नवापूर शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:00+5:302021-04-14T04:28:00+5:30
धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराने शहरातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर उरकुन रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे. नवापूर शहरात ...
धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराने शहरातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर उरकुन रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे. नवापूर शहरात बँकेत, कॉलेज, वीज वितरण कंपनी, रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याला वळसा घालून शहरात मार्गस्थ होण्याची वेळ आली आहे. शहरातील आदर्शनगर, रंगेश्वर पार्क, वेडूभाई गोविंदभाई नगर, लखाणी पार्क परिसरातील नागरिकांना महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर रस्ता ओलांडून जाण्यासाठी अपघाताची भीती असल्याने महामार्ग प्राधिकरणाने शहरात जाण्यासाठी या भागातील नागरिकांना सर्व्हिस रोड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
नवापूर प्रवेशद्वाराजवळ रस्ता अरुंद झाल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे शहरातील नवापूर उपजिल्हा रुग्णालयापासून ते देवळफळीपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम लवकर करावे, अशी मागणी होत आहे. एक महिन्यापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली होती. परंतु शहरात संथगतीने काम सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ठेकेदाराने शहरातील काम लवकरात लवकर पूर्ण करावी व नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे
धुळे-सुरत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने ते खड्डे पुरविण्याची मागणीदेखील ग्रामस्थांनी केली आहे. रात्रीच्यावेळी महामार्गावरील छोटे-मोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. संबंधित ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे लवकर बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रायंगण फरशीचे काम लवकर करावे
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने रायंगण गावाजवळ धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी वाहनचालक मार्गस्थ होताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गात वाहून गेलेल्या छोट्या फरशीचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही.