- तर उन्हाळ्यात भार नियमन अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:48 PM2018-03-05T19:48:13+5:302018-03-05T19:48:45+5:30

महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.

- If in this summer load sheding is inevitable! | - तर उन्हाळ्यात भार नियमन अटळ !

- तर उन्हाळ्यात भार नियमन अटळ !

Next
ठळक मुद्दे१९ टक्के कोळशाचा तुटवडा : रोज १.५० लाख टन कोळशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महाजनकोला आवश्यक कोळसा मिळाला नाही तर, या उन्हाळ्यात भार नियमन अटळ आहे. सध्या महाजनकोला रोज १९ टक्के कमी कोळसा पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात वाढणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महाजनकोने रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची मागणी केली आहे. त्यामुळे कोळसा कंपन्यांपुढे मोठे आव्हान आहे.
महाजनकोने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही स्थिती स्पष्ट केली आहे. मार्च ते जून या काळात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने उपयोगात आणणे आवश्यक आहे. त्याकरिता रोज १ लाख ५० हजार १०० टन कोळशाची गरज भासणार आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोळसा कंपन्यांनी महाजनकोला रोज १ लाख १९ हजार मॅट्रिक टन कोळसा देण्याचे मान्य केले होते. परंतु, आतापर्यंत महाजनकोला दर दिवशी सुमारे ९५ हजार ७७३ टन कोळसा मिळाला आहे. पुरवठ्यात रोज १९ टक्के कोळशाचा तुटवडा आहे. परिणामी, क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती होत आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने महाजनकोचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी १४ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली. उच्च न्यायालयात कोळसा आयात व त्यात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.
२२ दिवसांचा साठा आवश्यक
मार्गदर्शकतत्वानुसार महाजनकोच्या प्रत्येक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. पुरेसा साठा ठेवला तरच भविष्यात येणाऱ्या अडचणींचा वीज निर्मितीवर परिणाम होणार नाही. सध्या देशातील ४६ औष्णिक प्रकल्पांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत महाजनकोच्या चंद्रपूर प्रकल्पात ४ लाख ७० हजार, पारसमध्ये ४१ हजार, परळीमध्ये १ लाख ३५ हजार, नाशिकमध्ये ६६ हजार, भुसावळमध्ये ७५ हजार, कोराडीमध्ये १ लाख ४२ हजार तर, खापरखेडामध्ये १ लाख ३८ हजार टन कोळशाचा साठा होता असे महाजनकोने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Web Title: - If in this summer load sheding is inevitable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.