चित्रपट पुरस्कारांवर ७२ कलाकारांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:03 AM2018-05-04T05:03:11+5:302018-05-04T05:13:12+5:30

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर ७२ कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला

72 cast members boycott movie awards | चित्रपट पुरस्कारांवर ७२ कलाकारांचा बहिष्कार

चित्रपट पुरस्कारांवर ७२ कलाकारांचा बहिष्कार

Next

अमृता कदम
नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर ७२ कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या या प्रथेला यामुळे गालबोट लागले असून, अनेक कलाकारही नाराज झाले आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा खरं तर चित्रपटाच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणे प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण असतो. यंदाचा पारितोषिक वितरण सोहळा मात्र याला अपवाद ठरला. मोजकेच पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्यानंतर उर्वरित पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते देण्यात आले.
प्रथेप्रमाणे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. या वर्षी मोजके ११ पुरस्कार सोडले तर इतर सर्व पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते देण्यात आले. ‘कलाकारांची नाराजी दूर करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक आणि यंदाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांना मध्यस्थीसाठी 
पाठविण्यात आले. त्यानंतरही काही कलाकारांचा बहिष्कार हा कायम राहिला. विज्ञान भवनात बुधवारी संध्याकाळी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. तेव्हाच या नव्या पायंड्याची कल्पना कलाकारांना आली. या विषयी आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली. ‘आमच्यासाठी हा सर्वोच्च क्षण आहे. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्तेच सन्मान दिला जातो. मग याचवेळी आम्हाला यथोचित सन्मानापासून वंचित का ठेवले जात आहे,’ असा प्रश्न या कलाकारांनी उपस्थित केला.
‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात, त्यामुळे त्यांचे विशेष महत्त्व आहे. अन्यथा ते देखील भारंभार पुरस्कारांपैकी एक बनून राहिले असते,’ अशी प्रतिक्रिया सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळविणाऱ्या ‘न्यूटन’चा निर्माता मनीष मुंद्रा याने टिष्ट्वटरवरुन व्यक्त केली.
 
राष्ट्रपती भवनाकडून स्पष्टीकरण
‘राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रामनाथ कोविंद हे सर्व पुरस्कार आणि पदवीदान सोहळ्यांना एका तासासाठीच हजेरी लावतात. त्यांनी हे पद स्वीकारल्यापासूनच हा प्रोटोकॉल ठरला आहे. याबाबतची कल्पना माहिती व प्रसारण खात्याला काही आठवड्यांपूर्वीच दिलेली होती. अचानक त्याबद्दल जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचे राष्ट्रपती भवनालाही आश्चर्य वाटते.’

मराठी कलाकारांनी व्यक्त केली नाराजी
‘विशेष उल्लेख’ विभागात पुरस्कार मिळालेल्या ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनीही सोहळ्याकडे पाठ फिरवली. ‘कच्चा लिंबू’चा दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माता मंदार देवस्थळी, दिग्दर्शक नागराज मंजुळे या सर्वांनीच सरकारच्या चुकीच्या प्रथेबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली.

पुरस्कारप्राप्त कलाकारांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला एक
खुले पत्र पाठवून आपला असंतोष व्यक्त केला. ‘सन्मानापेक्षाही आमच्या मनात नाराजीची भावना आहे. हा आमचा विश्वासघात आहे. ६४ वर्षांची परंपरा एका झटक्यात बदलली जाते, हे दुर्दैवी आहे,’ असे या कलाकारांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
चार राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या नागकीर्तन या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली, गायक येशुदास, अभिनेता फदाह फासिल, अभिनेत्री पार्वती यांच्यासह ७० हून अधिक कलाकारांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

Web Title: 72 cast members boycott movie awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.