मद्यपाशातून सोडविण्याचे कार्य अखंड राहावे
By admin | Published: May 23, 2015 02:54 AM2015-05-23T02:54:48+5:302015-05-23T02:54:48+5:30
शिक्षण क्षेत्रात काम करताना मुलांच्या पालकांना दारूचे व्यसन असल्याचे कळते. त्याचे वाईट वाटते. दारूचे व्यसन असणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो.
रवींद्र फडणवीस : ‘अल्कोहोलिक अॅनानिमस’चा ११ वा वर्धापन दिन
नागपूर : शिक्षण क्षेत्रात काम करताना मुलांच्या पालकांना दारूचे व्यसन असल्याचे कळते. त्याचे वाईट वाटते. दारूचे व्यसन असणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो. त्यांचे अभ्यासातही लक्ष लागत नाही आणि काही मुले तर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याचाही निर्णय घेतात. पालकांच्या दारूच्या व्यसनाने घराची वाताहत होते, हे अनेकदा अनुभवायला येते. त्यामुळेच ‘अल्कोहोलिक अॅनानिमस’ संस्था करीत असलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. लोकांना मद्यपाशातून सोडविण्याचे हे कार्य अखंड चालत राहणे निकोप समाजासाठी आवश्यक असल्याचे मत रवींद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
‘अल्कोहोलिक अॅनानिमस’ संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टी, राजेश एम, मोहन आर प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम हिंदू मुलींची शाळा, महाल येथे आयोजित करण्यात आला. फडणवीस म्हणाले, ही मुलींची शाळा आहे. अनेक पालकांना दारूचे व्यसन असल्याने मुली तणावात राहतात. दारूमुळे घरातही आर्थिक चणचण निर्माण होते आणि त्याचा मुलांवर परिणाम होतो. त्यामुळेच दारुचे व्यसन सोडविण्यासाठी असलेले संस्थेचे हे काम नव्या पिढीलाही उपकारक आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी सतीश के यांनी संस्थेचा इतिहास सांगितला. मोहन के आणि प्रकाश आर यांनी त्यांचे अनुभव सांगितले. दारू पिणे हा एक आजार आहे. हा आजार बरा होणारा नाही पण त्यावर उपाय मात्र आहेत. दारू सोडण्याचा विचारही करू नका पण आजचा दिवस दारू पिणार नाही, असे प्रत्येक दिवशी ठरवा.
याच पद्धतीने अनेक लोक दारूपासून दूर झाले आहेत. राजू पी यांनीही यावेळी अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पराग डी यांनी तर आभार ज्ञानेश्वर टी यांनी मानले. (प्रतिनिधी)