नागपुरात एकमेकांचा गेम करण्याची तयारी फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:08 PM2018-03-03T22:08:56+5:302018-03-03T22:09:18+5:30
मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राने नेलेली मोटरसायकल लवकर परत आणली नाही म्हणून झालेल्या वादानंतर परस्पराचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तीन सशस्त्र आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बुधवारी धुळवडीच्या दिवशी एक मोठा गंभीर गुन्हा टळला.
कमल दिलीप दमके (वय २७, रा. बेसा मार्ग, रामटेकेनगर) राज ऊर्फ भल्ला अरविंद गणवीर (वय २८, रा. बेलतरोडी)आणि राजू जीवन रामटेके (वय २८, रा. महाकालीनगर, कालीमाता मंदिरजवळ बेलतरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.
हे तिघेही एकमेकांना ओळखतात. धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास रामटेके त्याची पहिली पत्नी मनीषा हिला भेटायला महाकालीनगरात गेला होता, सोबत त्याचा मित्र अनिल चैरावार होता. तेथे त्यांना आरोपी कमल दमके भेटला. अनिलला तातडीने भाजी घरी घेऊन जायची होती. त्यामुळे त्याने दमके याची मोटरसायकल नेली. बराच वेळ होऊनही अनिल मोटरसायकल घेऊन परत आला नाही. त्यामुळे आरोपी दमकेने रामटेकेसोबत वाद घालून त्याला मारहाण केली. तेवढ्यात त्याचा साथीधार भल्ला गणवीर तेथे आला. दमकेने चिथावणी दिल्याने भल्लाने आपल्या जवळचे घातक शस्त्र बाहेर काढले. ते पाहून रामटेकेने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे बाजूची मंडळी धावत आल्याचे पाहून आरोपी गणवीर आणि दमके तेथून पळून गेले.
दरम्यान, अनेकांसमोर मारहाण आणि शिवीगाळ झाल्याने राजू रामटेके अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन गणवीर आणि दमकेचा शोध घेऊ लागला. या भागात गस्तीवर असलेल्या अजनीच्या पोलीस पथकाला तो दिसला. पोलिसांनी रामटेकेला अटक करून त्याच्याकडून चाकू जप्त केला. चौकशीत त्याने गणवीर आणि दमकेला धडा शिकविण्याच्या तयारीने आपण निघालो होतो, अशी माहिती दिली. त्यांच्याकडे घातक शस्त्र असून, ते गेम करण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांना सांगितले.
पोलिसांची धावपळ
पोलिसांनी लगेच शोधाशोध करून आरोपी गणवीर आणि दमकेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली. परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे, बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप आगरकर, हवालदार अविनाश ठाकरे, नायक रणधीर दीक्षित, संतोश, प्रशांत सोनुलकर, राजेंद्र नागपुरे आणि महिला शिपायी भाग्यश्री यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तिन्ही आरोपी गजाआड झाले. परिणामी धुळवडीच्या दिवशी एक गंभीर गुन्हा टळला.