दीड लाख रोपे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:28 AM2019-08-26T01:28:21+5:302019-08-26T01:28:42+5:30

वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 One and a half million seedlings carried away | दीड लाख रोपे गेली वाहून

दीड लाख रोपे गेली वाहून

Next

नाशिक : वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या महापुराचा फटका गंगापूर-गोवर्धन शिवारात असलेल्या वनविभाग पश्चिम नाशिकच्या रोपवाटिकेसह सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेला बसला. गंगाकाठ रोपवाटिका पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. कारण येथील पुलावरून महापुराचे पाणी वाहत होते. या दोन रोपवाटिकांमधील सुमारे दीड लाख रोपांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
गोदावरीला आलेल्या महापुरामुळे सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिका तसेच पश्चिम वनविभाग गंगापूर रोपवाटिकेमधील १४० प्रजातींच्या जवळपास १ लाख ३५ हजार रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरापूर्वी सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेत ३ लाख ६५ हजार रोपे, गंगापूर रापवाटिकेत ३ लाख ५ हजार रोपांचे संगोपन करण्यात आले होते. महापुरानंतर यामधील निम्या रोपांना पुराचा मोठा फटका बसला. यातील काही रोपांना वाचविण्यात यश आले. सुमारे दीड लाख रोपे सडल्यामुळे त्यांना फेकून देण्याची वेळ दोन्ही रोपवाटिकांना आली आहे. महापुरामुळे या रोपवाटिकांची दुरवस्था बघावयास मिळत आहे. यामधील अनेक रोपे पाण्याने सडली आहेत तर काही रोपे ही पाण्याने वाहून आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाघाट रोपवाटिकेमधील पाच हजार लिटरच्या पाच पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या.
विविध प्रजातीच्या रोपांचे संगोपन
रोपवाटिकांमध्ये आंबा, आवळा, हिरडा, रिठा, अशोका, महारुख, रुद्राक्ष, कदम, उंबर, बेल, पेरू, कैलासपती, जास्वंद, शिलारोप, बांबू, खाया, कतरजिव, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांचे संगोपन करण्यात येते. त्यानंतर योग्य वाढ झालेली रोपे दरी-मातोरी, शीलापूर, मुंगसारे, ओढा, पिंपळगाव, तळेगाव, वाढोची या भागांमधील ग्रामपंचायतींना ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी पुरविली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे. अद्याप टार्गेट ९५ टक्क्यांपर्यंत आले आहे.

Web Title:  One and a half million seedlings carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.