देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:13 AM2017-11-18T10:13:01+5:302017-11-18T10:16:48+5:30

स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे.

Now a joint action plan for the Naxals of the country | देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

Next
ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांचा संकल्पनागपुरात ठरली व्यूहरचना

नरेश डोंगरे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कानून के हात बहोत लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. यापुढे आता कानून के हात लंबे आणि खूप सारे असणार आहे. होय, स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे. या एकत्रित हाताच्या बळकटीतून नक्षल चळवळीची मानगूट आवळण्याची व्यूहरचना शुक्रवारी नागपुरात आयोजित विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
भारतातील अनेक राज्याच्या सुरक्षा यंत्रणांपुढे नक्षलवाद डोकेदुखीचाच विषय आहे. राज्याच्या राजधानीच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती १९८२ ला झाली. निसर्गाने वनवैभवाची, खनिजाची गडचिरोली-गोंदियावर मुक्त उधळण केली आहे. मात्र, नक्षल्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला अशी काही उधळी लावली की येथील जनजीवन प्रचंड दहशतीत आले. नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या हिंसक घटना घडवून ३५ वर्षांत पोलीस खबरे असल्याच्या संशयावरून ४७४ सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या. वेळोवेळी घातपात घडवून १९१ पोलिसांचे जीव घेतले. कर्तव्यावर असलेल्या ५११ पोलिसांना जीवघेण्या जखमा दिल्या. पोलिसांसोबत विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या २० जणांना क्रूरपणे मारले. तोडफोड, जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २९ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले. हे केवळ एकट्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भयावह चित्र आहे. असेच किंवा याहीपेक्षा भयावह चित्र छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. अबूझमाड, दंतेवाडा हे परिसर नक्षल्यांच्या गुहा मानल्या जातात. नक्षलवादाचा साप कधी अन् कुठे वळवळेल आणि कुणाचा बळी घेईल, याचा काहीच नेम नाही. केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्य सरकार आपापल्या परीने तीन दशकांपासून नक्षलवादाविरोधात झुंजत आहे. मात्र, नक्षलवाद संपण्याऐवजी वाढतच आहे. अलीकडे नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फायदा झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह अनेक भागातील नक्षलवाद बॅकफूटवर आहे. त्याला तसाच मागे सारण्यासाठी विविध राज्यातील पोलिसांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ), आयटीबीपीचेही पाठबळ मिळाले आहे. या सर्वांनी मिळून नक्षलवादाविरुद्ध एक नवी आक्रमक ‘आॅपरेशन’ची तयारी चालवली आहे.
त्यासाठी येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ) सुराबर्डीतील केंद्रात शुक्रवारी विविध राज्यातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, एएनओचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) डी. कनकरत्नम, बालाघाटचे एडीजी श्री जनार्धन त्याचप्रमाणे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील २८ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशावरून एएनओचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. एका राज्यात घातपात करून बाजूच्या राज्यात पळून जायचे. तेथे काही दिवस थांबल्यानंतर तेथील नक्षल्यांकडून घातपात करवून पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जायची नक्षली नेत्यांची क्लृप्ती यापुढे चालू द्यायची नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

नेते अन रसद पुरविणाऱ्यांवर नजर
विविध राज्यातील शिर्षस्थ नक्षली नेते, दलम कमांडर आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची, त्यांच्या कार्यपद्धतीची बारीकसारीक माहिती एक दुसऱ्यांना पुरवून नक्षल्यांचे कटकारस्थान उधळून लावण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. नक्षल्यांना रसद पुरविणाऱ्यांवर कडक नजर ठेवतानाच नक्षली नेते, फ्रंटल आॅर्गनायझेशनवरही सूक्ष्म नजर ठेवून नक्षल चळवळीची मानगूट पकडण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला.
सुरक्षा यंत्रणांच्या या बळकट एकत्रीकरणातून भविष्यात चांगले परिणाम बघायला मिळेल,असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.

Web Title: Now a joint action plan for the Naxals of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.