हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:46 PM2018-02-03T23:46:52+5:302018-02-03T23:54:57+5:30

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Vidarbha 'Capital' of Head and Neck Cancer | हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

Next
ठळक मुद्दे२२.७ टक्के रुग्ण : मेडिकलमध्ये गेल्या वर्षी २,४६३ नव्या रुग्णांची नोंदजागतिक कर्करोग दिन

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
५० टक्के कर्करोगाला (कॅन्सर) तंबाखू हे कारणीभूत ठरते. भारतात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बिडी ओढणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे.  महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट ओढतात, २.७ टक्के बिडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे.
कॅन्सरची ओपीडी ३०० ने वाढली - डॉ. दिवाण
मेडिकलच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २,२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०१६ मध्ये ही संख्या २,१५७ होती तर गेल्या वर्षी यात ३०० ने वाढ होऊन नव्या रुग्णांची संख्या २,४६३ वर पोहोचली आहे. यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ - डॉ. कांबळे
मेडिकलच्या कॅन्सर रोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले की, दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यातुलनेत शासकीय सोयी उपलब्ध नाहीत. मेडिकलमध्ये आजही कालबाह्य झालेल्या कोबाल्ट यंत्रावर रुग्णांवर उपचार होतात. विदर्भात वाढत्या कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर इन्स्टिट्यूट महत्त्वाचे झाले आहे. शासनाने त्यादृष्टीने वेगाने पाऊल टाकणे आवश्यक आहे.
२०२० पर्यंत १७.३ लाख नवे रुग्ण-डॉ. मानधनिया
प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले, भारतात सध्या ३ दशलक्ष लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत. २०२० पर्यंत कॅन्सरच्या नव्या रुग्णांची संख्या १७.३ लाखांवर आणि ८.७ लाख सांभाव्य मृत्यूची शक्यता आहे. पुरुषांमध्ये ‘ओरल’, ‘लंग्स’ तर महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असून मृत्यूचा धोका ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कॅन्सर
२०१४मधील नागपुरातील कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’चे सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के रुग्ण आहेत.दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाच्या कॅन्सरचे १५.१ टक्के तर स्तनाच्या कॅन्सरचे १४.९ टक्के रुग्ण आहेत.
कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी आले २० कोटी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. शासनाने यंत्रसामुग्रीसाठी २० कोटी रुपये दिले. परंतु इमारत नसताना यंत्रसामुग्रीसाठी देण्यात आलेला हा निधी वादात सापडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बैठक घेऊन हा निधी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी वापरण्यास मंजुरी दिल्याचे समजते. यामुळे पुढील काही महिन्यात इन्स्टिट्यूच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Vidarbha 'Capital' of Head and Neck Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.