पोलीस सतर्क असते तर टळली असती नागपुरातील हरिदासची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:53 PM2020-04-22T23:53:01+5:302020-04-22T23:54:09+5:30

सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही.

Had the police been vigilant, the murder of Haridas in Nagpur would have been avoided | पोलीस सतर्क असते तर टळली असती नागपुरातील हरिदासची हत्या

पोलीस सतर्क असते तर टळली असती नागपुरातील हरिदासची हत्या

Next
ठळक मुद्देआईवडिलांसह कुख्यात बंटीला अटक : नागरिक प्रचंड संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही. पोलिसांच्या या ढिलेपणामुळे सक्करदरा परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेचे पडसाद कधीही उमटू शकतात. दरम्यान पोलिसांनी आरोपी गुंड शेरखान शेख ऊर्फ बंटी याला आईवडिलासह अटक केली आहे.
४५ वर्षीय हरिदासची मंगळवारी सायंकाळी ४ वाजता भांडे प्लॉट चौकात बंटी आणि त्याच्या वडिलाने हत्या केली होती. या दोघांचीही हरिदास आणि डॉ. नितीन गुडंकवार यांच्यासह अन्य चार जणांसोबत वाद होता. एनआयटीने बंटीचे अवैध दुकान तोडले होते. त्याने बिल्डरकडून दुकान खरेदी केले होते. मात्र तो बिल्डरला सोडून हरिदास आणि अन्य तिघांकडून पैसे मागत होता. मागील काही दिवसांपासूनच डॉ. गुडंकवार आणि हरिदास यांना अद्दल घडविण्याच्या तयारीत तो होता. तो याच परिसरात आपल्या आईवडिलांसोबत राहतो. हरिदासला एकटे असल्याचे पाहून बंटी आणि त्याच्या वडिलांनी हल्ला केला. त्याची आई आबेदा ही सुद्धा या दोघांनाही त्याची हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. हरिदासची पत्नी रंजना पतीला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता बंटीने तिलाही शिव्या देऊन धमकावले. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हरिदासचे नातेवाईक आणि नागरिकांनी सक्करदरा पोलिसांवर रोष व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिलाईमुळेच ही घटना घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी तपास करून तिघांनाही बुधवारी सकाळी ताब्यात घेतले.
बंटी आणि त्याच्या वडिलाची भांडे प्लॉट चौकात दहशत आहे. तो नेहमी कारमध्ये शस्त्र बाळगतो. त्याने जुलै २०१९ मध्ये भांडे प्लॉट चौकातील एक जनरल स्टोअर्स उद्ध्वस्त केले होते. १८ मार्चला डॉ. गुडंकवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी फक्त बंटीलाच आरोपी बनविले. तो १५ दिवसातच जमानतीवर बाहेर आला. बाहेर आल्यापासूनच तो हरिदासच्या हत्येच्या तयारीत होता. हरिदास, डॉ. गुडंकवार, रोहित वर्मा आणि संदीप महंत यांच्या तो सतत पाळतीवर असायचा. या चौघांवर त्याने बरेचदा हल्ला केला होता. सक्करदरा पोलिसात आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या होता. मात्र कारवाई होत नव्हती. १८ मार्चला डॉ. गुडंकवारवर प्राणघातक हल्ला केल्यानंतरही पोलिसांनी बंटीला पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला होता. अलिकडेच दोन दिवसापासून डॉ. गुडंकवार क्लिनिक उघडायला लागले होते. हरिदास त्यांना भेटायला यायचा. या दोघांवरही बंटीचा डोळा होता. गुडंकवार यांनी क्लिनिकजवळ बंटीला पाहिले होते. सुरक्षेसाठी ते क्लिनिकबाहेर निघणे टाळायचे. मात्र दुर्दैवाने हरिदास गुंडांच्या हातात लागला.

कारमध्ये असायचे सशस्त्र गुंड
बंटी नेहमी कारमध्ये शस्त्र घेऊन गुंडांसोबत फिरायचा. कारच्या काचांना काळी फिल्म लावली असल्याने आत कोण आहे ते कळत नसे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात सक्करदरा पोलिसांना आणि वरिष्ठांना अनेकदा बंटीच्या कारबद्दल माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी एकदाही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही.

नुकसान भरपाईची मागणी
हरिदासच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबापुढे मोठेच संकट आले आहे. जगण्याचाही प्रश्न आहे. हरिदासने हत्येच्या काही वेळापूर्वीच डॉ. गुडंकवार यांच्याशी चर्चा केली होती. व्यवसाय ठप्प पडल्याने मोठे आर्थिक संकट आल्याचे सांगितले होते. नागरिकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून घटनेची उच्चस्तरीय चौकशीची आणि हरिदासच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. झोन चारच्या डीसीपी निर्मला देवी यांनी हरिदासच्या पत्नीची भेट घेऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Had the police been vigilant, the murder of Haridas in Nagpur would have been avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.