किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:49 PM2018-05-22T18:49:51+5:302018-05-22T18:49:51+5:30

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़

Heavy water shortage in Kinwat-Mahur taluka | किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

googlenewsNext

नांदेड : किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ दरवर्षी उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे़ 

किनवट : पैनगंगा नदी व मोठ्या नाल्याच्या काठावरील किनवट शहरातील पाणीपातळी पार खोल गेल्याने शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ जवळपास ११ वस्त्यांमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे़ शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असून पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़ 

दररोज तीन हजार लिटरच्या तीन व पाच हजार लिटरच्या तीन अशा एकूण सहा टँकरने २ लाख ४० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे़ २८ हजार ४५४ लोकसंख्या असलेल्या शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी  उन्हाळ्यात निर्माण होतो़ ३० विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे़ मात्र रामनगर, जुनी कापडलाईन, सराफा लाईन, जफारखान नगर, धोबी गल्ली, भोई गल्ली, बाबा रमजान, विठ्ठलेश्वर मंदिर, लोहार गल्ली, मोमीनगुडा, साईनगर, इस्लामपुरा, गंगानगरसह अन्य भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे़ नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या टीमने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

आ़प्रदीप नाईक यांनीसुद्धा पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून तीन टँकर नगरपालिकेला देऊन  दिलसा दिला़ उल्लेखनीय म्हणजे, पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून वेळीच वॉल्व्ह व गेट न टाकल्याने बंधारा कुचकामी ठरत आहे़ शिवाय शहरालगतच्या नाल्यावर दोन बंधारे असूनही त्याही बंधाऱ्याची तीच परिस्थिती आहे़ बंधारे बांधून मोकळे झाले असले तरी बंधाऱ्यात पाणी साठते की नाही, याचे ना नगरपालिकेला देणे आहे ना संबंधित खात्याला? त्यामुळे बंधारे बांधून उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे़ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी भूगर्भच कोरडाठाक असल्याने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रूई येथे मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  पायपीट कराव्या लागणाऱ्या गावकऱ्यांना घागरभर पाणी दुरापास्तच झाले होते. ही परिस्थिती समजून माजी सरपंच गुमानसिंग चुंगडे यांनी आपल्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन केली. स्वतंत्र नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले आहेत.

माहूर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्म्याहूनही खूप कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी डिसेंबर महिन्यातच नदी- नाले कोरडे पडले. विहिरी आटल्या, हातपंप (बोअरवेल) पाण्याच्या जागी हवा फेकू लागले, अशी भयावह परिस्थिती माहूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत निर्माण झाली. काही गावांत पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट तर काही गावांतील पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून असल्याने कोरडीठाक पडलेली नदी पाणीपुरवठा योजनेसाठी आडकाठी झाली. अशात शासनाचे टँकर काही गावांत तर काही गावांत खाजगी टँकर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने  पाठवित आहेत. परंतु, मौजे रुई येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुमानसिंग चुंगडे यांनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणले व घरासमोर नळाची स्वतंत्र व्यवस्था करून गावकऱ्यांसाठी हे नळ सार्वजनिक केले. त्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागत असून गुमानसिंग यांच्या या स्तुत्य उपक्रमाने पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आ़ प्रदीप नाईक, जि़प़चे उपाध्यक्ष समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी यु़डी़मंडाळे यांनी केले आहे.

Web Title: Heavy water shortage in Kinwat-Mahur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.