अग्निशामक बंबाला मिळेना वाट़़़
By admin | Published: December 21, 2014 12:40 AM2014-12-21T00:40:10+5:302014-12-21T00:42:49+5:30
अग्निशामक बंबाला मिळेना वाट़़़
नाशिक : आगीच्या घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे याचे भान अग्निशामक दलाला नेहमीच असते वा त्यांना ते ठेवावेही लागते़ कारण वेळेवर न पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना ठावूक असतात़ अग्निशामक दलाला अशा घटनांच्या वेळी शहर वाहतूक शाखा, पोलीस आणि नागरिक यांनी सहकार्य करणे गरजेचे असते़ मात्र दुर्दैवाने शनिवारी कोठुळे वाड्याला लागलेल्या आगीत हे सहकार्य दिसून आले नाही़ सीबीएसपासून ते घारपुरे घाटापर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक दलाला घटनेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला़ रविवार पेठेतील गाडगीळ गल्लीतील कोठुळे वाड्याला आग लागल्यानंतर पंचवटी, सिडको, सातपूर, शिंगाडा तलाव या सर्व ठिकाणांहून अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले़ मात्र हे बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचूच शकले नाही़ याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील वाहतूक समस्या़ सीबीएसपासून ते अशोकस्तंभापर्यंत आणि त्याही पुढे घारपुरे घाटापर्यंत वाहतुकीची कोेंडी झाली होती़ या घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी याची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़ मात्र या नागरिकांना मनुष्यबळ कमी आहे, आम्हाला इतकेच काम आहे का अशा प्रकारची उत्तरे ऐकायला लागली़
वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देणे हे पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेचे तसेच सुज्ञ नागरिकांचेही काम आहे़ परंतु सुज्ञ नागरिक जर आपले कर्तव्य विसरत असतील तर त्यांना कायद्याने धडा शिकविणे हे पोलिसांचे काम आहे़ जेणे दुर्दैवी घटना घडलेल्या ठिकाणी मदत लवकर पोहोचेल व आर्थिक व जीवितहानी होण्यापासून वाचेल़ पोलिसांच्या भूमिकेबाबत या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात होती़