आंबेडकर रुग्णालय पडणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:13 AM2017-08-19T02:13:55+5:302017-08-19T02:14:27+5:30

उत्तर नागपूर ते कामठीपर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा कारभार दहा डॉक्टरांच्या भरोवशावर कसातरी पेलला जात असताना यातील पाच डॉक्टरांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.

 Ambedkar Hospital will stop! | आंबेडकर रुग्णालय पडणार बंद!

आंबेडकर रुग्णालय पडणार बंद!

Next

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपूर ते कामठीपर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा कारभार दहा डॉक्टरांच्या भरोवशावर कसातरी पेलला जात असताना यातील पाच डॉक्टरांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यातील दोघे बदलीच्या ठिकाणी रुजू झाले असून उर्वरित तीन डॉक्टरही बदलीच्या ठिकाणी जाणार असल्याने हे रुग्णालय बंद पडण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राला १२ वर्षे झालीत, मात्र हे रुग्णालय आजही बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) हे रुग्णालय मेयोच्या देखरेखीखाली चालविले जात असलेतरी येथे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नऊ डॉक्टरांवर या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी होती. हे डॉक्टर औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्णसेवा देत होते. डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पुरेसे मुनष्यबळ नसल्याने यातील एक जरी डॉक्टर किंवा तंत्रज्ञ रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित व्हायची. चार वर्षांपूर्वी नऊमधून दोन डॉक्टरांची पदोन्नती होऊन दुसºया रुग्णालयात बदली करण्यात आली, तर एक डॉक्टर ‘डीएमईआर’मध्ये रुजू झाले. त्यांच्या बदल्यात तीन डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी डॉ. एस.एल. कराडे व डॉ. डी.एस. शिंगणावार यांची बदली प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आली. मात्र त्यांच्या जागी एकही डॉक्टर आले नाही. यातच चार दिवसांपूर्वी डॉ. एल.एम. माटे, डॉ. एच.ए. श्रीवास्तव व डॉ. ए.बी. गेडाम यांची मौदा येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयात बदली झाल्याचे आदेश धडकले.
तूर्तास त्यांना पदमुक्त करण्यात आले नसले तरी आज ना उद्या त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यामुळे पाच डॉक्टरांवर या रुग्णालयाची जबाबदारी येणार आहे. यातील चार डॉक्टर कंत्राटी पद्धतीवरील असल्याने ते कधीही सोडून जाऊ शकतात. आरोग्य विभागाने आपले डॉक्टर काढून घेतल्याने व डीएमईआर कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती करून घेत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याची व लवकरच या रुग्णालयाला टाळे लागण्याची शक्यता आहे.
पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार संस्थेवर फेरले पाणी
या रुग्णालयाला पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्थेत रूपांतरित करण्याचा निर्णय ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर झाला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाºयांची अशी १०७३ पदे भरण्याचे प्रस्तावित होते. परंतु गेल्या तीन वर्षात यावर काहीच झाले नाही. परिणामी, रुग्णालयाच्या विकासावर पाणी फेरल्या गेले आहे. सध्या रुग्णालयात मोजकेच डॉक्टर, त्यातही ठाराविक वेळेसाठीच उपचार होत असल्याने एकेकाळी ७००वर असलेले बाह्यरुग्ण विभाग आता केवळ ४००वर आले आहे.
 

Web Title:  Ambedkar Hospital will stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.