जिवावर उदार तरी वाड्यावर मदार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:23 AM2019-07-22T00:23:04+5:302019-07-22T00:23:28+5:30
वाड्यात राहणारा घरमालक असेल तर त्या वाड्याशी त्याची ओळख निगडित असते अन् भाडेकरू असेल तर त्याची निकडही त्याला जिवापेक्षाही अधिक मोलाची वाटत असते. त्याशिवाय कामधंद्यासाठीची मोक्याची जागा,
माझे मत
नाशिक : वाड्यात राहणारा घरमालक असेल तर त्या वाड्याशी त्याची ओळख निगडित असते अन् भाडेकरू असेल तर त्याची निकडही त्याला जिवापेक्षाही अधिक मोलाची वाटत असते. त्याशिवाय कामधंद्यासाठीची मोक्याची जागा, घराशी आणि शेजाऱ्यांशी असलेला ऋणानुबंध, भविष्यात मिळू शकणाºया लाभाची शक्यता, पूूररेषा किंवा क्लस्टरचा प्रश्न मार्गी लागून पुनर्विकासाच्या परवानगीची आस अशा अनेक बाबींमुळे घरमालक आणि भाडेकरू हे आपल्या वाड्यांना सोडून जायला तयार होत नसल्याचे मत जुने नाशिकमधील नागरिकांनी मांडले.
वाड्यांच्या क्लस्टरचा प्रश्न आज ना उद्या मार्गी लागेल किंवा पूररेषेमुळे रखडलेला वाड्यांच्या पुनर्विकासाला लवकरच परवानगी मिळेल अशी आस बहुतांश वाडेमालकांना आहे. तसेच काही वाडेमालक आणि बहुतांश भाडेकरूंसमोरील आर्थिक प्रश्नदेखील बिकट असल्याने मनपाकडून धोकादायक वाड्यांबाबत नोटीस मिळूनदेखील त्यांना वाडा सोडता येत नाही. या प्रश्नाला असे अनेक कंगोरे असल्याने या प्रश्नावर शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच तोडगा निघू शकतो. अन्यथा वाडे कोसळत जाण्याचे प्रमाण वर्षागणिक वाढत जाण्याबरोबरच त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता बळावली आहे.
वाडेमालकांची कितीही इच्छा असली तरी पूररेषा किंवा अन्य तत्सम तांत्रिक बाबींमुळे त्याला तिथे कोणताही पुनर्विकास करता येत नाही. तसेच पिढ्यान्पिढ्या असलेला वाडा सोडून अन्यत्र जाण्याची त्याची मानसिकता नसते. त्यामुळे त्या वाड्याच्या सुरक्षित भागात राहून अपेक्षित निर्णयाची प्रतीक्षा करण्याशिवाय त्याच्यापुढे गत्यंतर नसते. - वैभव बेळे
वाड्याशी आणि आसपासच्या रहिवाशांशी असलेला अनेक वर्षांचा ऋणानुबंध आणि मोक्याची निवासाची जागा सोडून गैरसोयीच्या लांबच्या जागी जाण्याची तयारी नसते. तसेच विविध कारणांमुळे डागडुजी करणेदेखील शक्य नसते. त्यामुळे असेल त्या परिस्थितीत राहणे हाच पर्याय त्याच्याकडे उरतो.
- योगेश गायधनी
वाड्यातील कम भाड्याची मध्यवर्ती जागा सोडून अन्यत्र रहायला जाणे आर्थिक कारणांमुळे शक्य नसते. त्यामुळे वाडा पडण्याची भीती कितीही वाटत असली तरी वाडा सोडता येत नाही. त्यामुळेच भाडेकरू वाडा सोडत नाही.
- महंमद शेख
वाड्यात राहणाºयांचे जीव तर धोक्यात आलेलेच असतात. त्याचबरोबर त्यांच्या आसपास राहणाºया कुटुंबांनादेखील विनाकारण भीतीच्या छायेत वावरावे लागते. फावडे लेनमधील आमच्या घराजवळील वाडा पडायला येऊन आणि मनपाकडे तक्रार करूनदेखील कारवाई झालेली नाही.
- सचिन निकम