, मॅडमने त्या कवितेतील ओळीचा अर्थ विचारला की, मग बोबडी वळायची. कारण, कवितेचा अर्थ कळेल एवढी प्रगल्भता त्यावेळी नव्हती. आज त्या कवितेचा अर्थ कळतोय, सोबतच त्यातील दु:ख अन् जबर आत्मविश्वासही समजतोय. 

केरळमध्ये आलेला महाप्रलय कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींची आठवण करुन देतोय. सोबतच त्याचा अर्थही समजावून सांगतोय. कारण, कवितेतील पीडिताच्या घरी गंगामाई पाहुणी बनून आली अन सर्वकाही घेऊन गेलीय. तसचं, आज केरळमध्येही पीडितांच्या घरात कित्येक दिवसांपासून चुर्णी, नेत्रावती, पेरियार, प्रतीची अशा तब्बल 44 नद्यांनी मुक्काम ठोकलाय. या नद्यांनी केरळवासीयांच होत नव्हतं सगळं नेलंय, तर प्रसाद म्हणून डोळ्यांमध्ये पाणी तेवढं ठेवलंय. केरळवासीयांच्या डोळ्यात साचलेल पाणी आज अरबी समुद्रापेक्षाही मोठ्ठ वाटू लागलयं. भरल्या डोळ्यातील या पाण्यात उसळणाऱ्या लाटाही अनेकांच्या काळजाच पाणी-पाणी करतायेत. तरीही या सागराएवढ्या दु:खातून पुन्हा सावरायचंय, उभ राहायचयं, नव्याने संसार थाटायचाय अन् शून्यातून पुन्हा विश्व उभा करायचयं. तर अंगणात येऊन ठेपलेल्या ओनम सणाचही सेलिब्रेशन केरळवासीयाना करायचयं. पण...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या दु:खातून सावरतो न सावरतो, तोच केरळमधील महाप्रलयामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात न घडलेल्या नसैर्गिक आपत्तीने आज केरळचं सौंदर्य नष्ट केलयं. जनजीवन विस्कळीत करून टाकलयं. येथील महापुरात आत्तापर्यंत 370 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर जवळपास 50 हजार लोक बेघर झाले आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त लोक रिलीफ कॅम्पात स्थलांतरीत आहेत. पण, या आपत्तीतही वर्षाचा सण दारात येऊन ठेपलाय, अन् तो मल्याळम लोकांना साजरा करायचायं.

केरळमधील मोठा उत्सव मानला जाणारा 'ओनम' सण तोंडावर आला आहे. तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवावर यंदा दु:खाचे पाणी फेरले आहे. मात्र, आलेल्या परिस्थितीला तोंड देत जगणं हेच खरं जगण आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरही आपण पिटलं-भाकरी का होईना खातोच की. अगदी तसचं काळजावर दगड ठेवून केरळवासीय आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करत आहेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होत आहेत. मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढत आहेत अन् ओनमच्या स्वागताला पायघड्या घालत आहेत.

केरळच्या प्रकोपात कुणी आपली आई गमावलीय, कुणी भाऊ, कुणी चिमुकला तर कुणी बायको. कुणी घर, शेत गमावलयं, कुणी सर्वस्व गमावलयं तर कुणी केरळलाच गमावलयं. केरळचं दु:ख अंगावर झेलत प्रत्येक केरळवासी आज केरळसाठी उभारतोय. म्हणूनच तेथील एका वडिलांनी त्यांच्या पत्रकार मुलाला, एवढ्या संकटाकाळातही तू तूझं काम करं असं बजावलयं. केरळचं दु:ख, केरळचं संकट तू जगाला दाखव, त्यासाठी देवानच तुझी निवड केलीय, असं या धाडसी बापानं आपल्या पत्रकार पोराला म्हटलयं. एवढ्या दु:खातही कुठून येते ही ताकद. कुठून येते ही हिंमत, जी कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा बनते. तर, आपल्या घरात घुसकोरी केलेल्या नदीच्या पाण्यातून कसाबसा जीव वाचवून रिलीफ कॅम्पात पोहोचलेल्या आजीबाईच्या हाती, चहाचा एक कप लागला, तेव्हा तो कपही तिला अमृतासमान वाटतोय. भरल्या डोळ्यांनी लाखो-लाखो आशिर्वाद तिने एका चहाच्या बदल्यात रिलीफ कॅम्पमधील लोकांना दिलेत. 

केरळच्या प्रलयाने गर्व, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्वकाही जमिनीवर आणलयं. म्हणूनच, केरळमध्ये जिल्हाधिकारी हमाल बनलेत, मंत्रिमहोदय मालवाहू बनलेत, सैन्याचे जवान पाठीचा पूल करतायेत, तर बचाव पथकातील स्वयंसेवक स्वत: उपाशी राहून तेथील लोकांची भूक भागविण्याचा प्रयत्नतायत. दिवसरात्र एक करुन प्रत्येकजण आपलं कर्तव्य बजावत आहे. 

भारत देशाला नैसर्गिक संकटं नवी नाहीत, पण प्रत्येक संकटातून आपण उभारतोय. स्वत:ला सावरतोय. उत्तराखंडचा महाप्रलय असेल, गुजरातचा महापूर असेल, मुंबईचा विनाशकारी पाऊस असेल, लातूरचा भूकंप असेल किंवा माळीणचा कोसळलेला डोंगर असेल. आम्ही रडलोय, पण तेवढ्याच ताकदीने परिस्थितीशी लढलोय. त्याच दमाने, त्याच आत्मविश्वाने आणि त्याच जबाबदारीने आम्ही उभारलोय. यावेळी आम्ही हिंदू नसतो, मुस्लीम नसतो, कुठल्याही जातीचे नसतो, राजकीय पक्षाचे नसतो, तर केवळ भारतीय असतो, केवळ एक माणूस असतो. म्हणूनच एक भारतीय बनून आज प्रत्येक भारतवासी केरळच्या मदतीसाठी उभा आहे. प्रत्येकजण माणूस म्हणून केरळच्या मदतीला धावतोय.

केरळच्या पुनर्वसनासाठी 2600 कोटी रुपयांची गरज असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलयं. या 2600 कोटी रुपयांतून निसर्गसृष्टीनं नटेलेल्या केरळचं पुनर्वसन करायचयं. त्यासाठी, केरळला देशभरातून आर्थिक मदत केली जातेय. केंद्र सरकारकडूनही 500 कोटींची मदत जाहीर झाली आहे. तर बहुतांश राज्य सरकारनेही निधी देऊ केला आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत, कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते इस्रोपर्यंत सर्वचजण केरळसाठी मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. मात्र, मदतीसोबतच केरळवासीयांना गरज आहे ती मानसिक धीर देण्याची, त्यांना गरज आहे  ती सहानुभूतीची अन् आपल्या आधाराची. म्हणूनच कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेच्या शेवटच्या चार ओळी येथे आवर्जून आठवतात. 

खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला
पैसै नको सर, जरा एकटेपणा वाटला, 
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही 'कणा'
पाठीवरती हात ठेऊनी, फक्त लढ म्हणा....

#We_are_with_kerala

Web Title: Keral floods: situation is stable as people hit by floods in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.