मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिसरोड अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:06 AM2018-05-15T01:06:48+5:302018-05-15T01:07:31+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा व स्थानिकांचा प्रवास सोयीचा व्हावा, या हेतूने महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिसरोड करण्यात आले. या सर्व्हिसरोडच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे. महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष झाले आहे पण अजूनही कोणार्कनगर, जत्रा हॉटेल, हनुमाननगर, अमृतधाम, के. के. वाघ कॉलेज व मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ या परिसरातील सर्व्हिस रोडवर पथदीप बसविले नाहीत. त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी अंधारात असल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय कॉलनी रोडच्या वळणावर सर्व्हिस रोडने अंधारातून येणारी वाहने दिसत नाही त्यामुळेदेखील अपघात घडतात.
तरी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या परिसरात पथदीप बसवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.अंधारामुळे रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले, वयोवृद्ध यांना अचानक वाहनाचे फोकस डोळ्यावर चमकल्यामुळे तारांबळ उडते परिणामी अपघात होतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस व दाट लोकवस्तीचा भाग असल्याने मोठी वर्दळ असते. अचानक कॉलनी रोडकडून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. अंधाराचा फायदा घेत सोनसाखळी चोरी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दमदाटी यांसारख्या घटना रोज घडतात. शिवाय आता एस.टी. बसदेखील सर्व्हिस रोडवर वाहतूक करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी बस स्टॉपवर उभे असलेले प्रवासी दिसत नाही त्यामुळे बस थांबत नाही. प्रवाशांनादेखील अडचणीचा सामना करावा लागतो.