भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 08:08 PM2019-04-19T20:08:26+5:302019-04-19T20:08:47+5:30
राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पारंपारिक काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत ...
राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पारंपारिक काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने आपली जागा कायम राखण्यासाठी त्यांनी पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने ३५ वर्षात प्रथमच उमेदवार बदलला असून सलग सहा वेळा आमदार असलेले अॅड.के.सी.पाडवी यांना उमेदवारी देवून पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकुण ११ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट आहे. मतदारसंघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी स्वत: काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपचे केवळ दोन आमदार आहेत. त्यापैकी एका ठिकाणी डॉ.हिना गावीत यांचे वडील आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे प्रतिनिधीत्व करीत आहे. यावेळी प्रथमच दोन्ही पक्षातील सुशिक्षीत उमेदवार उच्चशिक्षीत असल्याने लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदारसंघात ६५ टक्के आदिवासी मतदार असून ३५ टक्के बिगर आदिवासी मतदार आहेत. दोन्ही उमेदवारांनी बिगर आदिवासी मतदारांची मते मिळविण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय भाजपचे बंडखोर उमेदवार तसेच बहुजन समाज पार्टी, वंचीत बहुजन आघाडी, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रमुख स्पर्धेत हे उमेदवार नसले तरी त्यांना मिळणाºया मतांवर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मतांची विभागणी आणि जातीय ध्रुवीकरण यावरच भाजप आणि काँग्रेसचा जय-पराजयाचे समिकरण अवलंबून आहे.