महाराष्ट्राची निसर्गयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:49 PM2017-10-21T14:49:21+5:302017-10-22T11:07:10+5:30

वन्यजिवांचं आणि जैवविविधतेचं आकर्षण असणारे आपले पर्यटक रणथंबोर किंवा बांधवगडच्या वाऱ्या करतील, पण महाराष्ट्रातील संपन्न जैवविविधतेची त्यांना कल्पनाही नसते. या वन्यजिवांचे वैविध्य आणि आवाका थक्क करणारा आहे. या वनवैभवाचा आनंद लुटायचा असेल तर काही हटके ठिकाणांना भेट द्यायलाच हवी.

Nature's Natural History | महाराष्ट्राची निसर्गयात्रा

महाराष्ट्राची निसर्गयात्रा

Next

- मकरंद जोशी

महाराष्ट्रात पर्यटनाला बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असतं ते अजिंठा-वेरूळ, मुंबई, शिर्डी, गणपतीपुळे अशा मोजक्याच ठिकाणांचं. बाहेरून येणाऱ्यांचं सोडा, घरातल्या पर्यटकांना तरी महाराष्ट्राच्या खºया वैभवाची जाणीव असते का? संपन्न जैवविविधतेचं वरदान लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातील अनेक वन्यजीवप्रेमी रणथंबोर किंवा बांधवगडच्या वाऱ्या करतील, पण त्यांनी महाराष्ट्रातीलच फणसाड किंवा टिपेश्वरला पायही लावलेला नसतो..

जगातल्या सर्वात मोठ्या पतंगापासून (अ‍ॅटलास मॉथ) ते भारतातल्या सर्वात लहान हरणापर्यंत (माउस डिअर- गेळा) आपल्या महाराष्ट्रात सापडणाºया वन्यजिवांचे वैविध्य आणि आवाका थक्क करणारा आहे. महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी एक पंचमाश भूभाग अरण्याने आच्छादलेला आहे. या अरण्यांमध्ये ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्टपासून ते स्वॅम्प फॉरेस्टपर्यंत कमालीचे वैविध्य आहे. या वैविध्याचे पडसाद आपोआपच महाराष्ट्राच्या वन्यजीवनावर पडलेले पाहायला मिळतात.

महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आणि ३५ वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्यातील ताडोबासारखं एखादंच जंगल पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याचं कारण तिथे सहजगत्या पट्टेरी वाघ पाहायला मिळतो हेच आहे. पण महाराष्ट्राच्या वनवैभवाचा खरा आनंद लुटायचा असेल तर काही हटके ठिकाणांना तुम्ही भेट द्यायलाच हवी. पाहूयात ती ठिकाणं..

अष्टविनायकातील मोरगावच्या जवळच मयूरेश्वर अभयारण्य आहे. मोरगावकडून सुप्याकडे जाताना या भागात अभयारण्य आहे असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. कारण या भागात सगळीकडे दिसतात ती गवताळ कुरणे आणि मोकळे माळरान. पण ह्या ग्रासलँड हॅबिटॅटमुळेच या भागात लांडग्यांपासून ते घोरपडीपर्यंत सहसा इतरत्र न दिसणारे प्राणी पाहायला मिळतात.

१९९७ साली मयूरेश्वर अभयारण्य घोषित करण्यात आलं आणि इथल्या उष्ण कटिबंधीय शुष्क काटेरी झुडपांच्या अरण्याला संरक्षण मिळालं. मयूरेश्वरची खासियत म्हणजे चिंकारा अर्थात इंडियन गॅझेल. अ‍ॅण्टिलॉप गटातील (सरळ शिंगाची हरणे) चिंकारा दिसायला अतिशय रु बाबदार असते, मात्र लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे माणसाच्या वाऱ्यालाही उभे न राहता चौखूर उधळते. या अभयारण्यामध्ये वेडा राघूपासून ते कोतवालापर्यंत नेहमी दिसणारे पक्षी तर दिसतातच, पण इंडियन कोर्सर अर्थात धाविक, पेंटेड सँड ग्राउज, तित्तर, लार्क म्हणजे चंडोल असे खास माळावरचे पक्षी पाहायला मिळत असल्याने डोळ्यांचे पारणे फिटते. मोरगाव, जेजुरी इथल्या हॉटेलमध्ये निवास करून शनिवार, रविवार मयूरेश्वरची जंगल सफारी सहज करता येते. मात्र अभयारण्यात शिरण्याआधी वनखात्याची प्रवेश फी आणि कॅमेरा फी भरायला विसरू नका.

