उपराजधानीत ६१ वर्षांत केवळ साडेसहा टक्के महिला उमेदवार

By योगेश पांडे | Published: September 20, 2023 11:02 AM2023-09-20T11:02:10+5:302023-09-20T11:04:04+5:30

महिला उमेदवारांना कधी मिळणार संधी? : राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची उदासीनताच

In Nagpur only six and a half percent women candidates in 61 years; Indifference of national and regional parties | उपराजधानीत ६१ वर्षांत केवळ साडेसहा टक्के महिला उमेदवार

उपराजधानीत ६१ वर्षांत केवळ साडेसहा टक्के महिला उमेदवार

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : प्रत्येकच पक्षाकडून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासंदर्भात मोठेमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राजकारणातमहिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सर्वच ठिकाणी उदासीनता आहे. मागील ६१ वर्षांत नागपुरातून हजारावर उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ७४ इतकी ठरली. यातही डॉ. सुशीला बलराज व दमयंतीबाई देशभ्रतार वगळता एकाही महिला उमेदवाराला विधानसभेत पोहोचण्यात यश आले नाही.

१९६२ ते २०२३ या कालावधीत नागपूरने एकूण १३ निवडणुका पाहिल्या. २०१९ पर्यंतच्या उमेदवारांची संख्या ही १ हजार ११७ इतकी ठरली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ७४ म्हणजेच ६.६२ टक्के इतकीच ठरली आहे.

१९६२, १९६७ व १९७२ साली लढण्यात आलेल्या पहिल्या तीन निवडणुकांत कॉँग्रेसने डॉ. सुशीला बलराज यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. १९६२ साली नागपूर व त्यानंतर सलग दोनदा पश्चिम नागपूर मतदारसंघातून त्या निवडून गेल्या होत्या. १९७८ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसकडून त्या उभ्या झाल्या, मात्र विजयी चौकार मारण्याची त्यांची संधी हुकली. त्यानंतर कॉँग्रेसने १९८५ साली उत्तर नागपुरातून दमयंतीबाई देशभ्रतार यांना तिकीट दिले. आश्चर्याची बाब म्हणजे प्रथमच उत्तर नागपुरात कॉँग्रेसला विजय मिळाला होता. या चार निवडणुका वगळता नागपुरातून एकदाही महिला उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.

जनसंघाकडून पहिल्याच निवडणुकीपासून सुमतीताई सुकळीकर यांनी किल्ला लढविला होता. मर्यादित मनुष्यबळातदेखील त्यांनी सलग चार वेळा निवडणूक लढविली. यात १९६२ साली नागपूर मतदारसंघ व त्यानंतर १९६७, १९७२ व १९७८ (जनता पार्टी)मध्ये नागपूर पश्चिममधून त्या उभ्या राहिल्या. परंतु चारही वेळा त्यांना विजयश्रीने हुलकावणीच दिली. त्यानंतर भाजपची स्थापना झाली व भाजपने एकाही महिला उमेदवाराला शहरातून आजपर्यंत तिकीट दिलेले नाही.

सर्वाधिक उमेदवारी उत्तर नागपुरातून

१९६२ साली नागपूर, नागपूर-१, नागपूर-२, नागपूर-३ असे मतदारसंघ होते. १९६७ साली मतदारसंघांना नावे मिळाली. त्यामुळे १९६७ पासूनच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले असता पश्चिम नागपुरात आतापर्यंत २३ महिला उमेदवारांनी आव्हान दिले. तर उत्तर नागपुरातून २४ महिला उमेदवार उभ्या झाल्या. दक्षिण नागपूर (८), मध्य नागपूर (९), दक्षिण-पश्चिम नागपूर (६) व पूर्व नागपूर (१) अशी आकडेवारी राहिली आहे.

सर्वाधिक आव्हान अपक्ष स्वरूपात

राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी हव्या त्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली नसल्याचे चित्र आहे. कॉँग्रेसने चार वेळा महिलांना उमेदवारी दिली, तर जनसंघाने तीनदा महिलांवर विश्वास टाकला होता. जनता पार्टीने एकदा उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व बसपने दोन महिलांना आतापर्यंत संधी दिली आहे. ४१ अपक्ष महिलांनी आव्हान उभे केले, तर इतर पक्षांनी २३ महिलांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसने १९५२, १९५७ व १९९६ साली महिलांना उमेदवारी दिली.

मतदारसंघनिहाय महिला उमेदवार (१९६७ ते २०१९)

मतदारसंघ महिला उमेदवार

दक्षिण-पश्चिम नागपूर - ७

दक्षिण नागपूर - ८

पश्चिम नागपूर - २३

मध्य नागपूर - ९

उत्तर नागपूर - २४

पूर्व नागपूर -१

लोकसभेतही पक्षांची उदासीनताच

१९५२ ते २०२३ या कालावधीत नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ निवडणुका झाल्या व त्यात ३३२ उमेदवार उभे राहिले. मात्र यापैकी महिला उमेदवारांची संख्या ही केवळ २३ म्हणजे अगदी ६.९० टक्के इतकीच होती. १९५२ व १९५७ साली लढण्यात आलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत कॉंग्रेसने अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते व मतदारांनीदेखील महिलाशक्तीवर विश्वास टाकला. त्या सलग दोनदा नागपूर मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्यानंतर पुढील चार निवडणुकांत नागपुरातून एकही महिला निवडणुकीत उभी झाली नाही. त्यानंतर १९८० व १९८४ साली प्रत्येकी एक अपक्ष, १९८९ साली चार अपक्ष महिलांनी भाग्य अजमाविले.

१९९६ साली कॉंग्रेसने कुंदाताई विजयकर यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांना विजय मिळू शकला नाही. १९९८, २००४ साली परत प्रत्येकी एका अपक्ष महिला निवडणुकीच्या रिंगणात होती. २००९ साली बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे ॲड. सुलेखा कुंभारे यांनी अर्ज भरला. याशिवाय प्रतिभा खापर्डे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. मात्र या दोघींनाही अनुक्रमे ०.१३ व ०.१२ टक्के मतेच प्राप्त झाली. २०१४ सालच्या निवडणुकीत ‘आप’च्या अंजली दमानिया यांची हवा निर्माण झाली होती. मात्र ही हवा मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही.

Web Title: In Nagpur only six and a half percent women candidates in 61 years; Indifference of national and regional parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.