जिल्ह्यात कांदा पडून
By admin | Published: August 30, 2015 10:34 PM2015-08-30T22:34:59+5:302015-08-30T22:35:57+5:30
केंद्राचा इशारा : परराज्यातील व्यापाऱ्यांनी खरेदी थांबविली
येवला : मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांत शासनाने कांदा व्यापाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून गुदाम सील करण्याचा इशारा दिल्याने धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदबाबत आखडते धोरण स्वीकारल्याने येवल्यासह जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडे कांदा पडून आहे.
देशांतर्गत निर्यातीचा प्रश्न उभा राहिल्याने भाव घसरले असल्याचा सूर येवल्यातील व्यापाऱ्यांनी काढला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात कांद्याची तीव्र टंचाई भासणार असून, शहरी भागातून कांदा केंद्राला रडवणार अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शासन मात्र कांदाटंचाई व भाववाढ प्रश्नावर खडबडून जागे झाले आहे. कांदाटंचाईचे संकट सावरण्यासाठी मध्य प्रदेश व पंजाबमध्ये तेथील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची गुदामे सील करणे व ठरवून दिलेल्या भावातच नफा- नुकसानीचा विचार न करता कांदा विकावा असे धोरण अवलंबिल्याने तेथील कांदा व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातून कांदा आयात करण्याचे थांबवले आहे. त्यामुळे येवल्यासह अनेक कांदा बाजार आवारात कांदा पडून आहे.
स्थानिक कांदा व्यापाऱ्यांनीही कांदा खरेदी धोरणात शिथिलता आणली. त्यामुळे कांद्याचे भाव ८०० रुपयांनी उतरले. येवला कांदा बाजार आवारात ४८०० ते ५८०० यादरम्यान कांद्याच्या प्रतीनुसार शुक्रवारी कांदा खरेदी झाली. शासनाच्या कांदा भाव नियंत्रित आणण्याच्या प्रक्रियेमुळे व कडक कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.
देशांतर्गत मध्य प्रदेश व पंजाबमधील कांदा आयात मंदावली त्याचा थेट परिणाम येवल्यासह जिल्हाभरातील कांदा आवारावर झाला. शासन आणि परराज्यातील प्रसारमाध्यमे यांनी कांद्याची चिंता वाढवल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी अडचणीत आला आहे. (वार्ताहर)