मराठा क्रांती मोर्चा २६ रोजी विधानभवनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:43 AM2018-11-11T01:43:58+5:302018-11-11T01:44:16+5:30

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबला विधानसभेवर धडकणार आहे.

 Maratha Kranti Morcha on 26th Legislative Assembly | मराठा क्रांती मोर्चा २६ रोजी विधानभवनावर

मराठा क्रांती मोर्चा २६ रोजी विधानभवनावर

Next

नाशिक : अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबला विधानसभेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या तयारासाठी विभागनिहाय संवाद यात्रा काढण्यात येणार असून, येथील वरदलक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी (दि. १०) नाशिक विभागाच्या बैठकीत अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबारमधून संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांततेत, शिस्तीत व संयमाने मराठा समाजाने सरकारसमोर मागण्या मांडल्या. ऐतिहासिक व अभूतपूर्व मराठा क्रांती मूक मोर्चाची सर्व जगाने नोंद घेतली. तरीही मराठा समाजाचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नासाठी पेटलेल्या आंदोलनात ४० पेक्षा अधिक मराठा तरुणांचे जीव गेले आहेत, तर चौदा ते पंधरा हजार मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाला दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी नाशिक जिल्हा विभागीय बैठकीत केला. त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीने विधानभवनावर धडक देण्याचा निर्धार केला असल्याची माहिती क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, प्रमोद पाटील यांनी बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बैठकीत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील संवाद यात्रेचा मार्ग, स्वरूप, मराठा संवाद मेळाव्याची ठिकाणे याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानुसार संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यातून निघून जळगाव, धुळे, नंदुरबारमार्गे २४ नोव्हेंबरला नाशिकमधील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याजवळ येणार आहे. याच ठिकाणी संबंधित चारही जिल्ह्यांतील नाशिक मार्गे मुंबईकडे रवाना होणाऱ्या आंदोलकांची उपाहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी आंदोलक मुंबईकडे प्रस्थान करणार असल्याचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले. शरद तुंगार, राजू देसले, सचिन पवार, विलास जाधव, संदीप लभडे, अमित नडगे, सचिन शिंदे, योगेश कापसे, पूजा धुमाळ, सुजाता जगताप, अरुणा डुकरे आदी उपस्थित होत्या.
विभागनिहाय संवाद यात्रा
आंदोलनासाठी समाजाच्या जनजागृतीसाठी शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधणे, समाजात जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे, तसेच मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सर्व महसुली विभागाच्या संवाद यात्रा एकत्रित विधानभवनावर धडक देणार आहेत. त्यानंतरही सरकाराने मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर त्यापुढील आंदोलनाची दिशाही येथूनच ठरविण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक भोर यांनी यावेळी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्या मूळ आंदोलनाची धार कमी करण्यासाठी काही लोक स्वार्थी हेतूने एकतर्फी, मनमानीपणे, बेजबाबदारपणे मराठा क्रांती मोर्चा नावाचा गैरवापर करून हिंसक आंदोलने किंवा राजकीय पक्षाच्या अनाठायी घोषणा करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. ठोक मोर्चा व मराठा क्रांती नावाची संघटना किंवा राजकीय पक्षाशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही. आरक्षणाविषयी भाजपा सरकारने मराठा समाजास खेळवत ठेवून समाजाची घोर फसवणूक केली आहे. याविरोधात मराठा समाजात तीव्र संतापाची भावना आहे. मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले असल्याचा कांगावा भाजपा सरकार करीत असले तरीही प्रत्यक्ष मराठा समाजास अपेक्षित लाभ मिळालेला नाही हे वास्तव आहे.- संजीव भोर, राज्य समन्वय, मराठा क्रांती मोर्चा.
आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी वकील
मराठा क्रांची मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान समाजाच्या विविध तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याविषयी मराठा क्रांती मोर्चाच्या वकील संघटनांनी गुन्हे मागे घेण्यासाठी व न्यायालयीन मदतीसाठी आश्वासन देऊनही नाशिक जिल्ह्णात मदत केली नसल्याची भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात गुन्हे दाखले झालेल्या तरुणांचा न्यायालीयन खर्च मराठा क्रांती मोर्चाच्या जमा झालेल्या निधीतून करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.
नियोजनाची जबाबदारी सरकारवर
मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत संयमी आणि शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले होते; परंतु सरकारने मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चातर्फे केवळ मुंबईत विधानभवनावर धडकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त वाहनतळांची व्यवस्था आणि नियोजन करण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. विशेष म्हणजे सर्व मराठा समाजबांधवांना त्यांच्या वाहनांनीच मुंबईत पोहोचण्याचे आवाहनही याबैठकीच्या माध्यमातून करण्यात आहे.

Web Title:  Maratha Kranti Morcha on 26th Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.