खरिपासाठी कडवाचे आवर्तन सोडा
By admin | Published: September 19, 2014 11:05 PM2014-09-19T23:05:10+5:302014-09-20T00:37:47+5:30
शेतकऱ्यांची मागणी : उन्हाचा तडाख्याने कोमजू लागली पिके
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगामातील पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने पिके वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठी कडवा कालव्याचे आवर्तन सोडावे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे. या भागातील खडांगळी, मेंढी, निमगाव (देवपूर) पंचाळे, पिंपळगाव (धनगरवाडी), श्रीरामपूर (शिंदेवाडी), रामपूर (पुतळेवाडी), उज्जनी आदि परिसर कडवा कालव्याच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत आहे. मात्र या भागात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. यंदा सलग चौथ्यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाल्याने केवळ रिमझिम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत. अत्यल्प पावसावर पिके जोमदार आली असली तरी आता उन्हाची तीव्र वाढू लागली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील नद्या, बंधारे, पाझरतलाव व विहिरी आदि जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील ऐन बहरात आलेल्या खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला
आहे.
तालुक्याच्या पश्चिम व इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने कडवा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र ते पाणी पिकांना देण्यात आले नाही. आता पूरपाणी
बंद करण्यात आले आहे. रिमझिम पावसाने उघडीप दिली असून, भाद्रपदातील कडक उन्हाची तीव्र वाढली आहे. उन्हामुळे पिके
कोमेजू लागली असून, त्यांना
पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदा दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातच समाधानकारक झाला आहे. पूर्व भागात यंदा एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने जलस्रोत भरले नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. विहिरींना पाणी नाही. ‘विहिरीतच नाही, तर पोहऱ्यात
कोठून येणार’ या उक्तीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी कडवाच्या आवर्तनाचा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने पूर्वभागातील पिके वाचविण्यासाठी कालव्याला त्वरित आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाबासाहेब सापनर, रवींद्र पगार, पिंपळगावचे सरपंच गोवर्धन शिंदे, उज्जनीचे सरपंच नारायण सापनर, धनंजय थोरात, शिवाजी तळेकर, दत्ता पगार, निमगाव विकास संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मुरडनर, किसन सापनर, भागवत सोनवणे, पुतळेवाडीचे सरपंच आबा जाधव, उपसरपंच सोपना वाईकर, कल्याण गिते, बाळासाहेब खैरनार आदींसह परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)