शिवसेनेसमोर अडचणी अधिक!

By किरण अग्रवाल | Published: May 6, 2018 01:34 AM2018-05-06T01:34:57+5:302018-05-06T01:34:57+5:30

‘युती’ची द्वाही फिरवली गेली असली तरी, शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी भाजपाचे बळ एकवटणे अवघड आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्याची चुणूक दिसून आली. त्यात भाजपा समर्थकानेच अपक्ष उमेदवारी केली आहे. दुसरे म्हणजे खुद्द शिवसेनेत त्यांच्या उमेदवाराला मन:पूर्वक पाठिंबा आहे, असेही काही दिसून येऊ शकलेले नाही. यात भर म्हणून भुजबळ जामीन मिळाल्याने बाहेर आले आहेत. ते येवल्यात दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होऊ देण्याची सुतराम शक्यता नाही. तेव्हा, राष्टÑवादी काँग्रेस व भाजपा समर्थक उमेदवारांपेक्षा शिवसेना उमेदवारांसमोरील अडचणीच अधिक आहेत.

Shiv Sena faces more problems! | शिवसेनेसमोर अडचणी अधिक!

शिवसेनेसमोर अडचणी अधिक!

Next
ठळक मुद्देआता ‘युती’चे रंग उडणे क्रमप्राप्त ठरून गेलेशिवसेनेने यंदा पुन्हा आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना केलीनिवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची कोंडी झालीभाजपाही शिवसेनेची कोंडी करण्यास उत्सुक

साराश
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिलेला असताना भाजपाच्या एका समर्थकाने अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यामुळे या निवडणुकीत रंग भरले गेले असतानाच राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची जामिनावर सुटकाही घडून आल्याने आता ‘युती’चे रंग उडणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे. त्यामुळे छाननीप्रक्रियेत उमेदवारी टिकवण्यात शिवसेनेला यश आले असले तरी लढाई
सोपी नाही. सत्तेत सोबत राहूनही भाजपा-शिवसेनेतील विसंवाद दिवसेंदिवस वाढत गेल्याने मध्यंतरी शिवसेनेने यंदा पुन्हा आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना केली होती. स्वाभाविकच भाजपाचाही मार्ग त्यामुळे मोकळा झाला होता. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्याने त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीही केली होती. परंतु आता ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायच्या एक दिवसआधी ‘युती’चा निर्णय झाल्याने ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची कोंडी झाली. त्यातून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भाजपाची उमेदवारी मागणारे त्र्यंबकेश्वरचे परवेज कोकणी यांनी तेथील भाजपा पदाधिकारी व सदस्यांच्या बळावर अपक्ष उमेदवारी दाखल केली. कोकणींसोबतच भाजपाकडून उमेदवारी इच्छुक राहिलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर हेदेखील त्यांच्यासमवेत होते. त्यामुळे मुंबई मुक्कामी जरी ‘युती’चा अप्रत्यक्ष समझौता झाला असला तरी, नाशकातील भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या वेगळ्या वाटचालीची शक्यता दर्शवून दिली आहे. स्वबळाचे नगारे बडवत कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांना वाढवून ठेवणाºया पक्षाकडून ऐनवेळी मात्र निर्णयात बदल केले जातात तेव्हा पूर्वीपासून तयारी करून बसलेल्या किंवा कामास लागलेल्यांना बंडखोरीशिवाय पर्याय दिसत नाही. कोकणींच्या बाबतीत तसेच काहीसे होताना दिसत आहे. पण, हे घडताना पक्षही त्याबाबत स्पष्टता करताना दिसत नसल्याने भाजपाही शिवसेनेची कोंडी करण्यास उत्सुक असल्याचेच त्यातून स्पष्ट होणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे, परस्परांच्या विरोधात उमेदवार द्यायचे नाहीत असे ठरले याचा अर्थ परस्परांनी सोबत लढायचे. त्यामुळे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांची उमेदवारी दाखल करताना भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली. परंतु ते एक वगळता जिल्ह्यातील चारपैकी एकही भाजपा आमदार किंवा पक्ष पदाधिकारी वा कोणतेही लोकप्रतिनिधी दराडे यांच्या बैठकीला अथवा उमेदवारी दाखल करताना उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेला ‘युती’च्या मतांकडून निश्ंिचत राहता येऊ नये. यात दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, भाजपा खासदार चव्हाण यांनी आपण पक्ष पदाधिकाºयांशी बोलूनच व त्यांची संमती घेऊनच दराडेंसोबत हजेरी लावल्याचे सांगितले असताना पक्षाच्या अन्य पदाधिकारी व आमदारांना तशा सूचना दिल्या गेल्या नसतील का? म्हणजे, पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव तर यातून दिसून यावाच, शिवाय विचारले त्याला होकार दिला आणि नाही विचारले त्यांना निर्णयाची स्वायत्तता दिली, असाच यातून संकेत मिळावा. त्याचदृष्टीने कोकणी व त्यांना सक्रिय समर्थन देणारे अहेर यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी यांच्या वेगळ्या वाटचालीच्या प्रयत्नांकडे पाहता यावे. वेळोवेळी भाजपाला कोंडीत पकडणाºया शिवसेनेला यानिमित्ताने जेरीस आणून, आपली उपयोगितेची अपरिहार्यता दर्शवून देण्याची खेळीच यामागे असण्याची शक्यता नाकारती येणारी नाही. दराडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यासंदर्भात झालेला तब्बल बारा तासांचा खल व त्यानंतर त्यांना मिळालेला दिलासा, हादेखील शिवसेनेसाठी भाजपाची उपयोगिता लक्षात आणून देणाराच म्हणायला हवा. भाजपा-शिवसेनेतील आजवरच्या विसंवादामुळे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराची धाकधूक वाढलेली असतानाच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे अल्पमतातील आपला उमेदवार विजयापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा करिश्मा याही निवडणुकीत बघावयास मिळण्याची शक्यता वाढली आहे. असे होण्यामागील कारण म्हणजे, नरेंद्र दराडे भुजबळांच्याच हक्काच्या येवला मतदारसंघातील आहेत. मूळ काँग्रेसचे असलेले दराडे कालांतराने भुजबळांच्याच वळचणीला आलेले होते; परंतु त्यातून अपेक्षापूर्ती न झाल्याने ते शिवसेनेत गेले. आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले तर पुढल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्याचा परिणाम घडून येऊ शकेल, जो खुद्द भुजबळ यांच्या संबंधाने महत्त्वाचा असेल. तेव्हा, आपल्या घरच्या अंगणात भुजबळ विरोधाचे रोपटे वाढू देणार नाहीत याबद्दल शंका बाळगता येऊ नये. या सर्व पार्श्वभूमीवर दराडे यांच्यासमोरील अडचणी वाढणे निश्चित आहे. त्या केवळ भुजबळांची अगर भाजपाच्या मतांची धास्ती बाळगण्याबाबतच नसून, खुद्द शिवसेनेतील अंतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर जुने निष्ठावंत सहाणे यांना लाभू शकणाºया समर्थनाच्याही बाबतीतल्या आहेत. ‘युती’च्या बळावर सहज मैदान मारून नेण्याच्या अपेक्षांचे रंग उडू पाहात आहेत ते त्यामुळेच.

Web Title: Shiv Sena faces more problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.