फुटाळा तलावाला विसर्जनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:37 AM2017-08-22T00:37:02+5:302017-08-22T00:37:26+5:30
शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी संस्थांनी शहरातील तलावांच्या पाण्याचे शास्त्रीय परीक्षण केले असता, पाण्यात आढळणाºया घटकांवर त्याचे परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. या परीक्षणात फुटाळ्यातील पाण्याच्या घटकांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. येणाºया गणपती उत्सवात विसर्जनावर नियंत्रण न मिळविल्यास फुटाळा धोक्याची पातळी ओलांडणार असल्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेतर्फे सोनेगाव, फुटाळा व गांधीसागर तलावातील पाण्याचे परीक्षण करण्यात आले. प्रत्येक तलावातील पाण्याचे सहा नमुने घेण्यात आले. पाण्यात आम्लता, तापमान, गढूळपणा व आॅक्सिजनचे प्रमाण हे चार महत्त्वाचे घटक असतात. संस्थेतर्फे या चारही घटकाचे तलावातील प्रमाण नोंदविण्यात आले. या चारही घटकात आॅक्सिजनचे प्रमाण महत्त्वाचा घटक आहे. गांधीसागर आणि सोनेगाव तलावाच्या तुलनेत फुटाळ्याच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. त्याचबरोबर पाऊस कमी झाल्याने पाण्यात गढूळपणाही आढळला. लवकरच गौरी, गणपती आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. शहरात १३०० च्या जवळपास सार्वजनिक गणपती मंडळ आहेत. सोनेगाव, सक्करदरा तलावात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणपतीबरोबरच घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर पडणार आहे. विसर्जनावर अपेक्षित अंकुश न लावल्यास तलावातील आॅक्सिजनची पातळी घटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तलावातील जीवाष्मांना धोका होण्याची शक्यता आहे.
फुटाळ्याच्या परीक्षणात आलेले निष्कर्ष खरंच गंभीर आहेत. त्याचा परिणाम पाण्यातील जीवाष्मांना होणार आहे. येणाºया उत्सावाच्या काळात तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनासोबत जनतेचेही कर्तव्य आहे.
कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल