ट्रिगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:28 AM2018-05-20T11:28:51+5:302018-05-20T11:28:51+5:30

बंदुकीची नळी खरे म्हणजे तेव्हाच आपण स्वत:वर रोखलेली असते.. आज किंवा उद्या ट्रिगर ओढणार असतोच.. प्रश्न फक्त आज की उद्या एवढाच उरतो...

Trigger | ट्रिगर

ट्रिगर

Next

- वन्दना अत्रे
आठवतोय तो दिवस.
दहा वर्षांपूर्वीचा.
कॅन्सरवर उपचार सुरू झाले होते. ऐन उन्हाळ्यात घ्याव्या लागणाऱ्या केमोथेरपीच्या औषधांनी आणि त्यांच्या दुष्परिणामांनी जीव बेजार झाला होता. पुढे काय काय घडणार आहे त्याचा पुरता अदमास अजून यायचा होता. दुसरी किंवा तिसरी केमो संपवून मार्च महिन्याच्या कडकडीत दुपारी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा ऐन तापल्या दुपारीसुद्धा समोरचा रस्ता धो-धो वाहत होता. गाड्या, स्कूटर्स, रिक्षा, बसेस सुसाट वेगाने पळत होत्या. डोक्या-कानाला रुमाल आवळून मुली-बायका झपझप कुठे कुठे जात होत्या. हातात खूप सारे सामान घेऊन कोणी गावाला निघाले होते. आणि समोर दिसणाºया रसाच्या गुºहाळात आठ-दहा तरुण मुलींचे टोळके रस पिता-पिता खिदळत होते.
वेगाने धावणाºया त्या जगात उभी असलेली मी काही क्षण भोवंडूनशी गेले. रस्ता ओलांडून पलीकडे कसे जायचे तेच उमजेना काही वेळ. बरोबर असलेल्या मुलाचा हात धरून रस्ता ओलांडून गाडीत बसले मात्र, आणि एकाएकी पूर यावा तसे रडू फुटले. खरे म्हणजे, शरीरात कुठे काही दुखत खुपत नव्हते. तीन दिवस मनगटात खुपसून असलेल्या सुयांच्या वेदना निवल्या होत्या. तहान-भुकेने जीव व्याकूळला नव्हता. आणि तरी मला रडू फुटत होते.
- बरोबर असलेला नवरा आधी भांबावला. मग माझा हात हातात घेत शांत बसला. काही क्षण स्वस्थ बसलो. मुलाने हॉस्पिटलच्या बॅगमध्ये असलेला आय पॉड बाहेर काढून मला आवडणारे संगीत सुरू केले. डोळे मिटून बसले आणि हळूहळू अश्रूंचा पूर ओसरू लागला. शांत होता होता विचारांच्या इंद्रियाने मान वर केली. कशाबद्दल होते ते रडू नेमके? आता मीच मला विचारीत होते.
डोळ्यात पाणी आणणारे एकेक विचार हळूहळू मला दिसू लागले. पहिला, मी एवढी आजारी, जगात कोणाला फिकीर आहे का त्याची? कोणाचे म्हणून व्यवहार थांबले नाहीयेत. सगळे काही सुरू आहे, त्याच वेगाने आणि जोमाने, जोशाने. कोणाचा प्रवास, कोणाची रोजची नोकरीची धावपळ, कोणाला सुटी लागल्याचा आनंद... म्हणजे मी नसले तरी कोणाचे काहीच अडत नाही... कदाचित कधीच अडणार नाही की काय?.. मग या जगात मी आहे म्हणजे नेमके काय आणि कोणासाठी?
मग दिसला आणखी एक विचार, जरा अधिक तीव्र. याचा अर्थ या अखंड धावणाºया जगात माझ्यासाठी थांबणारे, माझ्या मंदावलेल्या वेगाने चालणारे माझे असे कोणीच नाही की काय? हे सगळे सोसताना मी अशी एकटीच? त्याखालीच चिरडून मी मरणार तर नाही ना? कल्पनेनेच उभे केलेले ते एकटेपण एकदम अंगावर कोसळून रडू फुटले असणार...
- तो नेमका क्षण आता चिमटीत येत होता. कॅन्सरच्या आजारातील पहिला दुबळा क्षण. मला आपल्या पकडीत घेऊ बघत होता का तो? कदाचित, पण त्यापूर्वीच मला चिमटीत पकडता आला तो.. आणि एकदम जाणवली ती सतत सावध राहण्याची गरज. चोवीस तास पहाºयाची आणि निराशेला आत शिरू देणाºया सगळ्या वाटा-फटी बुजवण्याची.. निराशेची एवढी खिन्न करून टाकणारी दाट छाया पहिल्यांदाच अनुभवत होते. याचा अर्थ ती यापूर्वी कधी अनुभवलीच नव्हती असे नव्हते... एकाकी, हतबल, कोणीतरी गळा घोटावा आणि जीव घुसमटून जाताना व्हावी तशी फडफड, धिक्कारलेपण यातले सगळे काही कधी चिमटी-चिमटीने, तर कधी मुठी भरभरून वाट्याला आले होतेच की वेगवेगळ्या निमित्ताने... आपल्यापैकी प्रत्येकाच्याच वाट्याला येत असते ते कधीतरी.. मग मला आत्ताच का एवढे रडू फुटले?
- कदाचित हा भोवताली बदलत असलेल्या जगाचा आणि त्यातील जगण्याच्या बदलत्या नियमांचा परिणाम असावा का? खूप सारे नियम. यशस्वी होण्याचे, दिसण्याचे आणि असण्याचे. एकमेकांना वेळ देण्याचे, सतत एकमेकांशी तुलना करीत राहण्याचे आणि असे बरेच काही. यातील सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, तुम्ही सतत व्यग्र असले पाहिजे, धावत नाही तर किमान चालत तरी असले पाहिजे. निवांत, स्वस्थ असणे नामंजूर. सतत कोणती तरी मीटिंग, कुठे तरी दौरा, एखादे ट्रेनिंग, एखादे प्रोजेक्ट असे तुमच्या खात्यावर असले पाहिजे तर तुमच्याबद्दल समोरच्या माणसाच्या डोळ्यात आदर दिसणार. तुम्ही महत्त्वाचे आहात हे सिद्ध होणार.
परवा एका मित्राने आपल्या जेमतेम वयाच्या साठीत स्वत:च्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. तो सध्या काय करतो? तो म्हणाला, खूप वर्षांपासून काही श्लोक पाठ करण्याची इच्छा मनात आहे. बरेच काही वाचायचे बाकी आहे. घराच्या गच्चीत कुंड्यांमध्ये भाजी पिकवण्याचे ठरवले आहे. तरी पुढे प्रश्न येतोच; पण काम काय करतोस? त्याला श्लोक पाठ करण्यात आणि बागेत खुरपे चालवण्यात आनंद आहे ते पुरेसे नाही. आणि त्या इच्छेचा आदर करण्याची गरज आपल्याला वाटत नाही... आपण पुन्हा पुन्हा विचारीत राहतो, दिवस कसा घालवता? एकही मीटिंग नाही, कामासाठी प्रवास नाही, साहेब मीटिंगमध्ये आहेत असे उत्तर न मिळता साहेब थेट फोनवर भेटतात याचा अर्थ हा माणूस फारसा महत्त्वाचा नाही.
या मित्राने तब्येत ठणठणीत असताना हा निर्णय घेतल्यामुळे हे समाजाच्या दृष्टीने त्याचे बिनमहत्त्वाचे वगैरे असणे त्याला फारसे लागले नाही; पण जेव्हा एखादे आजारपण किंवा परिस्थिती तुम्हाला बिनमहत्त्वाचे करून टाकते तेव्हा मात्र स्वत:च्याच नजरेतून आपण झपाट्याने उतरायला लागतो. स्वत:ला नालायक ठरवायला लागतो. मग इतरांशी स्वत:ची तुलना, आपल्या फुटक्या नशिबाबद्दल खंत करणे सुरू होते. जगणे ओझे होऊ लागते आणि पाय नैराश्याच्या दिशेने वाटचाल करू लागतात... बंदुकीची नळी खरे म्हणजे तेव्हाच आपण स्वत:वर ओढलेली असते.. आज किंवा उद्या ट्रिगर ओढणार असतोच.. प्रश्न फक्त आज की उद्या एवढाच असतो... सतत छान दिसण्याचा, यशस्वी असण्याचा, प्रकाशझोतात असण्याचा, महत्त्वाचे असण्याचा अशा खूप काही अपेक्षांनी जड झालेला हा पिंजरा आपणच आपल्या गळ्यात एकदा अडकवला की मग रोजचे जगणे मुश्कील होऊ लागते. अशा परिस्थितीत एखादी छोटी अपेक्षासुद्धा किती डोईजड होऊ शकते?
मला आठवतेय, केमोत डोक्यावरचे पूर्ण केस गेल्यावर डोक्यावर काही न घालता वावरण्याचा निर्णय मी घेतला होता. बिनकेसाची स्त्री बघणे धक्कादायक असते हे ठाऊक असूनही...! एकदा तशीच हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये शिरले. एक स्त्री पेशंट, तिचा नवरा आणि आई त्यात होते. माझ्या केस नसलेल्या डोक्याकडे डोळ्याने खुण करीत नवरा बाईच्या कानात कुजबुजला,
‘बघ तिने असा तुझ्यासारखा आवळून रुमाल बांधलाय का?’
कुटुंब छोट्या गावातून आले असावे. बाई करवादत नवºयाला म्हणाली, ‘पण आपल्या घरी जेठ, मामंजी, सासूबाई यांना चालेल का मी अशी बोडकी फिरले तर? मला हौस नाही गर्मीत असा रुमालाचा फास लावून घ्यायची’.
- एका गंभीर आजाराला तोंड देणाºया व्यक्तीला का नाही आपण ती आहे तशी स्वीकारू शकत? स्तनांच्या कॅन्सरमुळे स्तन गमवावे लागणारी स्त्री आणि कॅन्सरच्या उपचारांमुळे आपले बलदंड शरीर दुबळे होताना बघावे लागणारा एखादा पुरु ष यांच्याकडे संवेदनशीलपणे बघण्याचे, त्यांना स्वीकारण्याचे शिक्षण कोण देणार आपल्याला?
त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे असे शिक्षण मी स्वत:ला कधी देणार आहे? ते घेण्याचा एक प्राथमिक मार्ग म्हणजे, मनात येणाºया अशा प्रत्येक प्रश्नाला आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे. समाजाच्या दृष्टीने मी बिनमहत्त्वाची आहे असे जेव्हा मनात येते तेव्हा आधी मला बिनमहत्त्वाचे वगैरे ठरवणारा हा समाज नावाचा अधिकारी प्राणी आहे कोण हे स्वत:ला विचारले पाहिजे. मी महत्त्वाची आहे की नाही हे ठरवण्याचा त्याला अधिकार कोणी/कधी दिला ते विचारले पाहिजे. महत्त्वाचे आणि बिनमहत्त्वाचे म्हणजे काय? छान दिसणे याचे काही जागतिक निकष आहेत का? यशस्वी असण्याचे ठोकताळे कोणत्या अभ्यासक्र मात दिले आहेत का? अपयशाची नेमकी व्याख्या कोणी केली आहे का? मुळात प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य असे तराजूत घालून तोलून त्यावर किमतीचा टॅग लावण्याचे अधिकार मी कोणाला तरी का देऊन टाकते?
- हे आणि असे सगळे प्रश्न आपल्याला भानावर आणत असतात. समाजाच्या अनेक अव्यक्त बंधनांना/अपेक्षांना कंटाळून ती झुगारून देत जगणारी हिप्पी नावाची चळवळ भारताने बघितली आहे. आता या अपेक्षांचा पिंजरा ओढणे असह्य होऊन रोज आत्महत्या करणारी माणसे आपण बघतो आहोत. मनाच्या शक्तीची उपासना शिकवणारे गुरु आणि साहित्य ज्या भूमीने निर्माण केले त्या भूमीत हे घडावे हे दुर्दैव...
पुढच्या वेळी स्वत:लाच विचारा, बाळंतपण किंवा एखादा गंभीर आजार यामुळे काही काळ मी काहीही न करता स्वत:च्या शरीराची, मनाची काळजी घेत शांतपणे जगल/जगलोे तर काय होणार आहे? कामाचा ताण आणि वेग न झेपल्यामुळे ते काम सोडून स्वत:ला आनंद देणारे असे काही मी निवडले तर काय होणार आहे? माझ्या कपड्यांचा, साधे राहण्याचा, गाडी नाकारत पायी फिरण्याचा आणि जगाचा नेमका काय संबंध? त्याबद्दल मी कोणाला का स्पष्टीकरण द्यायचे? शिक्षण घेऊनसुद्धा मला नोकरी मिळत नसेल तर त्यात मला लाज वाटायला हवी की मला कामाची संधी न देणाºया समाजाला?
- या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यायची वेळ येते तेव्हा काही शहाणीसुरती माणसे स्वत:ला सांगत राहतात, धीर धर. हेही दिवस जातील.
रॉबर्ट फ्रॉस्ट या विचारवंत कवीची खूप छान ओळ आहे,This too shall pass... 

(मुक्त पत्रकार असलेल्या लेखिका कर्करोगग्रस्तांसाठी काम करणाºया गटांशी संबंधित आहेत)

Web Title: Trigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.