आकाराने लहान असूनही निसर्ग निरीक्षणाचा अमाप आनंद देणारं आणखी एक अभयारण्य म्हणजे मुरूड - नांदगाव जवळचं फणसाड अभयारण्य. समुद्राच्या काठावर असलेलं हे जंगल मुळात मुरूडच्या नवाबाचं शिकारीचं रान होतं. फणसाडला वनविभागाचे तंबूनिवास आहे. त्यामुळे दोन किंवा तीन दिवस मुक्काम ठोकून इथे असलेल्या रानवाटांवरून झकास पायी भ्रमंती करता येते.
पायी फिरल्यामुळे रस्त्याच्या कडेला उमललेल्या रानफुलांपासून ते मशरूमच्या अनोख्या नमुन्यापर्यंत छोट्या जिवांची दुनियाच तुम्हाला खुली होते. गर्द झाडी असल्याने पक्षी शोधायला जरा कष्ट पडतात, पण फ्रॉग माउथसारखा अनकॉमन भिडू दिसायची शक्यता असल्याने फणसाडची वारी उत्कंठावर्धक असते.

फणसाडचं खास आकर्षण म्हणजे टोरँटूला हा कोळ्यांमधला दादा कोळी. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठमोठ्या जाळ्यांच्या आश्रयाने राहणारा हा कोळी सहसा रात्रीच बाहेर येतो आणि त्यामुळेच त्याचं दर्शन दुर्लभ असतं.

फणसाडच्या जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी यलो फुटेड ग्रीन पीजन अर्थात हरियल आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी जायंट स्क्विरल अर्थात शेकरू दोन्ही पाहायला मिळतात. शेकरू म्हटल्यावर भीमाशंकरच्या गर्द रानाची आठवण होणं स्वाभाविक आहे. देवस्थानामुळे येणारा यात्रेकरूंचा लोंढा आणि त्यातून निर्माण होणारा उपद्रव याचा ताण सांभाळत भीमाशंकरचं जंगल कसंबसं आपलं अस्तित्व टिकवून आहे. भीमाशंकर फक्त तीर्थयात्रेचं ठिकाण नाही, तर ते एक अभयारण्य आहे हेच विसरायला झालं आहे.
महाराष्ट्रातील पक्षितीर्थ अशी ओळख प्राप्त झालेलं ठिकाण म्हणजे पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंभारगाव, भिगवण. ही गावं उजनी धरणाच्या जलाशयाला खेटून आहेत. या जलाशयात येणारे हिवाळी पाहुणे आणि पाणपक्षी जवळून बघायची, कॅमेºयात टिपायची सोय कुंभारगावातल्या संदीप नगरे या उत्साही पक्षिमित्रामुळे झाली आहे. धरणाच्या पाण्यात बोटिंग करत फ्लेमिंगोच्या कळपांपासून ते हिमालय ओलांडून येणाऱ्या बार हेडेड गीजपर्यंत शेकडो प्रकारचे पक्षी पाहणं हा अविस्मरणीय अनुभव असतो.

नोव्हेंबरपासून ते अगदी एप्रिलपर्यंत कुंभारगावाकडे हौशी आणि जाणकार पक्षी निरीक्षकांची पावलं हमखास वळतात. कोल्हापूरजवळचा मायणी तलाव, जायकवाडीचा जलाशय, नांदूरमधमेश्वर, मुंबईतील शिवडीची दलदल या ठिकाणीही स्थलांतरित पक्ष्यांचा मेळा पाहता येतो.
आपल्या महाराष्ट्राला डहाणूपासून ते मालवणपर्यंत चांगला लांबलचक सागरकिनारा लाभलेला आहे. या किनारपट्टीवर आकाशात भरारी घेणाऱ्या व्हाइट बेलीड सी इगलपासून ते पाण्यात दंगामस्ती करणाऱ्या डॉल्फिन्सपर्यंत अनेक प्रकारचे सागरी जीव सुखाने नांदतात.
सर्वसाधारणपणे दुर्लक्षित राहिलेल्या या सागरी जिवांमधील ‘ऑलिव्ह रिडले टर्टल’ या सागरी कासवांना जगासमोर आणलं ते सह्याद्री निसर्ग मंडळ या संस्थेनं. या संस्थेच्या उत्साही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या किनाºयावर संशोधन करून रिडले कासवांच्या अंडी घालण्याच्या जागा शोधून काढल्या आणि त्यांचे संवर्धन, संरक्षण स्थानिकांच्या मदतीने सुरू केलं. त्यातून सुरू झाला ‘वेळासचा कासव महोत्सव’.
आता असा महोत्सव आंजर्ले, हरिहरेश्वर, देवगड ह्या ठिकाणीही आयोजित केला जातो. कासवांची पिले बघण्याची अनोखी संधी या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या कासव महोत्सवामुळे मिळते.

(लेखक गेली २२ वर्षे सहल संयोजक म्हणून पर्यटन व्यवसायात कार्यरत आहेत.)

Web Title: Nature's Natural History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.