अपघातग्रस्तांसाठी पहिल्या ५० तासांसाठी कॅशलेस उपचार सुविधा - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2015 11:57 AM2015-07-26T11:57:27+5:302015-07-26T14:34:38+5:30
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी पहिल्या ५० तासांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - देशात दर चार मिनीटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो ही चितेंची बाब असल्याचे सांगत आता रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी पहिल्या ५० तासांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
रविवारी मन की बात या कार्यक्रमाव्दारे नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. रस्ते अपघातातील मृतांच्या आकडेवारीवर मोदी म्हणाले, वाढते रस्ते अपघात ही चिंतेची बाब आहे, अपघात रोखण्यासाठी सरकारसोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, प्रत्येकाने कुटुंबातील तरुणांना रस्ते नियमांचे महत्त्व पटवून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या पिढीतील १०० पैकी फक्त एका मुलाला वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ व्हायचे आहे, विज्ञानाकडे जाणा-यांचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञान व तंत्रज्ञान हे देशाच्या विकासाचे डीएनए आहेत, विज्ञान व संशोधन क्षेत्रात तरुणांनी मोठ्या संख्येने यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे कॅशलेस उपचार सुविधा ?
कॅशलेस उपचार सुविधेची माहिती देताना मोदी म्हणाले, सध्या कॅशलेस उपचार सुविधा गुडगाव, जयपूर व वडोदरा येथील राष्ट्रीय महामार्गांवर सुरु करण्यात आली आहे.यानुसार अपघातग्रस्त रुग्णांना पहिल्या ५० तासांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा मिळेल. या कालावधीत रुग्णाच्या नातेवाईकांना पैशाचा विचार न करता त्याच्या उत्तम उपचार करण्याची संधी मिळेल. रस्ते परिवहन व सुरक्षा विधेयकही लागू केले जाईल असे त्यांनी सांगितले.