विसरवाडी येथे घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:20 PM2019-07-21T12:20:39+5:302019-07-21T12:20:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने गटारी, रस्ते व इतर समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, जुन्या गोसावी वाडय़ात अनेक वर्षापासून सांडपाणी वाहून नेणारी गटार नादुरुस्त स्थितीत असल्याने या गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे ठिक ठिकाणी डबके साचले असून, डासांचे प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गोसावी वाडय़ात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांनी याठिकाणी दगड विटा ठेवून पायवाट तयार केली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता येथील नागरिकांनी स्वखर्चाने रस्ता तयार करून घेतला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गटारी पाण्याने भरल्या गेल्याने हे सांडपाणी नागरिकांच्या घरात जात असल्याने नाराजी व्यक केली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने बाजार समिती परिसरात पाण्याची डबके साचल्यामुळे वराहांनी धुमाकूळ घातला असल्याने याठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.
यावेळी नागरिक व दुकानदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देण्यात आले आहे.