राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:38 AM2018-10-01T10:38:17+5:302018-10-01T10:40:31+5:30
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपलब्ध नाही.
![National Voluntary Blood Donation Day; 1.4% of blood donors inhibited hepatitis B | राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित National Voluntary Blood Donation Day; 1.4% of blood donors inhibited hepatitis B | राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/01-blood-bank_201810139667.jpg)
राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस; १.४ टक्के रक्तदाते हिपॅटायटिस-बी बाधित
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. मात्र राज्याच्या एकाही शासकीय रक्तपेढीत रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली अत्याधुनिक ‘नॅट’ (न्यूक्लिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान उपलब्ध नाही. धक्कादायक म्हणजे, ‘इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्युजन मेडिसीन’चे अध्यक्ष डॉ. आर. एन. मकरू यांच्यामते, भारतात ‘१.४’ टक्के रक्तदाते हे ‘हेपेटायटिस बी’ पॉझिटिव्ह तर ‘०.२’ टक्के रक्तदाते हे एचआयव्हीबाधित आहेत. परिणामी, सामान्य रुग्णांना कसे मिळणार सुरक्षित रक्त, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी १ आॅक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘सुरक्षित रक्तदात्याची निवड करण्याच्या प्रक्रियेला’ किती रक्तपेढ्या गंभीरतेने घेतात याकडे आता लक्ष वेधले जात आहे.
उपराजधानीत दोन खासगी रक्तपेढ्या सोडल्या तर मध्यभारतात शासकीय व इतर खासगी रक्तपेढ्यांमध्ये ‘नॅट’ तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. सामान्यपणे रुग्णाला रक्त देताना ‘एचआयव्ही-१’, ‘एचआयव्ही-२’, ‘हिपॅटायटिस -बी’, ‘हिपॅटायटिस-सी’, गुप्तरोग आणि मलेरिया या चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यातून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री करून घेतली जाते. आजही या चाचण्या जिथे ‘नॅट’ नाही तिथे ‘एलायजा’पद्धतीने केल्या जातात.
‘एलायजा’ पद्धतीने एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट यायला ‘विंडो पिरियड’ कालावधी तीस दिवसांचा लागतो. परंतु ‘नॅट’ तंत्रज्ञानाने केवळ सहा ते आठ दिवसांमध्ये या चाचणीचा अहवाल मिळतोे. जेथे ‘हिपॅटायटीस-बी’ निष्पन्न होण्याचा कालावधी ‘एलायजा’ने ५८ दिवसांचा आहे, तेथे ‘नॅट’मुळे हे १२ ते १५ दिवसांवर येतो. ‘एलायजा’ने ‘हिपॅटायटीस- सी’चे निदान होण्यास ७० दिवस लागतात, मात्र ‘नॅट’मुळे आठ ते बारा दिवसांत त्याची माहिती मिळते. ‘नॅट टेस्ट’ तंत्रज्ञान ‘विंडो पिरियड’ कमी करत असल्याने विषाणू बाधेची शक्यता अनेक पटींनी कमी होते. रक्त संक्रमणदरम्यान सुरक्षित रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांनी ‘नॅट टेस्टेड’ रक्ताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, शासन याला कधी गंभीरतेने घेत नसल्याचे वास्तव आहे.
दूषित रक्ताचे प्रमाण वाढत आहे
४नुकत्याच झालेल्या एका कार्यशाळेत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मकरू म्हणाले, भारतात रक्तपेढीत किंवा शिबिरात आलेल्या रक्तदात्याला एकापेक्षा जास्त जणांसोबत शरीरसंबंध आहेत का, हे विचारलेच जात नाही. परिणामी, दूषित रक्ताचे प्रमाण वाढत आहे. आपल्याकडे रक्तामधील विषाणूंचे अस्तित्व ओळखण्याचे काम बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ‘एलायजा’ पद्धतीने केले जाते. परिणामी, रु ग्ण त्या-त्या संसर्गाने बाधित होण्याची शक्यता असते. शस्त्रक्रिया करताना डॉक्टर जसे रुग्णाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र लिहून घेतो, तसेच रक्ताबाबतही लिहून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक रक्तपेढीला ‘नॅट’ तंत्रज्ञान आवश्यक आहे. नागपूर मेडिकलमधून नॅट तंत्रज्ञानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनस्तरावर तो विचाराधीन आहे. शासनाने हे अद्यावत यंत्र उपलब्ध करून दिल्यास व केंद्रीकरण झाल्यास याचा फायदा मेडिकलसह, डागा, मेयो व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांना होऊ शकेल.
-डॉ. संजय पराते,
रक्तपेढी प्रमुख, मेडिकल